वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सीमाशुल्क विभागाच्या निरीक्षकाने प्रत्यक्ष उभे राहून किंवा आयात-निर्यातदाराच्या कार्यालयाला भेट देऊन आर्थिक व्यवहारांचे मूल्यांकन (अॅसेसमेन्ट) करणे लवकरच इतिहासजमा होणार आहे. यासाठी येत्या ३१ डिसेंबरपासून सीमाशुल्क विभाग विनामानव मूल्यांकन (फेसलेस अॅसेसमेन्ट) पद्धत संपूर्ण देशात सुरू करणार आहे. याची सुरुवात सोमवारपासून चेन्नई आणि बेंगळुरू येथून झाल्याचे केंद्रीय अप्रत्यक्ष करमंडळाने म्हटले आहे.
विनामानव मूल्यांकन पद्धत सामान्यतः आभासी (व्हर्च्युअल) मूल्यांकन पद्धत म्हणून ओळखली जाते. ही पद्धत लागू करून सध्याच्या निरीक्षकाद्वारे करण्यात येणाऱ्या मूल्यांकन पद्धतीला कायमची सोडचिठ्ठी केंद्रीय अप्रत्यक्ष करमंडळ देणार आहे. व्यापारी व संबंधित आयात-निर्यातदारांना ही पद्धत स्वीकारताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विनामानव मूल्यांकनाची ही पद्धत देशभर टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे करमंडळाने ठरवले आहे.
यापूर्वी केंद्रीय अप्रत्यक्ष करमंडळाने चेन्नई, दिल्ली, बेंगळुरू, गुजरात व विशाखापट्टण येथील सीमाशुल्क विभागांत विनामानव मूल्यांकन पद्धत प्रायोगिक तत्त्वावर राबवली होती.
पहिल्या टप्प्यातील विनामानव मूल्यांकन
बेंगळुरू आणि चेन्नई येथून सोमवारपासून सुरू झालेल्या विनामानव मूल्यांकनांतर्गत कस्टम्स टारिफ अॅक्ट, १९७५ च्या प्रकरण ८४, ८५ अंतर्गत येणाऱ्या आयात केलेल्या वस्तूंचे मूल्यांकन सुरू झाले. प्रकरण ८४ व ८५ मध्ये मुख्यतः यंत्रे व इलेक्ट्रिकल उपकरणे यांचा समावेश होतो.
विनामानव मूल्यांकन कसे होणार?
या पद्धतीत एखाद्या विधीक्षेत्रातील सीमाशुल्क विभागात मूल्यांकन अधिकारी उपस्थित असेल, ज्याच्याकडे वेगवेगळ्या सीमाशुल्क विभागांतर्गत केलेल्या आयातीची बिले मूल्यांकनासाठी पाठवली जातात. ही बिले जसजशी तयार होतात तशी ती त्याला ऑटोमेटेड सिस्टिममधून मिळतात. मूल्यांकन एकसमान व जलद व्हावे यासाठी केंद्रीय अप्रत्यक्ष करमंडळाने सीमाशुल्क प्रधान आयुक्त किंवा आयुक्त (विमानतळावरील आयुक्तासह) या दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केंद्रीय अप्रत्यक्ष करमंडळाने केली आहे.