अ‍ॅपशहर

बेतालांची रसवंती

भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत लोकशाहीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात ज्या पक्षाची केंद्रात सत्ता आहे तो पक्ष लोकशाहीच्या मंदिरात आचार, विचार आणि उच्चार स्वातंत्र्याचे जे दिवे लावतो किंवा पाजळतो आहे

Maharashtra Times 27 Dec 2017, 5:03 am
भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत लोकशाहीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात ज्या पक्षाची केंद्रात सत्ता आहे तो पक्ष लोकशाहीच्या मंदिरात आचार, विचार आणि उच्चार स्वातंत्र्याचे जे दिवे लावतो किंवा पाजळतो आहे, त्यांच्या प्रकाशात सगळा सामाजिक, राजकीय आसमंत उजळून निघतो आहे. पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर तोंडातून ब्र काढायची कोणाची हिंमत नाही, असे म्हटले जाते. मात्र, त्यांच्या माघारी अनेकांच्या तोंडून ब्र ऐवजी ब बाहेर पडतो आणि त्याचे बरळणे कधी होते ते त्यांच्या स्वतःच्याही लक्षात येत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम angry over doctors absence from event hansraj ahir tells them to join naxals so they can be shot
बेतालांची रसवंती


चंद्रपूरचे खासदार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि आपला शेजारी असलेल्या कर्नाटकमधील उत्तर कन्नडाचे खासदार, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांची सोमवारची वक्तव्ये याची साक्ष देतात. दोन मंत्री आपल्या जिभा सैल सोडतात, म्हटल्यावर पक्षातील लहान-सहान नेत्यांनाही आपोआपच हुरूप येतो. भाजपचे राजस्थानातील रामगढचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांना गोमातेच्या प्रेमाचे भरते आले आणि आपले नाव सार्थकी लावत त्यांनी कायद्याची भिंत स्वतःच चालवण्याचा प्रयत्न केला. दोन वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत याचा राग येऊन अहिर यांनी त्या अधिकाऱ्यांना माओवादी व्हा आणि बंदुकीच्या गोळ्या खा, असा सल्ला दिला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचा मुहूर्त साधून हा कार्यक्रम आखला होता. वाजपेयी यांच्या वाणीची रसवंती वाहू लागली की ती विरोधकांनाही सहजगत्या कह्यात घेत असे. त्यांच्या जन्मदिवशी हंसराज अहिर यांनी बेसूर होऊन गायलेला हा ‘अहिर भैरव’ मैफलीचा रसभंग करून गेला. पद जेवढे मोठे, तेवढी जबाबदारी अधिक असते.

सार्वजनिक ठिकाणी कोण काय बोलतो, कसा वागतो याची नोंद घेतली जात असते. परंतु मोदींच्या लोकप्रियतेचे पंख घेऊन उडणारे हंसराज जमिनीवरील वास्तव विसरले. आपल्या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसतील तर मंत्र्याने त्याची नोंद घेणे आणि त्याचा जाब विचारणे, यात काहीच चूक नाही. परंतु जाब विचारण्याची पद्धत काय आहे, यावरून त्या व्यक्तीची राजकीय संस्कृती कळते. पंतप्रधान मोदी हे आपला कारभार पारदर्शक असल्याचे सतत सांगत असतात. बहुधा त्यापासून प्रेरणा घेऊनच अहिर यांनी जाहीरपणे या शाब्दिक फैरी झाडल्या असाव्यात. मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी अनंतकुमार हेगडे यांनी तर ‘अनंता तुझे गोल तारे तुझे’ या ओळीची आठवण करून देत तारेच तोडले. भाजपमध्ये सेक्युलर या शब्दाची अनेकांना अॅलर्जी आहे, हे आता लपून साहिलेले नाही. ‘भाजप सत्तेवर आला आहे तो घटना बदलण्यासाठीच. आम्ही ती लवकरच बदलू. सेक्युलर असणे, हे माय-बाप नसल्यासारखे असते.’ अशा अर्थाची वाक्ये हेगडे बोलले. त्याला तारे तोडणे, हाच एकमेव योग्य शब्द आहे. २०१९कडे जाताना मोदी यांच्या मार्गात काँग्रेस किंवा राहुल गांधी हा अडथळा नसून त्यांचे असे सहकारी हाच मोठा आणि प्रमुख अडथळा असेल. अर्थात, यापूर्वी अशा बेताल वक्तव्यांवर काहीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे, ती आताही बहुधा होणार नाहीच.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज