अ‍ॅपशहर

सत्तरीनंतरची आव्हाने

स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करीत असताना भारत आज एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गेल्या सत्तर वर्षांचा जमाखर्च मांडताना या वळणाचा, त्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा विचार व्हायला हवा.

Maharashtra Times 15 Aug 2017, 1:01 am
स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करीत असताना भारत आज एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गेल्या सत्तर वर्षांचा जमाखर्च मांडताना या वळणाचा, त्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा विचार व्हायला हवा. भारताच्या व्यापक संकल्पनेला सोडचिठ्ठी देऊन त्याची फेरमांडणी करण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी शक्तींकडून होत असल्याने आणि त्यांना सरकारी आशीर्वाद मिळत असल्याने नवे वळण निर्माण झाले आहे. त्यामुळे समस्त भारतीयांसमोरील आव्हानही मोठे असणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 70th independence day
सत्तरीनंतरची आव्हाने


हजारो वर्षांची परंपरा असलेल्या भारताच्या बहुधार्मिकता, बहुभाषकता आणि बहुसांस्कृतिकता यांतच भारताची संकल्पना सामावली आहे. या बहुविधतेसहितच भारताने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. हिंदू, शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध अशा अनेक धर्मीयांनी देशासाठी रक्त सांडले. त्यांच्या दीर्घ संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट उगवली. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी पाकिस्तानची निर्मिती झाल्याने देशाची फाळणी झाली; परंतु त्यानंतरही भारताने आपल्या बहुसांस्कृतिकतेचा त्याग करून स्वतःला संकुचित केले नाही. संपन्न ऐतिहासिक परंपरेचे जतन करतानाच हा देश लोकशाहीप्रधान, आधुनिक विचारांचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, सेक्युलर आणि मानवतावादी राहील, याची दक्षता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सी. राजगोपालचारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह त्यावेळच्या बहुतेक नेत्यांनी घेतली. या दृष्टिकोनातून साकारलेली राज्यघटना, लोकशाही संस्थांची उभारणी आणि प्राधान्यक्रम ठरवून आखलेले कार्यक्रम यांमुळे विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग या क्षेत्रांत देशाने उल्लेखनीय कामगिरी केली.

दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश स्वतंत्र झाले; परंतु त्यांपैकी बहुतेकांची वाटचाल हुकूमशाहीच्या वा एकाधिकारशाहीच्या वा लष्करशाहीच्या दिशेने झाली. भारत मात्र अतिशय समर्थपणे वाटचाल करीत असून, एक शक्ती म्हणूनही तो उदयाला आला आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्र आणि मंगळाला गवसणी घालणारा भारत हरित क्रांतीद्वारे अन्नधान्य उत्पादनातही स्वयंपूर्ण आहे. नियंत्रित अर्थव्यवस्थेला एका वळणावर निरोप देऊन उदारीकरणाचा मार्ग निवडलेल्या भारताची बाजारपेठ आज साऱ्या जगाला खुणावत आहे. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीमुळे भारताला नवी ओळखही प्राप्त झाली आहे. झपाट्याने विकसित होत असलेल्या भारतासमोरील आव्हानेही वाढली आहेत. चीन आणि पाकिस्तान यांच्या रूपाने असलेली बाह्य आव्हाने कायम असतानाच अंतर्गत आव्हानेही वाढली आहेत. काश्मीरचा प्रश्न उग्र बनला आहे. दहशतवादही कमी झालेला नाही. उदारीकरणामुळे देशात मोठा नवमध्यमवर्ग आकाराला असला, तरी गरिबीही वाढत आहे.

अन्नधान्याचे उत्पादन वाढले असले, तरी शेती संकटात आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. रोजगारनिर्मितीही कमी होत आहे. या आव्हानांचा सामना करण्याची अधिक गरज असताना हिंदू-मुस्लिम तेढ वाढविण्याचे, ध्रुवीकरणाचे, इतिहासाच्या फेरलेखनाचे प्रयत्न होत आहेत. गोरक्षणाच्या मुद्द्यावरून हत्या करण्यापर्यंत मजल जात आहे. दलितांवरील अत्याचार वाढत आहेत. भारताच्या बहुविधतेच्या संकल्पनेला नाकारण्याचाही प्रयत्न होत आहे. हे सारे प्रयत्न देशासाठी घातक आहेत. या प्रयत्नांत असलेल्या शक्तींना त्यांपासून रोखत देशाला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावयाचे असून, आज लाल किल्ल्यावरून बोलताना याबाबत त्यांनी देशवासीयांना आश्वस्त करायला हवे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज