अ‍ॅपशहर

टर्म इन्शुरन्स निवडताना...

वित्त सल्लागारांच्या मते ‘टर्म प्लान’ हा विम्याचा सर्वाधिक उपयुक्त प्रकार आहे. यामध्ये अतिशय कमी किमतीत मोठ्या रकमेचे विमा संरक्षण मिळते. आज बाजारात अनेकविध कंपन्यांचे टर्म इन्शुरन्स उपलब्ध आहेत. त्यातून योग्य प्लानची निवड करताना सर्व बाबी पडताळून पहाव्यात...

Maharashtra Times 14 Jun 2017, 3:00 am
अतिशय कमी प्रीमियममध्ये सर्वोत्तम विमा संरक्षण देणारी योजना म्हणून टर्म प्लानची गणना होते. साधारणतः ३० वर्षे वयाची व्यक्ती दरमहा ७०० ते ८०० रुपयांच्या प्रीमियममध्ये तीस वर्षांसाठी एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण प्राप्त करू शकते. मित्रांबरोबर जाऊन मल्टिप्लेक्समध्ये एकदा जरी चित्रपट पाहिला तरी, आठशे रुपयांपेक्षा निश्चितच अधिक खर्च होतो. असे असले तरी, केवळ कमी प्र्रीमियम असणारा प्लान निवडणे फारसे हितावह नाही किंबहुना तो निकष असूच नये. या पार्श्वभूमीवर नेमक्या कोणत्या निकषांच्या आधारे टर्म इन्शुरन्स घ्यावा, याचा आज आढावा घेऊ या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम et wealth article
टर्म इन्शुरन्स निवडताना...


मिळणारे विमा संरक्षण

घरातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास अथवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दरमहा उत्पन्नाची सांगड घालता यावी, हा टर्म इन्शुरन्सचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे इन्शुरन्स घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. कर्त्या व्यक्तीच्या पश्चात सर्व खर्चांची हातमिळवणी कुटुंबाला करणे भाग पडू शकते, तसेच मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहासाठीही खर्चाची तजवीज होणे गरजेचे आहे. तुम्ही जर गृहकर्ज घेतले असेल, तर त्याचीही परतफेड करणे अनिवार्य असते. थोडक्यात काय तर, जी व्यक्ती टर्म इन्शुरन्स घेण्याचा विचार करीत असेल तर, मिळणारे संरक्षण ढोबळ वार्षिक उत्पन्नाच्या सात ते दहा पट अधिक असण्याची आवश्यकता आहे. मात्र, मिळणारे विमा संरक्षण त्यापेक्षा कमी असेल तर, टर्म इन्शुरन्सच्या उद्देशालाच हरताळ फासला जातो. या शिवाय विमा संरक्षणाची मर्यादा निर्धारित करताना चलनवाढ किंवा महागाई हा घटकही पाहण्याची आवश्यकता आहे.

कालावधी किती असावा?

टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या संरक्षणाइतकाच त्याचा कालावधीही महत्त्वाचा आहे. घरातील कर्ती व्यक्ती धडधाकटपणे कार्यरत असेपर्यंत टर्म इन्शुरन्सचे संरक्षण मिळणे अपेक्षित आहे. पूर्वी निवृत्तीचे वय साठ वर्षे होते. मात्र, हल्ली वयाच्या साठीनंतरही अनेक व्यक्ती कार्यरत असताना दिसतात. मात्र हल्ली लग्नाचे वय वाढल्याने उशिरा मुले होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत साठी पूर्ण केल्यानंतरही विम्याचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते ६५ वर्षापर्यंत विमा संरक्षण मिळणे आवश्यक आहे. प्रत्येकाची गरज वेगळी असल्याने त्यानुसार विमा संरक्षण हवे असलेल्या वयात फरक पडू शकतो. सध्या बाजारात अनेक योजना आहेत. त्यामध्ये पंधरा-वीस वर्षांचा कालावधी दाखवून प्रीमियम कमी असल्याचे दाखवले जाते. प्रीमियम कमी असेल तर, आपोआपच विमा संरक्षण कालावधीत घट होण्याची शक्यता असते. कालावधी घटल्यास अडचणी वाढण्याची शक्यता होते. वय वाढल्यानंतर नवीन इन्शुरन्स खरेदी करणे महागात पडू शकते.

प्रकृतीच्या तक्रारी दडवू नका

तंबाखू आणि दारूचे सेवन न करणाऱ्या व्यक्तींना, ज्यांची आजवर कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नाही, अशांना इन्शुरन्स कंपनीकडून विमा घेताना किमान प्रीमियम आकारला जातो. बऱ्याचदा व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती इन्शुरन्स कंपनीला खरी माहिती देत नाहीत. किमान प्रीमियमची आकारणी व्हावी, असा हेतू त्यामागे असतो. मात्र, या गोष्टी दडवून आपण मोठी चूक करीत आहोत, हे त्यांच्या गावीही नसते. विम्याचा दावा करताना कंपन्यांकडून सर्वच गोष्टींची खातरजमा करण्यात येते. त्यामुळे दडवलेल्या गोष्टी समोर आल्यास वारसदारांचा दावा रद्दबातल होण्याचीही शक्यता असते. दरवर्षी किमान दोन टक्के दावे रद्द केले जातात. त्यामुळे काही हजार रुपये वाचवण्याच्या नादात मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

कंपनी महत्त्वाचीच

तुम्ही काढलेला विमा हे एक दीर्घकाळासाठीचे कंत्राट असते. त्यामुळे ते ज्या कंपनीकडून घेतले जाते, त्या कंपनीचा इतिहास आणि पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. बहुसंख्य विमा कंपन्या दीर्घकाळ व्यवसाय करीत नाहीत. सध्या विमा उद्योग बिकट परिस्थितीतून जात आहे. त्यातच बऱ्याच विदेशी कंपन्या देशांतर्गत बाजारपेठेत उतरत आहेत. अशा परिस्थितीत कंपनीची खात्री न करता विमा खरेदी केल्यास विमाधारक गोत्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी तोट्यात आलेली कंपनी विदेशी कंपनीने खरेदी केल्यास तिचे अस्तित्व नष्ट होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे विमा खरेदी करताना विश्वासार्ह कंपनीचीच निवड करावी.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज