\Bसामना अटळ
नवी दिल्ली -\B काँग्रेस कार्यकारिणीच्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या बैठकीस आता फक्त दोनच दिवस उरले आहेत. पंतप्रधान व सिंडिकेट यांच्यापैकी कोणत्या गटाचे पारडे काँग्रेस संघटनेत जड आहे, त्याचा निर्णय या बैठकीत होईल. प्रतिस्पर्धी गटांनी आपल्या हालचाली जोरात वाढवल्या असून संभाव्य संघर्षासाठी पाठीराखे मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. निजलिंगप्पा यांच्या अध्यक्षपदाची मुदत एका वर्षाने कमी करून नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी महासमितीचे खास अधिवेशन भरवावे, या मागणीला चारशेच्या वर सह्या मिळतील, असा श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पाठीराख्यांचा विश्वास वाटतो. दरम्यान, पंतप्रधानांना भेटण्याचा प्रयत्न मी करणार नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष निजलिंगप्पा यांनी बंगलोरहून येथे आल्यावर आज सायंकाळी सांगितले. कोणालाही भेटण्यास मी नकार मात्र देणार नाही, असेही ते म्हणाले.
\Bटेलिव्हिजन केंद्र
नवी दिल्ली\B - भारत व पश्चिम जर्मनी यांच्यात जो करार झाला, त्यानुसार मुंबईत १९७१ पर्यंत टेलिव्हिजन केंद्र स्थापणे व ते कार्यक्रम पुण्यात पाठवणे शक्य होईल. या कराराद्वारा जर्मनीचे सरकार टेलिव्हिजन प्रक्षेपणाची यंत्रणा मुंबई व पुण्यासाठी पुरवील आणि मुंबईत स्टुडिओ उभारून देईल. त्याशिवाय, तंत्रज्ञ व कार्यक्रम सादर करण्याचे शिक्षणही देण्याची व्यवस्था केली जाईल. सर्व यंत्रसामुग्रीसाठी लागणारे परदेशी चलन जर्मनीकडून देणगीरूपाने मिळणार आहे.
\Bमोफत पाणी
पणजी -\B उपसासिंचन योजनाखाली येणाऱ्या जमिनीला वर्षभर मोफत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय गोव्याच्या दयानंद बांदोडकर मंत्रिमंडळाने घेतला आहे. श्री. बांदोडकर म्हणाले की सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना जो पाण्याचा दर आहे तोच आकारण्याचा विचार होता. परंतु नगदी पिके काढली तरच तो परवडेल, असे आढळल्याने सरकारने विचार बदलला.
(३० ऑक्टोबर, १९६९च्या अंकातून)