अ‍ॅपशहर

हवाई इष्टापत्ती

करोना काळाने सर्वांनाच अंतर्मुख केले. सामान्यांपुढे मोठे संकट उभे झाले. या अशा दिवसांतही विमान प्रवासाला सोनेरी झळा लाभल्या. या काळाने अनेकांना जमिनीवर आणले.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 19 Aug 2021, 7:37 am
करोना काळाने सर्वांनाच अंतर्मुख केले. सामान्यांपुढे मोठे संकट उभे झाले. या अशा दिवसांतही विमान प्रवासाला सोनेरी झळा लाभल्या. या काळाने अनेकांना जमिनीवर आणले. खुद्द या क्षेत्राचे कंबरडे मोडले. तद्‌वतच अनेकांना हवाई उड्डाणांस बाध्य केले. विमान प्रवास हा श्रीमंतांच्या आवाक्यात असण्याचा एक काळ होता. आता हे चित्र बदलते आहे. छोट्या शहरांदरम्यान विमानफेऱ्या सुरू झाल्याने, अप्राप्य भासणारा हवाई प्रवास सामान्यांना खुणावू लागला आहे. छोटी शहरे जोडली गेल्याने विमान प्रवासासाठी वेळ आणि पैशांची बचत हे मुद्दे प्रभावी ठरले. कमी वेळ आणि कमी थकवा ही विमान प्रवासाची वैशिष्ट्ये आहेत. तिकिटांचे दर आधी सामान्यांना परवडणारे नव्हते. आताही ते परवडणारे आहेत, असेही नाही; तरीही अलीकडच्या काळात विमान कंपन्यांमधील स्पर्धेने सेवेतील उत्तमता जगापुढे आणली. करोनाकाळाचे सावट घोंघावत असतानाही, या वर्षीच्या जानेवारी ते जुलै दरम्यान मुंबई विमानतळावरून तब्बल पाऊण कोटी नागरिकांनी प्रवास केला. या प्रवाशांपैकी ४८ लाख प्रवासी महानगर नसलेल्या ६० शहरांमधून आले होते, हे कळले की जागतिकीकरणाचे वारे भारतात किती वेगाने वाहू लागले आहेत, याची कल्पना येते. श्रेणी-दोनमध्ये मोडणाऱ्या शहरांमधील हवाई वाहतूक वाढली आहे. या छोट्या शहरांमधील हवाई प्रवाशांची संख्या ६४ टक्क्क्यांवर गेल्याने, सामान्यांनी विमान प्रवास स्वीकारला असल्याचे चित्र निर्माण झाले. लॉकडाउनकडून पुन्हा सामान्य वावराकडे अशी स्थिती राज्यभर येईल ही सुचिन्हे असताना, विमान प्रवासाची आकडेवारी वाढल्याची सुवार्ता आली आहे. टाळेबंदीत देशाने मोठी घुसमट अनुभवली. केवळ वाहतुकीच्या नव्हे, तर सार्वजनिक वावराच्या कालावधीवर मर्यादा आल्याने, सर्वांनाच एका अनामिक भीतीने वेढले होते. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या काळात अनेक कंपन्यांनी घरून काम करण्याची मुभा दिल्याने, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. दुसऱ्या लाटेने एकीकडे धास्ती वाढविली असतानाच, वाढत्या विमान फेऱ्यांनी गावे जवळ आणली. आधी मुंबईवरून दिल्ली किंवा चेन्नई, कोलकाता गाठून इच्छितस्थळी पोहोचावे लागायचे. आता थेट पोहोचू शकू अशी छोटी शहरे विमानमार्गांनी जोडली गेली. कमी वेळात घरापर्यंत पोहोचण्याच्या संधीला बहुतेकांनी पसंती दिली. त्यातून फेऱ्या वाढल्या आणि प्रवाशांची सोयदेखील. कंपन्यांच्या उत्पन्नावरही सकारात्मक परिणाम झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम airoplane


करोनापूर्व काळात लहान शहरांमधून प्रवासी नसल्याने, अनेक विमाने रिकाम्या जागांसह रवाना व्हायची. करोना काळात छोट्या शहरांमधील प्रवासी घेऊन पूर्ण क्षमतेने उड्डाण करण्याचे चित्र विमान कंपन्यांनी अनुभवले. महानगरातील विमानतळांइतकी नसली, तरी तुलनेत लहान शहरांतील विमानतळे व्यग्र जाणवली. महानगरांमधील वावर अभूतपूर्व क्षमतेने घटण्यामागे आरोग्याची काळजी होती. तिकडची वाहतुकीतील घट छोट्या शहरांनी आश्वासकपणे भरून काढली, ही सकारात्मक बाजू म्हणायला हवी. उदाहरणच द्यायचे झाल्यास, मागील वर्षी मुंबई विमानतळाने प्रवासी संख्येत ७१ टक्क्यांची घट नोंदविली होती. त्याचवेळी लखनौच्या प्रवासी संख्येत ५७ टक्क्यांची कमतरता होती. रायपूरमध्ये ही टक्केवारी ५१ होती. पठाणकोटमध्ये केवळ १३ टक्के. छोट्या शहरांची ही उजवी बाजू अधोरेखित झाली. करोना काळात सामना करावा लागण्यापूर्वी मुंबई विमानतळावरून २४ तासांत ९५० विमाने झेपावत असत. आता ही संख्या ३०० झाली असली, तरी लहान शहरांमधील विमानसेवेचा प्रारंभ ही छोट्या शहरांसाठी एक प्रकारची इष्टापत्तीच ठरली. करोनाच्या दिवसांत केवळ विमान वाहतुकीचे चित्र बदलले नाही, तर या क्षेत्रात आश्वासक परिवर्तनही घडून आले.

मधल्या काळात खरे तर विमान प्रवास महागला. करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विमान कंपन्यांना साह्य करण्याच्या दृष्टीने तिकीट दर वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे सरकारने स्पष्ट केले होते. येत्या काळात हवाई प्रवाशांच्या सोयीसाठी दर तासाच्या, म्हणजे ५० किलोमीटर अंतरावर एक हेलिपॅड आणि दर दोन तासांच्या अंतरावर एक विमानतळ असावे, असे लक्ष्य सरकारने निर्धारित केले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने याविषयीची सर्वंकष योजना आखली आहे. केंद्र सरकारनेही 'व्हिजन २०४०' व 'एअर कार्गो' धोरण घोषित केले. पुढील २० वर्षांत देशपातळीवर विमान वाहतूक रंगतदार बनणार असेल, तर त्यात महाराष्ट्राचाही वाटा महत्त्वाचा ठरणार आहे. हेलिपॅड आणि विमानतळांच्या विस्तारासाठी पुढील दोन वर्षांत प्रकर्षाने लक्ष दिले जाणार आहे. साधारणत: २०३०पर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्हा हवाईमार्गे जोडण्याचा प्रयत्न असेल. अडचणी असतानाही सामान्यांना हवाईसफर आपलीशी वाटू लागण्याच्या या बदलाचे स्वागत व्हायला हवे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज