वृत्तसंस्था, मुंबई
सरत्या वर्षात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. चालू महिन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मंगळवारी नव्या उच्चांकाची नोंद केली. दिवसभरात ४१३ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स ४१३५२ या नव्या उच्चांकावर स्थिरावला. १११ अंकांच्या वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने १२१६५चा स्तर गाठला. अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध संपुष्टात येण्याचे संकेत व विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून वाढलेला गुंतवणूक ओघ गुंतवणूकदारांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी परिणामकारक ठरला.
चालू वर्ष संपण्यापूर्वीच आर्थिक महासत्तांमधील व्यापारयुद्ध संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडींमुळे जगभरातील प्रमुख बाजारांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण आहे. मुंबई शेअर बाजारातही मंगळवारी त्याचे पडसाद उमटले. व्यापारयुद्ध शमल्यास भारतीय धातू कंपन्यांना कमालीचा लाभ होणार असल्याने या कंपन्यांच्या समभागांना मंगळवारी प्रचंड मागणी होती. याशिवाय, टेलिकॉम, वित्त व आयटी समभागांचीही जोरदार खरेदी करून गुंतवणूकदारांनी भावी नफ्याची बेगमी करण्यास पसंती दिली. या जोरदार खरेदीसत्रामुळे निर्देशांक वधारत गेला. सत्रांतर्गत व्यवहारात निर्देशांकाने ४१,४०१ असा सार्वकालीन उच्चांक नोंदवला. मात्र दिवसअखेरीस त्यात घट झाली.
हे वधारले
सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलच्या समभागांची सर्वाधिक म्हणजे ४.३८ टक्क्यांनी वृद्धी झाली. याशिवाय, भारती एअरटेल (४.३७), वेदांता (३.५), टाटा मोटर्स (३.०३), एचडीएफसी (२.४६), बजाज फयानान्स (२.३९) या समभागांनीही तेजी साधली.
हे घसरले
सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, एचयूएल आदी समभागांच्या मूल्याची मात्र घसरण झाली.