यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चांगलेच गाजले. त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज बुलंद करण्यासाठीचा प्रज्ञावंतांचा बहिष्कार होता, तसाच भरगच्च उपस्थितीमधून उमटलेला सामान्य रसिकांचा सामूहिक उच्चारही. या दोन्ही टोकांना सांभाळत संमेलन पार पडले. हा साहित्यमेळा शेतकरी आत्महत्यांमुळे राज्यभर ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळात होता. मंत्रिमंडळात वाद वाढवायचा नसल्याने महाराष्ट्राला अद्याप स्वतंत्र कृषिमंत्री मिळालेला नाही. वाद शमविण्यासाठी का होईना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाची पणती पेटविण्याचा मान शेतकरी महिलेकडे आला. शेतीहिताचे निर्णय सरकारमधील असोत की बाहेरचे; शेतकऱ्यांवरील मालकी कुणाच्या तरी पसंतीने ठरते हे विदारक वास्तवही संमेलनाच्या निमित्ताने अधोरेखित झाले. या सन्माननीय संक्रमणाचे सकारात्मक पडसाद राज्यातील दु:खतप्त बळीराजापर्यंत पोहचले तर यामागे खरोखर राजकारणापल्याडचा भाव होता, असे संकेत दृढ होतील.
संमेलनाध्यक्ष, महामंडळ अध्यक्ष आणि उद्घाटक अशी तीनही सूत्रे महिलांकडे येण्याचा योग जुळला. नयनतारा सहगल यांना नकार कळविण्याच्या आयोजकांच्या निर्णयाचा चहुबाजूने कणखर निषेध झाला, हे बरे झाले. या पापाचे धनी कोण हा प्रश्न महामंडळ आणि आयोजकांमधील फैरींनी कमालीचा संदिग्ध बनवून ठेवला आहे. संमेलनाचे सूप वाजल्यानंतरही संभ्रमित अवस्था कायम ठेवण्यात साहित्यसंस्थांमधील राजकारण्यांना यश मिळाले आहे. संमेलनाध्यक्षांचा देहस्वभाव संयत आणि विवेकी आहे. तो त्यांच्या भाषणातूनही प्रकटला. आपले भवताल आक्रस्ताळी असले तरी तो कल्लोळ तशाच कठोर वाणीत उमटायला हवा असे नाही, ही भावना त्यांनी यापूर्वीही मांडली होती. संमेलनात तेच सुबुद्ध संवादीपण त्यांच्या भूमिकेतून प्रतीत झाले.
मान्यवरांच्या बहिष्कारवादामुळे काहीसे गढूळलेले वातावरण रसिकांच्या भरगच्च उपस्थितीने धुवून निघाले. सकाळी नऊपासून सुरू झालेल्या कविकट्ट्यावरील रात्री बारापर्यंतची वर्दळ सुखद धक्का देणारी होती. आसनव्यवस्थेचा अंदाज चुकला हे आयोजकांना मान्य करावे लागले. काही परिससंवादांला वक्ते कमी होते, पण श्रोत्यांची दाद वाखाणण्याजोगी होती. 'आमची चूक झाली, आम्हाला माफ करा', असे कळविण्याचा उमदेपणा आयोजकांनी नयनतारा सहगल यांना दाखविला. 'मला वाईट वाटले आहे. मी संमेलनाला मनापासून शुभेच्छा देत आहे', अशा आशयाचा लेखी संदेश पाठवून आयोजकांना समर्थ साथ देण्याचा व्यक्तिगत पुढाकार सहगल यांनीही घेतला. मोठेपण असे वर्तणुकीतून झळकले की आदर दुणावतो. या तुलनेत सहगल यांच्या अवमानाखातीर आयोजकांचे निमंत्रण नाकारणाऱ्या निवडक ज्येष्ठ लेखकांनी मात्र आपल्या घोषित बहिष्काराची माहिती आयोजकांना कळविण्याचे सौजन्यही दाखविले नाही. विरोधी भूमिका घेतानाही ती एकतर्फी नसावी याची सार्थ जाणीव या संमेलनाने करून दिली.
सामूहिक झुंडशाहीपुढे नमते न घेण्याचे अध्यक्षांचे आवाहन समस्त मराठीजनांना भावले. मीपणावर त्यांनी केलेले प्रहारही रसिकांनी उचलून धरले. अशी सुसंस्कृत धिटाई लोकांना आवडते. विश्वाचा पसारा खुला होत असतानाच माणसाची अशक्तपणाची आणि एकटेपणाची जाणीव गडद होत चालल्याची खंत अरुणा ढेरेंनी मांडली. संमेलन आटोपल्यामुळे एखाद्या कृतीचे समर्थन किंवा विरोध संपेल असे नाही. माणसांमधील भेद प्रखर करणारी संघर्षरत मांडणी दूर ठेवून एकमय जगाच्या दिशेने समाज आणि संस्कृती चालवणे गरजेचे असल्याचे संमेलनाध्यक्षांचे आवाहन फार महत्त्वाचे आहे. त्यात खोल अर्थ दडला आहे. भीती काल्पनिक आहे आणि सत्य हीच खरी शक्ती आहे, हा 'महाराष्ट्रभूषण' डॉ. राणी बंग यांनी भिनविलेला विश्वासही तेवढाच महत्त्वाचा. तो तळापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. गडचिरोलीसारख्या अरण्य प्रदेशात राहायचे, तर आम्हाला कर द्यावा लागेल ही माओवाद्यांची मागणी धुडकावल्याचा अनुभव बंग यांनी सांगितला. तो अभिनंदनीय आहे. अन्य संस्था तसा कर माओवाद्यांना देतात, ही त्यांची माहिती धक्कादायक आहे. सरकारने ती गांभीर्याने घ्यायला हवी. राज्यातील अशा समांतर सरकारचे अस्तित्व लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान देणारे आहे.
साहित्य संमेलनात सर्वांच्या साक्षीने केलेला हा गौप्यस्फोट मुख्यमंत्री किती मनावर घेतात ते बघावे लागेल. साहित्यिकांच्या वादात राज्याच्या नेतृत्वाने मात्र संमेलनाकडे पाठ फिरवली. अभिजात मराठीचा आग्रह संमेलनातून प्रवाहित झाला. बृहन्महाराष्ट्र भाषाविभागाची मागणी गरजेचीच होती. अठरावे वर्ष पूर्ण केल्यानंतर निराश्रित बालकांना शासकीय बालसुधारगृहातून बाहेर काढण्याचा कायदा आहे. पुनर्वसनाचा प्रश्न सुटेपर्यंत ही व्यवस्था कायम ठेवावी, या ठरावातून संमेलनाने एकप्रकारे समाजव्रती शंकरबाबा पापळकर यांच्या कळकळीला मानवंदना दिली. बहिष्कार घालणाऱ्यांना त्यांच्या कृतीचे स्वातंत्र्य होते. आयोजकांच्या परिश्रमांनाही दाद द्यायला हवी. विश्वात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या विवेकी विचारवंतांना एकमयतेच्या दिशेने नेण्याची प्रेरणा मायमाराठीने सर्वांना द्यावी, हीच अपेक्षा….
संमेलनाध्यक्ष, महामंडळ अध्यक्ष आणि उद्घाटक अशी तीनही सूत्रे महिलांकडे येण्याचा योग जुळला. नयनतारा सहगल यांना नकार कळविण्याच्या आयोजकांच्या निर्णयाचा चहुबाजूने कणखर निषेध झाला, हे बरे झाले. या पापाचे धनी कोण हा प्रश्न महामंडळ आणि आयोजकांमधील फैरींनी कमालीचा संदिग्ध बनवून ठेवला आहे. संमेलनाचे सूप वाजल्यानंतरही संभ्रमित अवस्था कायम ठेवण्यात साहित्यसंस्थांमधील राजकारण्यांना यश मिळाले आहे. संमेलनाध्यक्षांचा देहस्वभाव संयत आणि विवेकी आहे. तो त्यांच्या भाषणातूनही प्रकटला. आपले भवताल आक्रस्ताळी असले तरी तो कल्लोळ तशाच कठोर वाणीत उमटायला हवा असे नाही, ही भावना त्यांनी यापूर्वीही मांडली होती. संमेलनात तेच सुबुद्ध संवादीपण त्यांच्या भूमिकेतून प्रतीत झाले.
मान्यवरांच्या बहिष्कारवादामुळे काहीसे गढूळलेले वातावरण रसिकांच्या भरगच्च उपस्थितीने धुवून निघाले. सकाळी नऊपासून सुरू झालेल्या कविकट्ट्यावरील रात्री बारापर्यंतची वर्दळ सुखद धक्का देणारी होती. आसनव्यवस्थेचा अंदाज चुकला हे आयोजकांना मान्य करावे लागले. काही परिससंवादांला वक्ते कमी होते, पण श्रोत्यांची दाद वाखाणण्याजोगी होती. 'आमची चूक झाली, आम्हाला माफ करा', असे कळविण्याचा उमदेपणा आयोजकांनी नयनतारा सहगल यांना दाखविला. 'मला वाईट वाटले आहे. मी संमेलनाला मनापासून शुभेच्छा देत आहे', अशा आशयाचा लेखी संदेश पाठवून आयोजकांना समर्थ साथ देण्याचा व्यक्तिगत पुढाकार सहगल यांनीही घेतला. मोठेपण असे वर्तणुकीतून झळकले की आदर दुणावतो. या तुलनेत सहगल यांच्या अवमानाखातीर आयोजकांचे निमंत्रण नाकारणाऱ्या निवडक ज्येष्ठ लेखकांनी मात्र आपल्या घोषित बहिष्काराची माहिती आयोजकांना कळविण्याचे सौजन्यही दाखविले नाही. विरोधी भूमिका घेतानाही ती एकतर्फी नसावी याची सार्थ जाणीव या संमेलनाने करून दिली.
सामूहिक झुंडशाहीपुढे नमते न घेण्याचे अध्यक्षांचे आवाहन समस्त मराठीजनांना भावले. मीपणावर त्यांनी केलेले प्रहारही रसिकांनी उचलून धरले. अशी सुसंस्कृत धिटाई लोकांना आवडते. विश्वाचा पसारा खुला होत असतानाच माणसाची अशक्तपणाची आणि एकटेपणाची जाणीव गडद होत चालल्याची खंत अरुणा ढेरेंनी मांडली. संमेलन आटोपल्यामुळे एखाद्या कृतीचे समर्थन किंवा विरोध संपेल असे नाही. माणसांमधील भेद प्रखर करणारी संघर्षरत मांडणी दूर ठेवून एकमय जगाच्या दिशेने समाज आणि संस्कृती चालवणे गरजेचे असल्याचे संमेलनाध्यक्षांचे आवाहन फार महत्त्वाचे आहे. त्यात खोल अर्थ दडला आहे. भीती काल्पनिक आहे आणि सत्य हीच खरी शक्ती आहे, हा 'महाराष्ट्रभूषण' डॉ. राणी बंग यांनी भिनविलेला विश्वासही तेवढाच महत्त्वाचा. तो तळापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. गडचिरोलीसारख्या अरण्य प्रदेशात राहायचे, तर आम्हाला कर द्यावा लागेल ही माओवाद्यांची मागणी धुडकावल्याचा अनुभव बंग यांनी सांगितला. तो अभिनंदनीय आहे. अन्य संस्था तसा कर माओवाद्यांना देतात, ही त्यांची माहिती धक्कादायक आहे. सरकारने ती गांभीर्याने घ्यायला हवी. राज्यातील अशा समांतर सरकारचे अस्तित्व लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान देणारे आहे.
साहित्य संमेलनात सर्वांच्या साक्षीने केलेला हा गौप्यस्फोट मुख्यमंत्री किती मनावर घेतात ते बघावे लागेल. साहित्यिकांच्या वादात राज्याच्या नेतृत्वाने मात्र संमेलनाकडे पाठ फिरवली. अभिजात मराठीचा आग्रह संमेलनातून प्रवाहित झाला. बृहन्महाराष्ट्र भाषाविभागाची मागणी गरजेचीच होती. अठरावे वर्ष पूर्ण केल्यानंतर निराश्रित बालकांना शासकीय बालसुधारगृहातून बाहेर काढण्याचा कायदा आहे. पुनर्वसनाचा प्रश्न सुटेपर्यंत ही व्यवस्था कायम ठेवावी, या ठरावातून संमेलनाने एकप्रकारे समाजव्रती शंकरबाबा पापळकर यांच्या कळकळीला मानवंदना दिली. बहिष्कार घालणाऱ्यांना त्यांच्या कृतीचे स्वातंत्र्य होते. आयोजकांच्या परिश्रमांनाही दाद द्यायला हवी. विश्वात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या विवेकी विचारवंतांना एकमयतेच्या दिशेने नेण्याची प्रेरणा मायमाराठीने सर्वांना द्यावी, हीच अपेक्षा….