अ‍ॅपशहर

लष्करातील लक्तरे

भारतीय सैन्यदलांविषयी नागरिकांमध्ये अत्यंत अभिमानाची आणि आदराची भावना आहे. त्यामुळेच, दरवर्षी अर्थसंकल्पात सैन्यदलांविषयी कितीही वाढीव तरतूद झाली तरी त्याविषयी क्वचितच टीकेचा सूर उमटतो.

Maharashtra Times 28 Feb 2017, 4:00 am
भारतीय सैन्यदलांविषयी नागरिकांमध्ये अत्यंत अभिमानाची आणि आदराची भावना आहे. त्यामुळेच, दरवर्षी अर्थसंकल्पात सैन्यदलांविषयी कितीही वाढीव तरतूद झाली तरी त्याविषयी क्वचितच टीकेचा सूर उमटतो. त्याचप्रमाणे, मोठ्या सौद्यांमधल्या दलालीची प्रकरणे कधीमधी बाहेर येत असली तरी लष्करात वरपासून खालपर्यंत इतर भारतीय समाजाप्रमाणेच होत असणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल फारसे कधी बोलले जात नाही. इतके की, आपल्याला कदान्न खावे लागते, असे कॅमेऱ्यासमोर म्हणणाऱ्या जवानावरही नागरिक खरपूस टीका करतात. आता सैन्यदलातील संरक्षणेतर सेवांसाठी असणाऱ्या चाचणी परीक्षेचे पेपर फुटले आणि या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही पेपरफुटी सैन्यातील केवळ कर्मचारी नव्हे तर काही अधिकारीही सामील असल्याशिवाय घडू शकत नाही. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलिसांनी हुशारीने कारवाई केली म्हणून हे कुभांड उघडे पडले. पण याआधीही सैन्यदलातील तांत्रिक अथवा इतर मुलकी पदांसाठी घेतल्या गेलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले नसतील, असे सांगवत नाही. किंबहुना, ते झाले असतील तरी कधी उघड झाले नसावेत. आता ते झाले. पोलिस पथकांनी गेल्या दोन दिवसांत जो तपास केला, त्यावरून लष्करातील माहितगारांनीच हे पेपर फोडण्याचे दुष्कर्म केले, हे लक्षात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम army paper leak
लष्करातील लक्तरे


रविवारचा परीक्षेचा पेपर आणि पुण्यात हडपसर येथील एका हॉलमध्ये मध्यरात्री इच्छुकांना देण्यात आलेला पेपर हा तंतोतंत सारखा आहे. ही शंभर गुणांची परीक्षा सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांची होती. तिचा दर्जा शालान्त परीक्षेचा होता. इतकी सोपी परीक्षा असताना उमेदवारांना आधीच प्रश्नपत्रिका मिळविण्याची आस का लागावी? की हे छुपे व्यवहार केवळ पेपर देण्यापुरते मर्यादित नसतात? काही उमेदवारांकडे आरोपींनी दोन लाखांची मागणी केल्याचे चौकशीत उघड झाले. याचा अर्थ, हे रॅकेट केवळ परीक्षेपुरते नसून पुढच्या नेमणुकांपर्यंतही असू शकते. आधी पेपर मिळाल्याने काही उत्तरे तरी लिहायची आणि नंतर त्याच उमेदवारांना मुलाखतीत बोलावून उत्तीर्ण करून टाकायचे, असे तर हे कारस्थान नाही ना, याचा तपास पोलिसांनी कसून करावा. नागपूर, पुणे, मुंबई, गोवा येथे ही परीक्षा पार पडली. मात्र, त्यासाठी देशातल्या अनेक राज्यांमधून तरुण आले होते. या तरुणांना म्हणे एजंट रेल्वे स्टेशनवर उतरताक्षणी गाठत होते व पेपर ठेवलेल्या सभागृहात घेऊन जात होते. मात्र, अनेक शहरांमध्ये पसरलेले हे गुन्हेगारी जाळे पाहता ही कार्यपद्धती इतकी सोपी व गावठी नसणार. अनेक उमेदवारांना प्रत्यक्ष परीक्षेच्या गावांत पोहोचण्यापूर्वीच सारी सामग्री मिळालेली असू शकते. भारतीय जवान तसेच अधिकारी उणे ४० अंश सेल्सियस तापमानापासून सर्व प्रकारच्या प्रतिकूल स्थितीत देशाच्या संरक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन सीमेवर उभे असतात. असे भ्रष्टाचार घडणे हा त्यांचा घोर अपमान आहे. आमच्या सैन्यदलांमध्ये भ्रष्टाचारच नाही, असे वृथा समर्थन करण्यापेक्षा जो असेल तो भ्रष्टाचार आम्ही खणून काढू व संपवू, अशी भूमिका घेतली पाहिजे. संरक्षणमंत्री व इतर वरिष्ठ अधिकारी या पेपरफुटी प्रकरणाकडे तशा गांभीर्याने पाहतील, अशी अपेक्षा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज