अ‍ॅपशहर

‘गुंतवणुकीसाठी भारत योग्यच’

भारतामध्ये लोकशाही आणि भांडवलशाहीचा आदर करणारे वातावरण असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी भारत हा सर्वार्थाने योग्य असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी दिली.

महाराष्ट्र टाइम्स 18 Oct 2019, 5:33 am
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन: भारतामध्ये लोकशाही आणि भांडवलशाहीचा आदर करणारे वातावरण असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी भारत हा सर्वार्थाने योग्य असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी दिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयात दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. या मुलाखतीचे आयोजन फिक्की संघटना आणि यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम यांनी केले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ‘गुंतवणुकीसाठी भारत योग्यच’
Washington: Finance Minister Nirmala Sitharaman interacts with global investors at the headquarters of International Monetary Fund, in Washington, Wednesday, Oct. 16, 2019. (PTI Photo/Lalit K Jha) (PTI10_17_2019_000021B)


भारताच्या आर्थिक स्थितीबाबत निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'आजही भारत हा वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. येथे कुशल मनुष्यबळ आहे, सरकार सातत्याने सुधारणा राबवत आहे, त्याहीपेक्षा अधिक म्हणजे भारतात लोकशाही आहे, तर कायदा हा सर्वोच्च स्थानी आहे.' भारतात गुंतवणूक का करावी, या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, न्यायिक प्रक्रियेला काहीसा विलंब लागत असला तरी भारत एक पारदर्शी आणि खुली सामाजिक व्यवस्था असलेला देश आहे. देशात कायद्याचे राज्य असून अनेक सुधारणा प्रत्यक्षात येत आहेत.

विमा क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणूकदारांसाठी असलेली मर्यादा काढून टाकावी, असे आवाहन बड्या विदेशी विमा कंपन्यांनी यावेळी केले. त्यावर त्या म्हणाल्या, 'गुंतवणूक मर्यादा काढण्याआधी विमा क्षेत्राच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत ते प्रथम सरकारला जाणून घ्यावे लागेल. त्यासाठी विमा कंपन्यांनी सरकारकडे तपशील पाठवावा. त्यानंतरच त्यावर विचार केला जाईल.'

अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांचा निर्मला सीतारामन यांनी आढावा घेतला. 'वित्तीय तूट विशिष्ट मर्यादेत राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कॉर्पोरेट क्षेत्र आणि गुंतवणूकदार यांच्यात संभ्रम नसावा, यावर सरकार भर देत आहे. संकटात असलेल्या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधांवरील सार्वजनिक खर्चाचे प्रमाण वाढवण्यावर सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे सरकारने यापूर्वीच सांगितले आहे. अर्थव्यवस्थेत खेळता पैसा राहण्यासाठी जनतेकडून पैशाचा वापर वाढणे गरजेचे आहे', असे त्या म्हणाल्या. सर्वसामान्यांच्या हातात पैसा खेळता राहण्यासाठी बँका व वित्तसंस्थांना गावपातळीवर जाण्याचे आदेश दिल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज