जमीन नावावर होणे महत्वाचे
चंद्रशेखर प्रभु
......................................................
मी एक ज्येष्ठ नागरिक असून आम्ही पिंपरी-चिंचवड येथील म्हाडा वसाहतीत राहतो. आम्ही एकूण ९६ गाळेधारक २० वर्षे कराराप्रमाणे राहतो आहोत. आमचे हप्ते भरून झाले आहेत. मालकी हक्क तत्वाने दिलेल्या गाळ्याची पूर्ण रक्कम भरूनही म्हाडाने 'थकबाकी नाही' असे पावतीपत्र कोणालाही दिलेले नाही. इमारती मात्र महापालिकेकडे वर्ग केल्या. गाळे ताब्यात देताना सोसायटी करूनच देणे आवश्यक आहे अन्यथा कोणीही एकत्र येऊन सहकार्य करत नाहीत असा आमचा अनुभव आहे. मात्र आमच्याकडे सोसायट्या झालेल्या नाहीत. बरेचसे मूळ मालक घरे विकून गेले आहेत. त्यामुळे म्हाडा, महापालिका यांच्या परवानगीशिवाय राहते गाळे कमर्शियल प्रिमायसेस बनले आहेत. आमच्या इमारतींना तसा धोका नसताना नवीन रहिवाशांना, राजकारणी पुढाऱ्यांना मात्र पुनर्विकास हवा आहे. परंतु त्यांना आमच्या अटी मान्य नाहीत. कोणीही कसलीही 'गॅरेंटी' देत नाहीये. प्रश्न असा, की सोसायटी नाही, लीज डीड नाही तर पुनर्विकास होणार कसा? आम्हा ज्येष्ठांना चिंता आहे, की आमच्या वारसदारांना याचा त्रास होऊ नये. आम्ही काय करावे?
........................................................................................
उत्तर:
जेपर्यंत लीज नावाने होत नाही तोपर्यंत पुनर्विकास करणे अशक्य आहे. आपल्या नावावर असलेल्या जमिनीवरच आपण पुनर्विकास करू शकतो. आणि म्हाडाकडून जमीन लीजवर मिळाल्यावरच तसे होऊ शकते. त्यामुळे म्हाडाकडून लीज मिळण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे वारसांची नावे चढवणे शक्य होईल व एक प्रश्न तरी सुटेल. राजकारणी मंडळी बिल्डरांबरोबर हातमिळवणी करून पुनर्विकासासाठी आपल्या मागे लाग्ली हे नवीन नाही. या मंडळींचे संगनमत हे जगजाहीर आहे. पण कायदा गाळेधारकांच्या बहुमताविषयी बोलतो. त्यामुळे आपण संमती दिल्याशिवाय आपला पुनर्विकास बळजबरीने करणे शक्य नाही. मात्र त्याकरता आपल बाजूने बहुसंख्य लोक राहिले पाहिजेत. ७० टक्क्यांहून अधिकांना पुनर्विकास हवा असेल व आपण ३० टक्क्यात असाल तर मात्र आपल्याला ७० टक्क्याबरोबर राहावे लागेल. रुवातीला आपण जमिनीचे मालक किंवा लीजधारक तरी व्हा आणि आपल्या नावावर जमीन लागली, की मग पुनर्विकासाचा विचार करता येईल व वारसांनही त्रास होणार नाही.