वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या सरकारी विमानसेवा कंपनीतील सरकारी हिस्सा पूर्णपणे विकण्यासाठीची प्राथमिक निविदा सरकारकडून पुढील महिन्यात प्रसिद्ध करण्यात येईल असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
एअर इंडियावर ५८ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून या कंपनीचा तोटाही हजारो कोटींच्या घरात आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी या निर्गुंतवणुकासाठी प्रक्रिया आखली होती. मात्र त्यास कोणत्याही कंपनीचा प्रतिसाद लाभला नाही. यावेळी मात्र काही कंपन्यांनी एअर इंडिया विकत घेण्यात स्वारस्य दाखवले आहे. त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियातील सरकारी हिस्साखरेदीसाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक स्वारस्यपत्रासंबंधीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.
पूर्वीच्या तुलनेत सरकारने यासंबंधी काही अटी शिथिल केल्या आहेत. त्यानुसार नव्या कंपनीला एअर इंडियाचे नाव बदलण्याचा अधिकार असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.