वृत्तसंस्था, मुंबई
देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २०८.४३ अंकांनी घसरत ४१,११५.३८ अंकाच्या पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६२.९५ अंकांनी घसरून १२,१०६.९०च्या पातळीवर थांबला. बुधवारी शेअर बाजारात ऊर्जा, वित्तीय, वाहन उद्योगांच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे आढळून आले.
विविध रेटिंग एजन्सींनी देशाच्या विकासदरात घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पापूर्वी बहुतांश कंपन्यांचे समभाग घसरून साह्य पातळीला (सपोर्ट लेव्हल) येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जागतिक नाणेनिधीनेही (आयएमएफ) नुकताच देशाच्या विकासाचा वेग घटणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या शिवाय तिसऱ्या तिमाहीमध्ये अनेक कंपन्यांचे वित्तीय अहवालही फारसे समाधानकारक नाहीत. त्यामुळेही बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे.
'सेन्सेक्स'मध्ये 'ओएनजीसी'च्या समभागात सर्वाधिक (५.१३ टक्के) घसरण दिसून आली. त्यापाठोपाठ 'एनटीपीसी'मध्ये ४.२७ टक्के घसरण नोंदवण्यात आली. त्यापाठोपाठ कोटक महिंद्र, मारुती सुझुकी यांच्या समभागांतही दोन टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. एचडीएफसी, एशियन पेंट्स, आयसीआयसीआई बँक आणि अॅक्सिस बँकेचे समभागही एक टक्क्यांनी घसरले.
दुसरीकडे मात्र नेस्ले इंडियाच्या (१.८६ टक्के)समभागात सर्वाधिक तेजी दिसून आली. त्यापाठोपाठ टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेक्नोलॉजीज या कंपन्यांचेही समभाग एका टक्क्यांहून अधिकने उसळले. 'बीएसई'मध्ये धातू क्षेत्रात सर्वाधिक १.५७ टक्क्यांची घसरण दिसून आली. त्यापाठोपाठ तेल आणि गॅस, ऊर्जा क्षेत्रामध्येही एक टक्क्यापेक्षा अधिक घसरण दिसून आली. दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सर्वाधिक १.०९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.