प्रतिजैविकांचा असाच बेबंद वापर होत राहिला, तर ती निष्प्रभ होत आपण परत प्रतिजैविकांचा शोध लागण्यापूर्वीच्या असहाय्य अशा अवस्थेत पोहोचू.
......................................................................................
बेबंद वापराने प्रतिजैविके निष्प्रभ?
प्रतिजैविके ही आरोग्य व औषध क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत असतात. रोगनियंत्रण, उपचार आणि मृत्यूदर कमी करण्यात त्यांचा मोठाच वाटा आहे. मात्र असे असले, तरी 'अॅन्टिबायोटिक रेझिस्टन्स' हा २०१९ ह्या वर्षात जागतिक आरोग्यासाठी सगळ्यात मोठा धोका असेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) दिला आहे. गेली काही वर्षे या बाबतीत वरचेवर चर्चा होऊनही प्रतिजैविकांचा बेबंद वापर होतच राहिला त्यामुळे प्रतिजैविके निष्प्रभ होत चालली आहेत. असेच चालत राहिले, तर आपण परत प्रतिजैविकांचा शोध लागण्यापूर्वीच्या असहाय्य अशा अवस्थेत पोहोचू. एका बाजूला वैद्यकीय क्षेत्रातील अफाट प्रगती, अवयव प्रत्यारोपण (ऑर्गन ट्रान्सप्लान्टेशन), क्लोनिंग इत्यादी अशी एकेक पायरी चढत असताना जंतूसंसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रतिजैविकेच उपलब्ध नाहीत अशी भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते.
ओ.ई.सी.डी. (ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन आणि डेव्हलपमेंट, फ्रान्स, हेडक्वॉर्टर) या पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नोव्हेंबर २०१८च्या अहवालानुसार मल्टी ड्रग रेझिस्टंट जंतूंच्या संसर्गाचा दर प्रगत राष्ट्रांमध्ये १७ टक्के आहे परंतु, हाच दर प्रगतशील देशांमध्ये (भारत, चीन इत्यादी.) ४० टक्क्यापर्यंत आहे. जागतिक पातळीवर रुग्णालयीन संक्रमणाचे (हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शन) प्रमाण ८ टक्के असल्याचे विविध अभ्यासांनुसार आढळून आले आहे. एस.जी.पी.जी.आय. ह्या नामांकित संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील एम्स, न्यू दिल्ली, एस.जी.पी.जी.आय., लखनऊ, उत्तर प्रदेश ह्या दोन्ही रुग्णालयांत हेच प्रमाण २० टक्के आहे. तसेच उत्तर प्रदेशातील सरकारी हॉस्पिटलांमध्ये हेच प्रमाण ४० टक्के आहे. ह्याचा अर्थ साधारणपणे १०० पैकी ४० रुग्णांना हॉस्पिटलमध्ये संक्रमण होते. खूपदा रुग्ण उपचारासाठी येतो एका आजारामुळे व दगावतो दुसऱ्या आजारामुळे (कारणामुळे), ज्यात रुग्णालयात होणारे सूक्ष्मजंतू संक्रमण (हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शन) हे महत्त्वाचे कारण असते.
'अॅन्टिबायोटिक रेझिस्टन्स'चा धोका कमी करण्यासाठी प्रतिजैविकांचा योग्य व सुजाण वापर करणे हे आवश्यक आहे. त्याचबरोबर इस्पितळामध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण नीट न केल्यास जंतूंचा प्रादुर्भाव व प्रसार होतो आणि ह्याचबरोबर रुग्णांना 'नोसोकोमियल इन्फेक्शन'ला सामोरे जावे लागते. आरोग्यसेवेतील संक्रमण ही अत्यंत महत्त्वाची, दूरगामी व सर्वदूर आघात करून परिणाम करणारी समस्या बनली आहे. त्यामुळे रुग्णालयीन मुक्काम वाढतो, जंतूंवर प्रतिजैविकांचा परिणाम कमी होतो अथवा 'अॅन्टिबायोटिक रेझिस्टन्स' वाढते आणि पर्यायाने रुग्णालयीन खर्चातही प्रचंड प्रमाणात वाढ होते. रुग्णसेवेचा कालावधी वाढल्यामुळे इतर गरजू रुग्णांना सेवेचा लाभापासून वंचित रहावे लागते. त्याशिवाय रुग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक विवंचना वाढते, प्रसंगी कर्जबाजारीदेखील व्हावे लागते. ह्याचे दूरगामी परिणाम समाजालादेखील भोगावे लागतात आणि राष्ट्राची हानी तर होतेच. अॅन्टिबायोटिक्सचा अतिरिक्त तसेच अवाजवी वापर वाढीस लागतो.
'अॅन्टिबायोटिक रेझिस्टन्स' व 'हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शन' ह्या दोन्ही समस्या सध्या भारतातील बऱ्याच रुग्णालयांना भेडसावत आहेत. रुग्णालयांत येणाऱ्या 'अॅन्टिबायोटिक रेझिस्टंट जिवाणू' ह्यांचे संक्रमण झालेल्या रुग्णांपासून इतर रुग्णांना त्यांचा प्रसार होतो आणि ते जीवघेणेसुद्धा ठरू शकते म्हणूनच, रुग्णालयांत संक्रमणांचे नियंत्रण व प्रतिबंध अत्यंत आवश्यक आहेच तसेच हा रुग्णसुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा घटकदेखील आहे. 'जंतूसंक्रमण नियंत्रण' व 'प्रतिबंध' हा केवळ रुग्णसेवेसाठी एक प्रतिसाद न राहता अत्यावश्यक वैद्यकीय रुग्णसेवेसाठी अत्यंत मूलभूत बाब आहे. काही विकसित देशांमध्ये जर एखाद्या मेडिकल इन्शुरन्स असलेल्या रुग्णाला हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शन झाले, तर त्याच्यामुळे होणाऱ्या जादा खर्चाची नुकसानभरपाई रुग्णालयास करावी लागते.
रुग्णालयात रुग्ण व आरोग्य कर्मचारी ह्यांचा प्रत्यक्ष स्पर्श होऊन जंतूप्रसार होऊ शकतो. तसेच रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा, रुग्णशय्येवरील कपडे व उपकरणांशी निगडित कपडे इत्यादींच्या जंतूसंपर्कांमुळे जंतूप्रसार होतो. रुग्णसंपर्कात येणाऱ्या वस्तू, उपकरणे यांच्या होणाऱ्या परिणामांचा विचार करून त्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते हे चार दशकांपूर्वी 'अर्ल स्पॉल्डींग' या शास्त्रज्ञाने तर्कशुद्ध पद्धतीने दाखवून दिले आहे.
जंतूसंक्रमणासाठी जबाबदार असणाऱ्या वस्तू अथवा उपकरणे रुग्णांच्या शरीरात शिरेत / प्रवेश करतात. ह्या वस्तू जंतूविरहीत न केल्यास गंभीर जंतूसंक्रमण होण्याची शक्यता असते आणि अशा वस्तूंना 'क्रिटिकल' समजण्यात येते. त्यांचे वापरण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी उपकरणे, कॅथेटर्स, इम्प्लांट्स इत्यादींचा ह्या प्रकारात समावेश होतो. 'सेमीक्रिटिकल' वस्तू ह्या रुग्णाच्या शरीराच्या त्वचा व तत्सम आवरणांच्या संपर्कात येणाऱ्या वस्तू असतात. भूल देण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे ह्या प्रकारात येतात, त्यांचेही उच्च दर्जाचे जंतूनिर्मूलन करणे गरजेचे असते. 'नॉन क्रिटिकल' या प्रकारात वस्तू रुग्णाच्या केवळ त्वचेच्या संपर्कात येतात. उदाहरणार्थ बेडपॅन, रक्तदाब मोजण्याचे उपकरण, थर्मामीटर इत्यादी. रुग्णशय्या, रुग्णाजवळचे टेबल, फर्निचर, रुग्णकक्षातील फरशी वगैरे यांचा रुग्णाशी अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संपर्क होत असतो. वरील गोष्टींची स्वच्छता व निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे न केल्यास रुग्णांच्या सभोवतीच्या वातावरणातील जंतूभार वाढतो. त्यामुळे संसर्ग व संक्रमण ह्याचा धोका वाढतो.
'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन' (WHO) व सी.डी.सी., अॅटलांटा अशा जागतिक संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार रुग्णालयात होणारा ८० टक्के जंतूप्रसार हा हातांच्यामार्फत होतो असे सिद्ध झाले आहे. WHO ऑर्गनायझेशनचे २०१८चे बोधवाक्य आहे, 'अॅन्टिबायोटिक रेझिस्टन्सच्या लढाईत हॅन्ड हायजिन हा सर्वोत्तम बचाव आहे कारण तो तुमच्याच हातात आहे.' ह्या ऑर्गनायझेशनने सर्व देशांना आवाहन केले आहे की, हातांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण (हॅन्ड हायजिन) हे आरोग्यसेवेचे (प्राथमिक ते सुपरस्पेशालिस्ट) अविभाज्य घटक आहेत आणि हॅन्ड हायजिनच्या प्रभावशाली मार्गाने जंतूसंसर्ग रोखणे सहज शक्य आहे. 'शस्त्रक्रियेपूर्वी', 'शस्त्रक्रियेदरम्यान' व 'शस्त्रक्रियेनंतर' जखमेची काळजी घेऊन जंतूसंसर्ग न होऊ देणे हे रुग्णसुरक्षतेसाठी अत्यावश्यक आहे. जंतूसंसर्ग हे बालमृत्यूचेही एक महत्त्वाचे कारण आहे.
ह्या पार्श्वभूमीवर हल्ली बऱ्याच रुग्णालयांमधून हाऊसकीपिंग व स्वच्छतेची कंत्राटे दिली जातात. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत (कायाकल्प) रुग्णालयीन व स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे (गाइडलाइन्स) दिली आहेत. परंतु, प्रत्यक्षात या महत्त्वाच्या सुचनांकडे दुर्लक्ष होताना दिसते. हॉस्पिटलच्या 'इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉल'प्रमाणे जंतूनाशकांची निवड, दर्जा व त्यांच्या वापरण्याच्या पद्धती ह्यांचे योग्य प्रकारे प्रशिक्षण देणे हे अपरिहार्य असायला हवे. ह्या व्यतिरिक्त, निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारी रसायनेसुद्धा उत्तम दर्जाची, अत्याधुनिक व सुरक्षित असली पाहिजेत तरच निर्जंतुकीकरणासारख्या अत्यंत मूलभूत उपयोजना प्रभावी होतील अन्यथा, इस्पितळे ही आरोग्यसेवा देणारी ठिकाणे न राहता रोगांची उगमस्थाने होतील.
…
प्रा. डॉ. अभय चौधरी
(लेखक हाफकिन संस्था, मुंबईचे माजी संचालक आहेत.)