अ‍ॅपशहर

एअर इंडियाच्या वैमानिकांत अस्वस्थता

एअर इंडियाच्या खासगीकरणाचा प्रयत्न अपयशी ठरल्यास ही कंपनी बंद करण्यात येईल, या केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या वक्तव्यामुळे या कंपनीच्या वैमानिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Maharashtra Times 25 Dec 2019, 5:13 am
टाइम्स न्यूज, नवी दिल्ली: एअर इंडियाच्या खासगीकरणाचा प्रयत्न अपयशी ठरल्यास ही कंपनी बंद करण्यात येईल, या केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या वक्तव्यामुळे या कंपनीच्या वैमानिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नियमानुसार पूर्वसूचना न देता (नोटीस पीरियड) आम्हाला नोकरी सोडण्याची परवानगी द्यावी व आमचे थकीत पगार व अन्य देय रक्कमही त्वरित अदा केली जावी, अशी विनंती या वैमानिकांनी एका पत्राद्वारे सरकारला केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम air-india


एअर इंडियाचे ३१ मार्च २०२०पर्यंत खासगीकरण न झाल्यास ही कंपनी बंद करण्यात येईल या तुमच्या विधानामुळे आमची काळजी वाढली आहे. एअर इंडियाच्या भवितव्याविषयीची अनिश्चितता व तिला वाचवण्यासाठी पर्यायी योजना तयार नसल्याचे पाहता आम्हाला करारबद्ध कर्मचाऱ्यांसाठी असलेला पूर्वसूचनेचा नियम लावू नये. कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही राजीनामा दिल्यास तो त्वरित मंजूर केला जावा व सर्व थकीत रक्कम आम्हाला दिली जावी, अशी विनंती इंडियन कमर्शियल पायलट्स असोसिएशनने (आयसीपीए) पुरी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

एअर इंडियाच्या वैमानिकांना नोकरी सोडण्यापूर्वी सहा महिन्यांची नोटीस द्यावी लागते. हा कालावधी खूपच मोठा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत ६५ वैमानिकांनी राजीनामा दिला असून त्यांचा सहा महिन्यांचा नोटीस कालावधी लवकरच संपेल, असे या पत्रात नमूद केले आहे.

कर्ज फेडण्यात असमर्थ

वैमानिकांच्या पगारात उड्डाण भत्त्याचा हिस्सा सर्वात मोठा असतो. मात्र हा भत्ता ऑक्टोबरपासून थकीत आहे. यामुळे अनेक वैमानिक कर्जाचे हप्ते व अन्य पूर्वनियोजित पेमेंट करण्यात असमर्थ ठरले आहेत, याकडे या पत्रात लक्ष वेधले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज