अ‍ॅपशहर

शेतकऱ्यांसाठी केंद्राची विशेष योजना; दरमहा करा फक्त ५५ रुपये जमा अन् ३ हजार रुपये पेन्शन मिळवा

Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana: १८ ते ४० वर्षे वयोगटातील शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना दरमहा ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतील. त्यांच्या वयानुसार ही रक्कम ठरवली जाईल, ज्याच्यानंतर त्यांना एका ठराविक कालावधीपासून दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2022, 12:29 pm
नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवित आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा या योजनांचा उद्देश आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहेत. त्यापैकी एका योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे, जी एक पेन्शन योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली असून यामध्ये वृद्ध शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana


प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा फायदा घेण्यासाठी १८ ते ४० वर्षे वयोगटातील शेतकरी नोंदणी करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना दरमहा ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतील. तर ही रक्कम त्यांच्या वयानुसार ठरवली जाईल.

पेन्शनधारकांसाठी बदलला महत्त्वाचा नियम, तुमच्यावर काय होणार परिणाम

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षापर्यंत ही रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना त्याचा परतावा पेन्शनच्या स्वरूपात मिळेल. सरकार दरमहा शेतकऱ्याला तीन हजार रुपये पेन्शन देणार आहे, म्हणजे त्यांना वार्षिक ३६ हजार रुपये मिळणार. भारत सरकारच्या या योजनेत देशभरातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी अर्ज करत आहेत.

शेतजमिनीच्या विक्रीचा इन्कम टॅक्स नियम; किती कर भरायचा, पैशांची बचत कशी कराल?

मानधन योजनेसाठी नोंदणी कशी कराल
  • पीएम किसान मानधन योजनेसाठी प्रथम तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल.
  • तिथे तुम्हाला तुमची, कुटुंबाची, वार्षिक उत्पन्नाची आणि तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.
  • यासोबतच पैसे घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.
  • त्यानंतर तिथे सापडलेला अर्ज तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करा.
  • यानंतर तुम्हाला पेन्शन खाते क्रमांक दिला जाईल.
गुंतवणूकदारांसाठी बॉलिवूड फॉर्म्युला, हृतिक आणि सलमान मंत्र कसे ठरतील फायदेशीर?

याशिवाय या योजनेंतर्गत शेतकऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला १५०० रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूक करून लहान आणि अल्पभूधारक शेतकरी त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात. या योजनेद्वारे गरीब शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा देणे हे केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर शेतकर्‍यांना आर्थिक दृष्ट्या इतर कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून राहावे लागणार नाही. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शेतातील खसरा खतौनी, बँक तपशील आणि पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

महत्वाचे लेख