म. टा. प्रतिनिधी, पुणे
जीवनाचे विविध अर्थ गोष्टींच्या वाचनातून कळतात. एखाद्या समस्येला तोंड देताना नेमकी कोणती कृती केली पाहिजे, हे गोष्टीतून समजते. मुलांनी गोष्टी वाचल्या पाहिजेत. त्यातून त्यांना विविध प्रेरणा मिळत राहतात. जगताना केवळ ज्ञान प्राप्त होणे महत्त्वाचे नसून, ते ज्ञान कृतीतूनही अमलात आणणे महत्त्वाचे आहे. वस्तू, प्राणी, निसर्ग, व्यक्ती, परिसर यांच्यावरील गोष्टींवरून आपल्या हे सहज लक्षात येते. मुले व तरुणांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी कथांचा प्रसार आणि प्रचार अधिक व्हायला हवा, अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.
एस. पी. एम. प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात कीर्ती मुळीक यांच्या 'दौलतवाडी', 'डिटेक्टिव्ह टोळी आणि इतर गोष्टी' या बालकुमारांसाठी लिहिलेल्या गोष्टींच्या पुस्तकाचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी भडगावकर उपस्थित होत्या.
कीर्ती मुळीक म्हणाल्या, 'नवीन पुस्तकांचे प्रकाशन शाळा आणि महाविद्यालयात करायला हवे. अशाने ही पुस्तके आणि त्यांची माहिती मुलांना व तरुणांना सहजतेने उपलब्ध होईल. त्यांच्यात वाचनाची ऊर्मी जागी होईल. शाळेची उन्हाळी सुट्टी ही मुलांचीच सुट्टी असावी. या सुट्टीचे स्वातंत्र्य मुलांना मिळावे, त्यांनी मनासारखे खेळावे आणि भरपूर पुस्तके वाचावीत. अशा सुट्ट्या वाचनाचे संस्कार घडविण्यास महत्त्वाच्या ठरतात.' या कार्यक्रमामुळे मुलांना पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे काय, याची जाणीव झाली. अशा प्रकारचे प्रकाशनाचे व गोष्टी सांगण्याचे कार्यक्रम शाळांमधून झाले पाहिजेत. मुले त्यामुळे आनंदून जातात. त्यांना हसतखेळत ज्ञान प्राप्त होते, याकडे भडगावकर यांनी लक्ष वेधले.