प्रति कारमागे किती प्रॉफिट ?
रिपोर्टनुसार, टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीत प्रति कार ४५,८१० रुपये नफा कमावला आहे. याच कालावधीतील मारुती सुझुकीच्या नफ्याच्या तुलनेत हे जवळपास दुप्पट आहे. १० वर्षात पहिल्यांदाच टाटा मोटर्सने प्रति कार नफ्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या कार निर्माता कंपनीला मागे टाकले. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे मार्जिन FY22 च्या दुसऱ्या तिमाहीत ५.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्याच वेळी मारुतीसाठी हे मार्जिन ४.२ टक्क्यांवर घसरले.
काय आहे टाटा मोटर्सच्या ग्रोथचं कारण?
सध्या टाटा मोटर्स अशी सर्व मॉडल्स विकत आहे, जी २०१६ नंतर लाँच झाली आहेत. कंपनीने आपल्या सर्व जुन्या गाड्या बंद केल्या आहेत. टाटाच्या परिवर्तनाला २०१६ मध्ये टियागो लाँच झाल्यापासून सुरूवात झाली. यानंतर टिगोर, नेक्सॉन, हॅरियर, अल्ट्रोझ, सफारी आणि पंच लाँच झाली. २०१६ ते २०२१ पर्यंत, टाटाने शानदार कार लाँच केल्यात, त्यापैकी काही त्यांच्या सेगमेंटमधील बेस्ट-सेलर देखील आहेत. तसेच, टाटा हा एकमेव भारतीय ब्रँड आहे ज्याकडे देशात नेक्सॉन, अल्ट्रोझ आणि पंच या तीन 5-स्टार रेटेड कार आहेत.
टाटा पंचची धमाल -
टाटा मोटर्सने नुकतीच आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही टाटा पंच लाँच केली आणि या छोट्या एसयूव्हीने येताच भारताच्या बाजारात धमाल केलीय. पहिल्या महिन्यामध्येच तिने देशातली टॉप १० वाहनांच्या यादीत स्थान पटकावले आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांमध्ये ती १० व्या क्रमांकावर पोहोचली आहे. पहिल्या महिन्यातच ८,४५३ टाटा पंच कार कंपनीने विकल्या. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत ५.४९ लाख रुपये ठेवली आहे, तर टॉप व्हेरिअंटची किंमत ९.०९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
ईव्ही सेगमेंटमध्येही लीडर -
Tata Motors इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही लीडर म्हणून समोर येत आहे. कंपनीची इलेक्ट्रिक एसयूव्ही कार Tata Nexon EV भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे. शिवाय ही देशातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही (SUV) देखील आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही एसयूव्ही ३१२ किमीपर्यंतची जबरदस्त ड्रायव्हिंग रेजे देते. अलीकडेच कंपनीने Tigor EVs सुद्धा लाँच केलीये. आगामी काळात इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहनांचा विभाग वाढवण्यावर कंपनीचा 'फोकस' राहणार असून नुकतीच १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याद्वारे येत्या ४-५ वर्षामध्ये टाटा अजून १० नवीन इलेक्ट्रिक वाहने भारताच्या बाजारात उतरवेल.