अ‍ॅपशहर

नोकऱ्या वाचवा! 'जेट' वैमानिकांचे मोदींना साकडे

आर्थिक संकट कोसळल्यानं 'जमिनीवर' आलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या देशांतर्गत वैमानिकांच्या संघटनेनं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे. विमान कंपनी वाचवण्यासाठी १५०० कोटी रुपयांची निधी तातडीनं उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती बँकेकडे केली आहे. तर कंपनीतील २० हजार नोकऱ्या वाचवा, असं साकडं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Apr 2019, 2:24 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jet-airways


आर्थिक संकट कोसळल्यानं 'जमिनीवर' आलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या देशांतर्गत वैमानिकांच्या संघटनेनं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे. विमान कंपनी वाचवण्यासाठी १५०० कोटी रुपयांची निधी तातडीनं उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती बँकेकडे केली आहे. तर कंपनीतील २० हजार नोकऱ्या वाचवा, असं साकडं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातलं आहे.

जानेवारीपासूनचे वेतन थकल्याने हतबल झालेल्या या कंपनीच्या वैमानिकांनी आज, सोमवारपासून 'उड्डाण बंद' आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला होता. पण, कंपनीचे आर्थिक नियोजन करणाऱ्या स्टेट बँकेशी चर्चा करण्याचे आश्वासन वैमानिकांना व्यवस्थापनाकडून देण्यात आले. त्यामुळे रात्री उशिरा हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचे वैमानिकांनी ठरवले. कंपनी सुरळीत चालवण्यासाठी आर्थिक नियोजन करणाऱ्या बँकेनं १५०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी विनंती आम्ही करतो. तसंच २० हजार नोकऱ्या वाचवा, अशी आमची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे, असं नॅशनल एव्हिएटर्स गिल्डचे उपाध्यक्ष आदिम वालियानी यांनी सोमवारी सांगितलं.

विमानांची दुरुस्ती आणि तपासणी करणाऱ्या फ्लाइट इंजिनीअरांनीही वैमानिकांना पाठिंबा देत सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक संकटामुळे जेट एअरवेजमधील कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून अनियमित वेतन दिले जात आहे. वैमानिक व फ्लाइट इंजिनीअरांना दर तीन महिन्यांनी एका महिन्याचे तर अन्य कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांतून एकदा वेतन दिले जात होते. पण, आता वैमानिक आणि फ्लाइट इंजिनीअरांना जानेवारीपासून वेतन मिळालेलेच नाही. यामुळे त्यांना कुटुंबाचा दैनंदिन खर्च चालवणे कठीण झाले आहे. याच्या निषेधार्थ वैमानिकांनी १ एप्रिलपासूनच संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, व्यवस्थापनला निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यानुसार आता वैमानिक सोमवारपासून उड्डाण बंद करणार होते.

जेट एअरवेजच्या ताफ्यातील ११९पैकी १०८ विमाने आर्थिक संकटामुळे जमिनीवर आहेत. उर्वरित ११ विमानांच्या माध्यमातून एकूण ५२ उड्डाणे देशभरात सुरू आहेत. त्यापैकी मुंबईहून दिल्लीसाठी तीन व अमृतसरसाठी एक सेवा सुरू आहे. वैमानिकांनी काम बंद केल्यास ही मोजकी उड्डाणेही बंद होतील. कंपनीने सध्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्या आहेत. मुंबई-पॅरिस थेट सेवेला आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद होता. पण, आर्थिक बोज्यामुळे त्या सेवेसह 'सार्क' व 'आसिआन' देशांच्या सेवादेखील कंपनीने १० जूनपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज