वृत्तसंस्था, नवी दिल्ली
औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत भोजनाची थाळी स्वस्त झाल्याचे शुक्रवारी संसदेत सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवाल सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २००६-०७च्या तुलनेत २०१९-२० या १३ वर्षांमध्ये शाकाहारी भोजनथाळी २९ टक्क्यांनी आणि मांसाहारी थाळी १८ टक्क्यांनी स्वस्त झाल्याचे म्हटले आहे.
देशभरामध्ये उपलब्ध होणाऱ्या भोजनथाळीच्या अर्थकारणाचा विचार करता हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या माध्यमातून देशातील सामान्य व्यक्तीकडून एका भोजनाच्या थाळीसाठी देण्यात येणारी रक्कम मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी एप्रिल २००६ ते ऑक्टोबर २०१९पर्यंत २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जवळपास ८० ठिकाणांहून औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकातून किमतीचा आढावा घेण्यात आला आहे.
...
२०१५-१६नंतर किमतीत घट
आर्थिक पाहणी अहवालात नमूद केल्यानुसार संपूर्ण देशामध्ये शाकाहारी भोजनाच्या थाळीच्या किमतीत २०१५-१६नंतर बऱ्याच अंशी घट नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, २०१९मध्ये किंमतीत वाढ नोंदवण्यात आली होती. गेल्या वर्षी भाज्या आणि डाळींच्या किमतीत तेजी निर्माण झाल्यामुळे भोजनथाळीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे पाच सदस्य असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा दररोज दोनवेळा शाकाहारी पौष्टिक भोजनाच्या थाळीत वार्षिक १०,८८७ रुपयांची आणि मांसाहारी भोजनाच्या थाळीत सरासरी ११,७८७ रुपयांची बचत झाली आहे.