नवी दिल्ली ः देशातील सर्व वाहन उत्पादन प्रकल्प सुरू केल्याचे टाटा मोटर्सने मंगळवारी जाहीर केले.
टाटा मोटर्सने आपला जमशेदपूर येथील प्रकल्प २७ मे रोजी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन सुरू केला आहे. ही माहिती कंपनीने वैधानिक सादरीकरणात दिली आहे. याचबरोबर कंपनीची सुमारे ५९ टक्के वाहनविक्री दालने सुरू केली आहेत. यामधून ६९ टक्के रिटेल मार्केटमध्ये टाटाची वाहने पोहोचतात. व्यावसायिक वाहनांच्या ९० टक्के पुरवठादारांनाही कामकाज सुरू करण्याविषयी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत, असे टाटा मोटर्सने सांगितले आहे. यापैकी प्रत्यक्षात ६० टक्के पुरवठादारांनीच पुरवठा सुरू केला आहे.
३१ मार्चपर्यंत कंपनीकडे रोकड आणि रोकडसम असे एकूण ४,७०० कोटी रुपये होते. काढून न घेतलेली पतसुविधा १,५०० कोटी रुपयांची होती, असी माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने पुढील व्यवसायासाठी एक हजार कोटी रुपये अपरिवर्तनीय ऋणपत्रांद्वारे उभारले आहेत.