वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय अर्थव्यवस्था याच प्रकारे विस्तारत राहिली व विकासदराने अपेक्षित लक्ष्य साध्य केले तर पुढील वर्षी आपण ग्रेट ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी अर्थव्यवस्था ठरू, असा विश्वास केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमती व जागतिक व्यापारयुद्ध ही भारतीय अर्थव्यवस्थेपुढील मोठी आव्हाने असतील, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
जागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक महासत्तांच्या सूचीत भारताने फ्रान्सला मागे टाकत सहावे स्थान मिळविले आहे. येत्या दोन वर्षांत भारताचा विकासदर विक्रमी स्तरावर जाण्याचे भाकीत जागतिक बँक, आतंरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यासह अनेक संस्थांनी वर्तविले आहे. या पार्श्वभूमीवर जेटली म्हणाले, 'विकासदराचे निर्धारित लक्ष्य गाठण्यात आपण यशस्वी झालो तर पुढील वर्षी ब्रिटनला मागे टाकून आपण जगात पाचवी अर्थव्यवस्था ठरू यात शंका नाही. गेल्या चार वर्षांत आपली अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून पुढील दशक हे भारताचे असेल.'
व्यवसाय सुलभतेच्या निकषावर भारत हा अनेक देशांच्या पसंतीचा देश ठरला असून गुंतवणुकीसाठी भारताला प्राधान्य दिले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
विरोधकांना केले लक्ष्य
द काँग्रेस गेव्ह स्लोगन्स टू रूरल इंडिया - प्राइम मिनिस्टर मोदी गेव्ह रिसोर्सेस या शीर्षकाखाली फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या लेखात जेटली यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसने केवळ गरिबी हटावच्या घोषणा दिल्या. गरीबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कोणतेही स्रोत निर्माण केले नाहीत. दुसरीकडे, नरेंद्र मोदी हे गरींबासाठी ठोस कार्यक्रम आखत असून त्याच्या पूर्ततेकडेही लक्ष ठेऊन आहेत, असा दावा जेटली यांनी केला.