वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्र सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील तीन जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या एकत्रीकरणाचे सूतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्राने या प्रक्रियेसाठी सल्लागारांना पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारतर्फे जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील 'नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड', 'ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' आणि 'युनायटेड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' या तीन कंपन्यांचे एकत्रीकरण करून एकच नव्या कंपनीची निर्मिती करण्यात येणार आहे. या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेसाठी सल्लागारांची नेमणूक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या तिन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे भांडवली मूल्यात वाढ होणार असून, भागधारकांना त्या तुलनेत चांगले परतावे मिळण्याची शक्यता असल्याचाही दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे.
३१ मार्च २०१७ रोजी सार्वजनिक क्षेत्रातील तिन्ही जनरल इन्शुरन्स कंपन्या २००हून अधिक इन्शुरन्स उत्पादनांची विक्री करीत होत्या. त्यातून त्यांनी ४१,४६१ कोटी रुपयांचा प्रीमियम प्राप्त केला होता. जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील एकूण बाजार हिश्श्यापैकी ३५ टक्के हिस्सा या तिन्ही कंपन्यांकडे एकवटला आहे. या तिन्ही कंपन्याची एकूण संपत्ती (नेट वर्थ) ९,२४३ कोटी रुपयांची असून, कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ४४ हजार आहे. तिन्ही कंपन्यांची मिळून देशभरात ६,००० कार्यालये आहेत.