अ‍ॅपशहर

विजेवरील कारमुळे प्रदूषण?

एकीकडे केंद्र सरकार वाढते प्रदूषण रोखण्यासाठी विजेवरील इलेक्ट्रिक कारना प्रोत्साहन देण्याची भाषा करीत असतानाच लक्झरी कार ब्रँड मर्सिडीज बेन्झचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ (भारत) रोलँड फोगर यांनी पारंपरिक इंधनावरील (पेट्रोल, डिझेल) कारच्या तुलनेत विजेवरील कारच अधिक प्रदूषण करतील, असा जावईशोध लावला आहे.

Maharashtra Times 12 Dec 2017, 3:00 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम electric car
विजेवरील कारमुळे प्रदूषण?
वृत्तसंस्था, नवी दिल्ली

एकीकडे केंद्र सरकार वाढते प्रदूषण रोखण्यासाठी विजेवरील इलेक्ट्रिक कारना प्रोत्साहन देण्याची भाषा करीत असतानाच लक्झरी कार ब्रँड मर्सिडीज बेन्झचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ (भारत) रोलँड फोगर यांनी पारंपरिक इंधनावरील (पेट्रोल, डिझेल) कारच्या तुलनेत विजेवरील कारच अधिक प्रदूषण करतील, असा जावईशोध लावला आहे.

फोगर यांच्या मते भारतातील ५० टक्के ऊर्जानिर्मिती कोळशापासून होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला हातभार लागतो. सद्य परिस्थिती पाहता भारतामध्ये कोळशापासून होणाऱ्या वीजनिर्मितीला सक्षम पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत विजेवरील कारमुळे प्रदूषण कमी होणार नाही, असा अजब तर्क फोगर यांनी सोमवारी मांडला. केंद्र सरकारने २०३०पर्यंत संपूर्णपणे विजेवरील कारचे धोरण राबविण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात केंद्राने संबंधित मंत्रालयांनाही त्या संदर्भात सूचना केल्या आहेत. त्यामुळे देशात ठिकठिकाणी विजेवरील मोटार चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

केंद्र सरकारने दळणवळणासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर भर देण्याचा निर्णय घेतल्याने वाहन क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीचीही घोषणा केली आहे. टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र या भारतीय कंपन्यांच्या यांच्या ई-कार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या शिवाय मारुती सुझकी २०२०पर्यंत आपली पहिली ई-कार बाजारात सादर करण्याची शक्यता आहे. सध्या राजधानी नवी दिल्लीसह देशभरात वायूप्रदूषणाची मोठी समस्या असून, ई-कारमुळे त्यात काही अंशी तरी घट होईल, अशी शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज