अ‍ॅपशहर

सौरऊर्जेचा वृक्ष

शाश्वत विकासाचे लक्ष्य साध्य करताना त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देणे हे एक लक्ष्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून सौरवृक्ष या तंत्रज्ञानावर टाकलेला एक दृष्टिक्षेप. या आधीही आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी व आदित्य सौर मोहीम याची माहिती घेतली होती.

Maharashtra Times 1 Dec 2016, 8:45 am
​ऊर्जाक्षेत्राचे महत्त्व
महाराष्ट्र टाइम्स.कॉम competitive exam solar energy
सौरऊर्जेचा वृक्ष

ऊर्जाक्षेत्राचा विकास हा पायाभूत क्षेत्राच्या विकासाचा एक भाग असल्याने त्याचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे. त्यावर सातत्याने प्रश्न येत असल्याने या क्षेत्रातील घडामोडी आणि येणारे नवीन तंत्रज्ञान यांचा अभ्यास बारकाईने करावा लागेल.

तेजोमय सूर्य
सूर्य हा ऊर्जेचा कधीही न संपणारा स्त्रोत आहे. यासारख्या महत्त्वाच्या स्त्रोताचा प्रभावी वापर केल्यास भविष्याच्या दृष्टीने ऊर्जेसाठीची ती श्‍वाश्‍वत उपाययोजना ठरेल. भारतात वर्षातील ३०० दिवस स्वच्छ ऊन पडते. सूर्यापासून मिळवलेली ऊर्जा ही वापरण्यास स्वच्छ आणि स्वस्त असते. आपण कपडे वाळवायला सौरऊर्जा वापरतोच. परंतु त्याशिवाय वीजनिर्मिती, जलशुद्धीकरण यासाठीही सौरऊर्जेचा वापर करणे शक्य आहे. सौरऊर्जेचा खर्च कमी होत चालला आहे व सध्या प्रति युनिट आठ रुपये इतका येतो. परंतु एक अडचण म्हणजे सौर पॅनल लावायला जागा खूप लागते. भारतासारख्या लोकसंख्येची घनता असलेल्या देशात जागेची टंचाई असते.

संस्थात्मक सहकार्य
सी. एस. आय. आर (वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद)च्या केंद्रीय मेकॅनिकल अभियांत्रिकी संशोधन संस्था (सी. एम. ई. आर. आय) दुर्गापूर, पश्‍चिम बंगाल यांनी सौरऊर्जा वृक्षाचे आरेखन तयार केले आहे. हे आरेखन शहरी तसेच ग्रामीण भागाला लागू पडेल असे तयार करण्यात आले आहे. भविष्यात हे पॅनल दिवसातून दोनदा सूर्याच्या स्थितीनुसार फिरवून १०% जास्तीची ऊर्जा प्राप्त करता येईल. सौर झाडाची आरेखने नावीन्यपूर्ण असतील, ज्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडेल.

भारतात महत्त्वाचे
गेल्या वर्षी पार पडलेल्या पॅरिस हवामान परिषदेमध्ये भारत आणि फ्रान्स यांनी मिळून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. याचे भारतातील मुख्यालय गुरूग्राम येथे आहे. या पार्श्‍वभूमीवर सौर ऊर्जेचा शाश्‍वत विकासाच्या दृष्टिकोनातून विकास करता यावा यासाठी सौरवृक्ष तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका निभावेल यात काही शंका नाही. नुकतीच आपण शाश्‍वत विकासाचे लक्ष्य स्वीकारले आहे आणि ते २०३० पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यामुळे सौरवृक्ष तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरेल.


सौर झाड
जागेच्या टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न म्हणजे सौर झाड. ही संकल्पना म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने वीजनिर्मितीसाठी कमी जागेमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी हाती घेतलेले एक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. सौरवृक्षासाठी चार चौरस फूटापेक्षा कमी जागा लागेल. त्यामधून ५ किलोवॅट ऊर्जा निर्माण होऊ शकते व दोन तासाचे बॅटरी बॅक-अप मिळते. सध्याच्या पद्धतीने ऊर्जा निर्मितीसाठी ४०० चौरस फूट जागा लागते.

तंत्रज्ञान
सौरवृक्ष उभा करण्यासाठी खांब उभा करून त्यावर वृक्षाच्या फांद्यासारखे सौर पॅनेल बसवले जातात. ते उंचवट्यावर बसवल्यामुळे सध्याच्या सौर पॅनेलपेक्षा एक तास जास्त सूर्यकिरण मिळून अधिक वीजनिर्मिती होईल. साधारणतः सध्याच्या सौर पॅनेल पेक्षा १०-१५% जास्तीची ऊर्जा यापासून मिळेल. या पॅनेलच्या स्वच्छतेसाठी स्प्रिंक्लरची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे सौर पॅनेलच्या ऊर्जानिर्मितीची क्षमता वाढेल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज