अ‍ॅपशहर

व्होडाफोन, आयडियाकडून ७,२४८ कोटी सरकारजमा

आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया यांच्यातील विलीनीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार या कंपन्यांनी मंगळवारी संयुक्तपणे ७,२४८.७८ कोटी रुपयांची थकीत रक्कम सरकारकडे जमा केली.

Maharashtra Times 25 Jul 2018, 4:00 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vodafone-idea


आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया यांच्यातील विलीनीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार या कंपन्यांनी मंगळवारी संयुक्तपणे ७,२४८.७८ कोटी रुपयांची थकीत रक्कम सरकारकडे जमा केली. या थकीत रकमेवरून सरकार व उभय कंपन्यांमध्ये वाद असल्याने या कंपन्यांनी निषेध नोंदवत ही रक्कम भरली.

आयडिया व व्होडाफोन यांच्या विलीनीकरणाला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने ९ जुलैला परवानगी दिली होती. मात्र स्पेक्ट्रमपोटीची थकीत रक्कम भरल्यानंतरच ही प्रक्रिया पार पडेल, असे या मंत्रालयाने स्पष्ट केले होते. सरकार आपल्याकडून थकीत रकमेपेक्षा अधिक रक्कम मागत आहे, असा आरोप व्होडाफोनने केला होता. तर, ही अधिकची रक्कम चालू बाजारभावाप्रमाणे योग्य आहे, असे सरकारने स्पष्ट केले. अखेर, या कंपन्यांनी दोन पावले मागे येत या रकमेचा भरणा केला. यातील ३,९२६.३४ कोटी रुपयांची रक्कम ही रोखीत देण्यात आली. तर, ३,३२२.४४ कोटी रुपयांची रक्कम ही बँक गॅरंटीच्या स्वरूपात देण्यात आली.

नवी उभारी...

या दोन्ही कंपन्यांवर एकूण १.१५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या या दोन्ही कंपन्यांना या विलीनीकरणामुळे नवी उभारी मिळणार आहे. भारतात सध्या भारती एअरटेल ही पहिल्या क्रमांकाची मोबाइल सेवा पुरवठादार कंपनी आहे. मात्र या विलीनीकरणानंतर एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर फेकली जाईल. व्होडाफोन-आयडिया ही नव्याने अस्तित्वात येणारी कंपनी अव्वल स्थान पटकावेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज