०००००००००००जंगली महाराज रस्ता हा पुण्यात आदर्श डांबरी रस्ता होता. त्याचेही रुपडे सिमेंटचे केल्यावर नुकत्याच झालेल्या पहिल्या जोरदार पावसात तिथे तळी साठली, वाहनांची रहदारी खोळंबली. हाच प्रकार इतरत्रही अट्टाहासाने बांधलेल्या सिमेंट रस्त्यांवर अनुभवायला मिळाला. या रस्त्यांवर खड्डेही पटकन लक्षात येत नाहीत. भूजल संवर्धन आणि पुनर्भरण म्हणजेच पाणी झेलण्याची क्षमता अन् पाणी मुरण्याची आणि कडेनं निचरा होण्याची व्यवस्था रस्ते बांधतानाच व्हायला हवी ती होत नाही. पावसाळ्यापर्यंत सुरू असलेल्या कामांनी खोदलेले रस्ते, बसथांब्यांना वेढलेल्या पाण्याने रस्त्याच्या मध्यभागापर्यंत थांबलेले प्रवासी, चेंबरची तुटलेली झाकणे ही पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली नाही, हे स्पष्ट करतात. रस्ते बांधणीत पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन अतिशय महत्वाचं वाटतं. इमारती बांधताना अडवल्या गेलेल्या ओढ्या नाल्यांच्या पाण्यालाही इतस्ततः पसरण्यास पावसाळ्यात वाट फुटते.
रस्ते करतानाच भूजल पुनर्भरण व्यवस्था आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2019, 5:42 am