वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेची दखल घेतली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारत हा विकासाचा प्रमुख स्त्रोत असून जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचे जे स्थान होते ते येत्या काही दशकांत भारत मिळवेल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे रानिल साल्गादो यांनी व्यक्त केले. साल्गादो हे भारतासाठीचे फंड मिशन प्रमुख आहेत.
साल्गादो म्हणाले की, 'क्रयशक्ती समानतेच्या निकषांत भारताचे योगदान कमालीचे वाढले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान १५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाण अमेरिका व चीनच्या पाठोपाठ आहे. भारतीय व्यापाराची उलाढाल ही चीनच्या तुलनेत कमी आहे. मात्र येत्या काही दशकांत जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चीनप्रमाणे महत्त्वाचा भागीदार ठरेल. अधिक प्रगती साधण्यासाठी भारताने रचनात्मक सुधारणांसाठी पावले उचलण्याची गरज आहे.'
जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा दीर्घकाळ विकासाचा प्रमुख स्त्रोत कशाप्रकारे ठरू शकतो या मागील तार्किकताही साल्गादो यांनी सांगितली. भारत हा सध्या तरुणांचा देश आहे व हे चित्र आणखी बरीच वर्ष कायम राहाणार आहे. भारतातील कमावत्या हातांचे प्रमाण घटण्याचा काळ सुरू होण्यास अद्याप तीन दशकांचा कालावधी आहे. त्यामुळे या ३० वर्षांमध्ये भारत खूप काही साध्य करू शकतो. यामुळे पुढील तीन दशके भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावेल. आशियाई देशांचा विचार केला तर भारताएवढे सरासरी तरुण वय अन्य कोणत्याही देशाचे नाही. त्यामुळे आजवर चीनने जी भूमिका बजावली तीच भूमिका येत्या काही वर्षांत भारत पार पाडेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हत्ती धावू लागला...
भारतीय अर्थव्यवस्थेचा हत्ती आता वेगाने धावू लागला आहे, अशा शब्दांत साल्गादो यांनी भारताची प्रशंसा केली. नोटाबंदी व जीएसटी (वस्तू व सेवाकर) या दोन मोठ्या धक्क्यांतून भारतीय अर्थव्यवस्था आता सावरली असून भारतीय अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास होत आहे. भारतात अतिसूक्ष्म आर्थिक धोरणे तसेच, स्थैर्यआधारित धोरणे राबवली जात आहेत. भारतासारख्या खंडप्राय व २९ राज्ये असणाऱ्या देशात एकच करप्रणाली लागू करण्याचे आव्हान मोठे होते. मात्र भारतातील जीएसटी आता स्थिरावला असून हे लक्षणीय यश आहे. दिवाळखोरीविरोधी कायद्याचाही भारताला भविष्यात मोठा लाभ होणार यात शंका नाही, असे साल्गादो म्हणाले. महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या उपाययोजनांचेही त्यांनी कौतुक केले.
विकासदर वाढताच राहाणार
भारताच्या वाढत्या विकासदराविषयीच्या अंदाजाचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पुनरूच्चार केला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर हा ७.३वर पोहोचेल तर, त्या पुढील आर्थिक वर्षात तो साडेसात टक्क्यांचा स्तर गाठेल, असे नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाच्या अहवालात म्हटले आहे.