अ‍ॅपशहर

Hsc Exam: बारावीची परीक्षा वर्षातून दोनदा?

Hsc Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या शिफारशी स्वीकारण्यात आल्यास राज्यातील परीक्षांचे स्वरूपही बदलणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स 8 Apr 2023, 10:02 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचना संस्थेने (एनसीएफ) बारावीच्या बोर्ड परीक्षा वैकल्पिक आणि वर्णनात्मक अशा पद्धतीत वर्षातून दोन वेळा घेण्याची शिफारस केली आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले असून, विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मूल्यांकनावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार दहावी व बारावीच्या अंतिम निकालात त्यापूर्वीच्या म्हणजेच अनुक्रमे नववी व अकरावीतील गुणांचाही विचार व्हावा, अशी आखणी करण्यास सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hsc
Hsc Exam: बारावीची परीक्षा वर्षातून दोनदा? वैकल्पिक व वर्णनात्मक पद्धतीची शिफारस


सन २००५नंतर प्रथमच देशातील अभ्यासक्रमासाठी नवी संरचना तयार करण्यात येत आहे. यामध्ये नववी ते बारावीच्या परीक्षांबाबतच्या दूरगामी परिणामकारक शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिफारशी लवकरच सार्वजनिक मंचावर ठेवण्यात येतील व नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्यांवर विचार करून अंतिम परीक्षा रचना करण्यात येणार आहे. परीक्षा रचना आणि अभ्यासक्रम अंतिम झाल्यावर शैक्षणिक वर्ष २०२४पासून ही नवीन पद्धती लागू करण्याचा विचार सुरू आहे. 'एनसीएफ'च्या आराखड्यानुसार बारावीची परीक्षा दोन वेळा घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सध्याच्या पद्धतीत दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेतील गुणांच्या दृष्टीनेच विचार केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण पडतो. तसेच अकरावी आणि बारावीमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांमधील विद्यार्थ्यांना आपल्याच विद्याशाखेतील विषय निवडण्याचे बंधन असते. मात्र नव्या अभ्यासक्रमात याविषयी लवचिकता असेल. आता बहुविद्याशाखीय आणि सर्वांगीण शिक्षणावर भर दिला जाणार असून, अकरावी व बारावीच्या वर्गांची केवळ सायन्स, आर्ट्स किंवा मानव्यविद्या आणि कॉमर्स या शाखांमध्ये विभागणी केली जाणार नाही; तर निरनिराळ्या विद्याशाखांचे ज्ञान एकत्रित प्राप्त व्हावे या उद्देशाने आर्ट्स किंवा मानव्यविद्या, सायन्स, कॉमर्स आणि क्रीडा या विद्याशाखांचा समावेश असलेला बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. सध्याच्या पद्धतीत विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यासावर भर देतात. नव्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्टपणे समजून विषयाचे ज्ञान वाढेल यावर भर दिला जाणार आहे.

'एनसीएफ'ने अभ्यासक्रमांच्या निवडीबाबतही शिफारशी केल्या आहेत. विद्यार्थ्याला अकरावी आणि बारावी या दोन वर्षांत बोर्ड परीक्षा देताना वेगवेगळ्या १६ अभ्यासक्रमांची निवड करता येईल. चार टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम निवडावे लागतील. त्यामध्ये समाजशास्त्र शाखेसाठी इतिहास विषयाची निवड केल्यास विद्यार्थ्याला इतिहास विषयाचे चार अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. त्यानंतर विद्यार्थ्याने विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र विषय निवडल्यास भौतिकशास्त्रातील चार अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. विद्यार्थ्याने गणित शाखा निवडल्यास त्यातील चार अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. तसेच चौथा विषय या तीन विद्याशाखांपैकी किंवा पूर्णपणे भिन्न निवडता येईल, असे या अहवालात म्हटले आहे.


दरम्यान, बारावीची परीक्षा दोन वेळा घेण्यासंदर्भात राज्य सरकारचे अद्याप कोणतेही धोरण ठरलेले नाही. परीक्षा घेण्यासंदर्भात राज्याचे धोरण ठरल्यानंतर त्याची राज्य मंडळाकडून अंमलबजावणी केली जाईल, असे शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी नमूद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज