म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तापाला राज्य सरकार कारणीभूत असून, उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा ते शिक्षण शुल्क भरण्यापर्यंतचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. शिवाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे बालिशपणे व्यक्तव्य करीत असून, त्यांना विद्यार्थ्यांच्या करिअरची काळजी नाही. आदित्य ठाकरे हे राज्यातील विद्यार्थ्यांचा वापर हा व्होट बँक म्हणून करीत असल्याची टीका अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी पत्रकार परिषदेत केली. ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या दरम्यान विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन जनजागृती करणार आहे. यात सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना मागणीचे पत्र देण्यात येणार आहे व त्यांच्याकडून समर्थन पत्र घेण्यात येणार आहे. सर्व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. शुल्क नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावर ५० हजार विद्यार्थ्यांच्या समस्या नोंदवण्यात येणार आहेत.
अभाविप विविध मागण्यांचे पोस्टकार्ड उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पाठवणार आहे. काय आहेत अभाविपच्या मागण्या जाणून घ्या...
सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात; आदित्य ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी
अभाविपच्या मागण्या काय आहेत -
- प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाचे परीक्षा शुल्क परत करावे
- विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शुल्क विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ४ टप्प्यांमध्ये घ्यावे
- महाविद्यालयाच्या एकूण शुल्काच्या ३० टक्के शुल्क यावर्षी कमी करण्यात यावे
- चुकीच्या पद्धतीने लागलेल्या निकालाचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे
- खासगी विद्यापीठांवर शुल्क नियंत्रणासाठी कायदा करावा