वृत्तसंस्था, नवी दिल्ली
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने देशातील विमान कंपन्या व विमान प्रवाशांच्या दृष्टीने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. विमानासाठी आवश्यक असणाऱ्या इंधनाच्या (एटीएफ - एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) दरात तब्बल १४.७ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यामुळे विमानांसाठीचे इंधन हे सर्वसाधारण पेट्रोल व डिझेलपेक्षा स्वस्त म्हणजे प्रतिलिटर ५८ रुपये झाले आहे. यामुळे विमानप्रवासाचे तिकीटदर नियंत्रणात राहाण्यास वा कमी होण्यास मदत होणार आहे. ही दरकपात एक जानेवारीपासूनच लागू करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरात सतत घसरण होत असल्याने सरकारी इंधन कंपन्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत दीड महिन्यांपासून कपात करत आहेत. कच्च्या इंधनाच्या दरकपातीचा लाभ विमानासाठीच्या इंधनालाही व्यावा यासाठी सरकारने मंगळवारी हा निर्णय घेतला. यापूर्वी एक डिसेंबरलाही घेतलेल्या अशाच निर्णयांतर्गत सरकारने विमानइंधनाच्या दरात १०.९ टक्क्यांनी कपात केली होती. या इंधनदरात मंगळवारी आणखी १४.७ टक्क्यांची कपात झाल्याने विमानासाठीच्या इंधनाचा दर प्रति किलोलिटर ९,९०० रुपयांनी घसरला. यामुळे हा दर आता प्रति किलोलिटर ५८,०६०वर स्थिरावला आहे. एक लिटरच्या हिशेबात हा दर साधारण ५८ रुपये येतो. नवी दिल्लीमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे ६८.६५ व ६२.६६ रुपये असल्याने विमानांसाठीचे इंधन पेट्रोल व डिझेलपेक्षा स्वस्त झाले आहे.
पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त
पेट्रोल व डिझेलच्या दरात मंगळवारी अनुक्रमे प्रतिलिटर १७ व २० पैशांची कपात झाली. यामुळे मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ७४.३० रुपयांपर्यंत घसरला. तर, एक लिटर डिझेलचा दर ६५.५६ रुपये नोंदविण्यात आला. नवी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १९ पैशांची कपात झाल्याने पेट्रोलने ६८.६५ असा नवा दर गाठला. तर, एक लिटर डिझेलसाठी ६२.६६ रुपये मोजावे लागत होते. कच्च्या इंधनाच्या किंमती घसरत असल्याने भारतात गेल्या अडीच महिन्यांपासून इंधनदर कपात होत असून या कालावधीत पेट्रोलचे दर किमान १४ रुपयांनी घटले आहेत.
विमान कंपन्यांना दिलासा
एअर इंडिया या सरकारी कंपनीसह देशातील बहुतांश खासगी विमान कंपन्या सद्यस्थितीत तोट्यात आहेत. स्पर्धेचा विचार करता या कंपन्यांना विमान तिकिटांचे दर किफायतशीर ठेवावे लागत आहेत. कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर याचा मोठा ताण पडत आहे. विमानांसाठी लागणारे इंधन काही महिन्यांपूर्वी अतिशय महागल्यानेही या कंपन्यांपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र या इंधनदरात कमालीची कपात झाल्याने विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही दरकपात झाली नसती तर विमान कंपन्यांकडून तिकीटदरात २० टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता होती. यामुळे प्रवाशांच्या संख्येत घट होऊन विमानसेवेला मोठा फटका बसला असता.