वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सोपी व सुटसुटीत कररचना निर्माण करून प्रामाणिक करदात्यांचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रतिपादन माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी येथे केले. अखिल भारतीय व्यापारी महासंघातर्फे (केट) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कररचनेतील संभाव्य दुरुस्तींसाठी विविध घटकांनी सरकारला सूचना केल्या असून सरकार त्यावर विचार करत आहे. कर निर्धारण अधिकारी व करदाता यांच्या परस्पर संपर्काशिवाय करप्रक्रिया पूर्ण करणारी ई-असेसमेंट योजना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
खरेदी महोत्सव
व्यापार, उद्योगाला चालना देण्यासाठी ग्राहक-व्यावसायिकांच्या सोयीचा खरेदी महोत्सव चालू वर्षी मार्चमध्ये देशभरात आयोजित केला जाईल याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. दुबईतील भव्य खरेदी महोत्सवाच्या धर्तीवर या महोत्सवाचे आयोजन केले जाईल, असे त्या म्हणाल्या.