अ‍ॅपशहर

कॉलड्रॉप प्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटिसा

मोबाइलच्या थ्रीजी सेवेकडून फोरजी सेवेकडे जाताना देशातील मोबाइल सेवेला कॉलड्रॉपचे लागलेले ग्रहण सुटण्याची शक्यता नाही. कॉलड्रॉपपायी सर्वसामान्य ग्राहक वैतागलेला आहे.

Maharashtra Times 27 Sep 2016, 2:00 am
दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा कडक पवित्रा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trai to action on telecom cos for call drops
कॉलड्रॉप प्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटिसा


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मोबाइलच्या थ्रीजी सेवेकडून फोरजी सेवेकडे जाताना देशातील मोबाइल सेवेला कॉलड्रॉपचे लागलेले ग्रहण सुटण्याची शक्यता नाही. कॉलड्रॉपपायी सर्वसामान्य ग्राहक वैतागलेला आहे. रिलायन्स जियोसारखी नवी कंपनी बाजारात आल्यानंतरही या स्थितीत काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे आता दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कडक पवित्रा घेत, सर्वच कंपन्यांना कॉलड्रॉप प्रकरणी कारणे दाखवा नोटिसा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉलड्रॉप नेमके किती असावेत याविषयी मार्गदर्शक तत्त्वे असतानाही या तत्त्वांना खुशाल हरताळ फासून ग्राहकांना कॉलड्रॉप प्रकरणी हतबल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा ट्राय उचलणार आहे. रिलायन्स जियोच्या मते, गेल्या काही आठवड्यांत मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ७५ ते ८० टक्के कॉल फेल झाले आहेत. कॉल फेल होण्याची अर्थात कॉलड्रॉपची पातळी निर्धारित किमान पातळीपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे लक्षात आले आहे. दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे ५२ कोटी कॉल फेल गेले आहेत. हे कॉल बहुतकरून एअरटेल, व्होडाफोन इंडिया व आयडिया सेल्युलर या तीन कंपन्यांचे असल्याचा दावाही जियोने केला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रायने आता दूरसंचार कंपन्यांना १५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या काळातील नेटवर्क कन्जेशनचा तपशील देण्यास सांगितले आहे.

एअरटेल, आयडिया व व्होडाफोन यांच्या नेटवर्कशी जियोमार्फत जोडल्या गेलेल्या कॉलपैकी दरदिवशी १२ कोटी कॉल फेल गेल्याचेही जियोचे म्हणणे आहे. हे कॉल ब्लॉक केल्याचा गंभीर आरोप कंपनीने केला आहे.


कारवाई कशासाठी?

एका कंपनीची मोबाइल सेवा वापरून दुसऱ्या मोबाइल कंपनीच्या जोडणीला कॉल केल्यास तो कॉल पूर्ण होण्यासाठी ‘पॉइंट्स ऑफ इंटरकनेक्ट’ची आवश्यकता असते. असे पुरेसे पॉइंट्स ऑफ इंटरकनेक्ट उपलब्ध करून देण्यात जवळपास प्रत्येक दूरसंचार कंपनीला अपयश आल्याचा आल्याचा आरोप रिलायन्स जियोने केला होता. याची दखल घेत ट्रायने माहिती जमवली असून त्याआधारे कंपन्यांवर कारणे दाखवा नोटिस जारी करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज