अ‍ॅपशहर

Vodafone-Idia: विलीनीकरणाचा कर्मचाऱ्यांना फटका

व्होडाफोन इंडिया आणि सेल्युलर इंडिया या कंपन्यांमधील प्रस्तावित विलिनीकरणानंतर उभय कंपनींतील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. या दोन्ही कंपन्यांचे मिळून २१ हजार कर्मचारी असून त्यात अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक असल्याचे समजते.

Maharashtra Times 17 Apr 2018, 9:24 am
ईटी वृत्त, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vodafone-idea


व्होडाफोन इंडिया आणि सेल्युलर इंडिया या कंपन्यांमधील प्रस्तावित विलिनीकरणानंतर उभय कंपनींतील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. या दोन्ही कंपन्यांचे मिळून २१ हजार कर्मचारी असून त्यात अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक असल्याचे समजते. या दोन्ही कंपन्या एकूण एक लाख २० हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोज्याखाली दबल्याने कर्मचारीकपात अटळ असल्याचे एका सूत्राने सांगितले.

मोबाइल कंपन्यांमधील स्पर्धा वाढत असताना रिलायन्स जिओने अन्य कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर या कंपन्यांचे विलिनीकरण होत आहे. या विलिनीकरणास आवश्यक परवानग्या मिळाल्या असून केवळ केंद्रीय टेलिकॉम मंत्रालयाची परवानगी बाकी आहे. मेअखेर हे विलिनीकरण प्रत्यक्षात येईल अशी शक्यता आहे.

मात्र विलिनीकरणानंतर नव्याने व्यवसायास सुरुवात करताना अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे ओझे कमी करण्याचा दोन्ही कंपन्यांचा प्रयत्न आहे. तूर्तास आयडियामध्ये ११ हजार तर व्होडाफोनमध्ये १० हजारपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप एकसारखे असल्याने विलिनीकरणानंतर ते अतिरिक्त कर्मचारी ठरणार आहेत. म्हणूनच सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय या कंपन्यांना घ्यावा लागणार आहे.

आयडिया सेल्युलरने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर, व्होडाफोनने या वृत्ताचे खंडन केले. अद्याप कर्मचाऱ्यांबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे व्होडाफोनने सांगितले.

आघाडीची कंपनी

या विलिनीकरणानंतर अस्तित्वात येणारी नवी कंपनी ही भारतातील सर्वात मोठी मोबाइल नेटवर्क कंपनी ठरेल. ही नवी कंपनी भारतातील ४२ टक्के ग्राहकपेठ व ३७ टक्के महसूल कवेत घेईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज