अ‍ॅपशहर

विमा नियामकाचा निर्णय; देशात यापुढे 'सरल जीवनविमा' अनिवार्य

ज्या ग्राहकांना किंवा पॉलिसी घेऊ इच्छिणाऱ्यांना आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून प्रत्येक आयुर्विमा कंपनी देत असलेल्या टर्म विमा पॉलिसींचा अभ्यास करून योग्य ती पॉलिसी निवडण्यासाठी हाती वेळ नाही, अशा ग्राहकांसाठी प्रमाणित किंवा स्टॅण्डर्ड टर्म विमा पॉलिसी असणे केव्हाही फायद्याचे आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Oct 2020, 4:29 pm
ईटी वृत्त, मुंबई : अधिकाधिक व्यक्तींनी आयुर्विमा उतरवावा यासाठी आयुर्विमा देणाऱ्या कंपन्या आपापल्या परीने प्रयत्न करत असल्या तरी आता यासाठी विमा नियामक व विकास प्राधिकरणानेच (इरडा) पुढाकार घेतला आहे. देशात कार्यरत असलेल्या सर्व आयुर्विमा कंपन्यांना यापुढे प्रमाणित किंवा एकसमान वैयक्तिक टर्म विमा पॉलिसी बाजारात आणावी लागणार आहे. ही टर्म विमा पॉलिसी आणताना त्यासाठी भराव्या लागणाऱ्या प्रीमियमची रक्कम किमान असणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी इरडाने सर्व आयुर्विमा कंपन्यांना करणे बंधनकारक केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सरल जीवनविमा अनिवार्य
life insurance


सायकलखरेदीसाठीही आता 'वेटिंग'! पाच महिन्यांत ४१ लाख सायकलींची विक्री
अशा प्रकारच्या पॉलिसीसाठी कोणतेही आकर्षक नाव देऊन ग्राहक मिळवण्याचा मोह आयुर्विमा कंपन्यांना होऊ शकतो. ही बाब गृहित धरून इरडाने या पॉलिसीचे नाव एकसमान 'सरल जीवनविमा' हे ठेवण्यास सांगितले आहे. पॉलिसीची रचना, मिळणारे लाभ याविषयीचे आराखडे प्रत्येक आयुर्विमा कंपनीला येत्या डिसेंबरअखेरपर्यंत इरडाला सादर करायचे आहेत, जेणेकरून ही पॉलिसी १ जानेवारी २०२१ रोजी बाजारात आणता येईल.

कर बचतीचे नियोजन; 'ईएलएसएस'मधील गुंतवणुकीचे हे आहेत फायदे
यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना इरडाने सांगितले आहे की, टर्म पॉलिसींचे प्रमाणिकरण करणे ही काळाची गरज आहे. ज्या ग्राहकांना किंवा पॉलिसी घेऊ इच्छिणाऱ्यांना आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून प्रत्येक आयुर्विमा कंपनी देत असलेल्या टर्म विमा पॉलिसींचा अभ्यास करून योग्य ती पॉलिसी निवडण्यासाठी हाती वेळ नाही, अशा ग्राहकांसाठी प्रमाणित किंवा स्टॅण्डर्ड टर्म विमा पॉलिसी असणे केव्हाही फायद्याचे आहे. विविध कंपन्यांच्या विविध टर्म पॉलिसींमुळे एरव्ही गोंधळलेला ग्राहक यापुढे गोंधळून जाणार नाही. यासाठी समजण्यास सोपी, प्रमाणित नियम व अटी असलेली, समान लाभ देणारी अशी पॉलिसी आणण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे इरडाने सांगितले आहे.

या पॉलिसीमुळे विम्याचा प्रसार समाजातील सर्व स्तरांपर्यंत होऊन विमाधारकांची संख्या वाढेल, असा विश्वास आयुर्विमा कंपन्यांनी व्यक्त केला आहे.

सरल जीवनविमा

- १८ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी

- टर्म विमा प्रकारची पॉलिसी

- पॉलिसीचा कालावधी पाच ते ४० वर्षांचा असेल

- टर्म विमा असल्यामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी सुरू असताना झाल्यास त्याने दिलेल्या नॉमिनीला संपूर्ण रक्कम दिली जाईल

- कमाल मॅच्युरिटी वय ७० वर्षे

- पाच लाख रुपये ते २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण घेता येईल

- विमा संरक्षण रकमेची मर्यादा प्रत्येक आयुर्विमा कंपनीला तिच्या क्षमतांनुसार वाढवता येईल. मात्र असे करताना या पॉलिसीअंतर्गत मिळणारे सर्व लाभ कायम ठेवावे लागतील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज