धनंजय गांगल
...
देशातील वाहन उद्योगाला दिशा देणाऱ्या 'मारुती सुझुकी'नं १ एप्रिल २०२०पासून डिझेल कार न विकण्याचा निर्णय घेतला आहे. डिझेल इंजिनचा वापर, तो कमी होण्यामागील कारणे आणि 'मारूती'ने घेतलेला विक्री बंद करण्याचा निर्णय, यामागील कारणांची मीमांसा-
...
आत्ताच्या तरुण पिढीला अविश्वसनीय वाटेल, पण अगदी दोन-तीन दशकांपूर्वीपर्यंत फोन (अर्थात लँडलाइन) आणि 'बजाज चेतक' ही दुचाकी, नोंदणी केल्यापासून प्रत्यक्ष मिळायला वर्षे लागायची, क्वचित ५ ते १० वर्षेसुद्धा लागायची. तेव्हा चार-चाकी ही मध्यम वर्गासाठी केवळ स्वप्नातील गोष्ट होती. रस्त्यावर थोड्याफार 'डुक्कर फियाट' आणि साधी फियाट - म्हणजे प्रीमियर पद्मिनी यांचाच वावर असायचा. काळ्या-पिवळ्या टॅक्सीसुद्धा 'पद्मिनी'च असायच्या. हिंदी-मराठी सिनेमात धरण बांधणारा इंजिनीयर सरकारी जीपने यायचा-जायचा. तर मोठे सरकारी अधिकारी, राजकारणी सहसा पांढऱ्या रंगाच्या अॅम्बेसिडर मधेच बसायचे-उतरायचे. 'व्हॅट ६९' नावाच्या दारुच्या बाटल्या आणि मोठमोठ्या इंपाला गाड्या चित्रपटात फक्त बॉलिवूडच्या खलनायकांकडेच असायच्या. त्यातून ते कचाकच ब्रेक दाबत एकमेकांचा पाठलाग करायचे. 'बॉस वर्सोवा बीच पे सोना आया है' म्हणत ते सोन्याने भरलेले मोठ-मोठे खोके, कापसाहूनही हलके असल्यासारखे सहज उचलून ट्रक टेम्पो मध्ये भरायचे. दुसरीकडे गाड्यांचे आणि नायक-नायिकेच्या प्रणयाचेही अतूट नात होते. 'चलती का नाम'मध्ये बिघडलेली गाडी दुरुस्त करण्याच्या निमित्तानेच मधुबालाशी किशोरची फक्त 'पाच रुपया बारा आना'साठी भेट होते, तर 'मेरे सपनों की रानी कब आयेगी तू?' म्हणत राजेश खन्ना जीपमधून शर्मिला टागोरला खुणवायचा. 'मारुती ८००' ही गाडी १९८३ साली आली आणि ओम्नी व्हॅन १९८४ साली आली. तरी सामान्य कुटुंबे ती बाळगायला लागले ते साधारण १९९० च्या दशकापासून. तिच्या जन्मापासूनच मुलांना कोंबून शाळेत नेण्यासाठी जशी मारुती व्हॅन वापरली जायची, तशीच नायिकेला पळवून नेण्यासाठी हीच स्वस्त-मस्त जास्त व्हॅन वापरुन खलनायक आपल्या नाहक खर्चावर नियंत्रण ठेवायचे. असं हे चार-चाकीचं आणि आपलं जसं भावनिक नातं आहे, तसंच मारुती सुझुकी कंपनीशीही गेले जवळपास तीन दशकं अतूट असं भावनिक नातं आहे. देशाच्या वाहन उद्योगाला दिशा देणारी ही कंपनी परवा नव्याने चर्चेत आली, ती कंपनीचे चेअरमन आर. सी. भार्गवा यांनी (गुरुवार दिनांक २५ एप्रिल २०१९ ला) केलेल्या एक घोषणेमुळे. ती घोषणा होती- पुढील वर्षी म्हणजे १ एप्रिल २०२०पासून देशात मारुती सुझुकी कंपनीच्या डिझेल कार विकल्या जाणार नाहीत!
मारुती सुझुकी (पूर्वाश्रमीची मारुती उद्योग) कंपनीच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे सर्वसाधारणपणे असे आहेत- ८०० - १९८३ साली, ओम्नी व्हॅन आली १९८४ साली, जिप्सी १९८५, १००० - १९९०, झेन - १९९३, एस्टीम १९९४, बलेनो, वॅगन आर - १९९९, स्वीफ्ट - २००५, ग्रँड व्हिटा(रा) २००७, ए स्टार - २००८, रिट्झ - २००९, इको - २००९, अल्टो के १० - २०१०, कीझाही - २०११, एर्टिगा - २०१२, अल्टो ८०० - २०१२, स्टिंग्रे - २०१३, सेलेरिओ - २०१३, सियाझ - २०१४, इग्निस - २०१७. प्रवासी गाड्यांच्या भारतातील विक्रीत जवळपास ५०% हिस्सा असलेली ही कंपनी. केंद्र सरकारने १ एप्रिल २०२० पासून प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने ऑटोमोबाइल क्षेत्रावर भारत स्टेज ६ (BS-VI) मानके लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. डिझेल इंजिनला BS-VI नियमांनुसार अपग्रेड करण्यासाठी खूप खर्च होतो. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या डिझेल इंजिनांमध्ये बदल करून त्यांना नव्या मानकांनुसार सक्षम करण्यासाठी खर्चांत मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, मारुती सुझुकीने १ एप्रिल २०२० पासून डिझेल कार न विकण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण समजून घेण्यासाठी आधी डिझेल इंजिनांबद्दल जाणून घेऊ या.
डिझेल इंजिनांचा शोध जर्मन इंजिनीयर रुडॉल्फ डिझेलने लावला. जगभर प्रवासी गाड्यांसाठी सहसा पेट्रोल इंजिनं वापरतात. पेट्रोल इंजिनं तेवढा भार उचलू, वाहू शकतात. त्याच्यापलीकडे मोठे ट्रक, ट्रेलर वगैरेसाठी डिझेल इंजिनांची ताकद लागते. मग प्रवासी लहान गाड्यांसाठीही डिझेल इंजिन का नाही वापरत? तर या इंजिनांचे बरेच तोटेही आहेत. ते पेट्रोलपेक्षा जास्त कंप पावते, त्यामुळे स्थिरतेसाठी खूप दणकट इंजिन बनवायला लागते आणि त्याचे वजन वाढते. शिवाय डिझेल इंधन पेट्रोल पेक्षा कच्चे असल्याने त्यात प्रदूषके जास्त असतात. ती स्वच्छ करण्याच्या यंत्रणांचा खर्चही खूप होतो. त्यामुळे डिझेल कारची किंमत पेट्रोलपेक्षा १ ते दीड-दोन लाखाने वाढते! शिवाय डिझेल कारच्या देखभालीचा खर्चही जास्त येतो. तसेच पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारचे सुटे भागही महाग असतात. पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारचे सुटे भाग लवकर खराब होतात. मग तरीही प्रवासी गाड्यांना पेट्रोलचा सहज आणि स्वस्त पर्याय असूनही डिझेल इंजिन का वापरतात? याचं कारण, भारतात डिझेलच्या कृत्रिमरीत्या ठेवलेल्या कमी किमतीत आहे. डिझेल मुख्यतः ट्रक वगैरे सामानाची ने-आण करण्यास वापरतात, ज्याचा इतर वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो. त्यामुळे 'गरिबांचे' इंधन म्हणून सरकारतर्फे डिझेलच्या किमती कृत्रिमरीत्या पेट्रोलच्या तुलनेत कमी ठेवलेल्या असतात. त्यामुळे जर गाडीचा वापर बऱ्यापैकी असेल, तर सुरुवातीची खरेदीतील अधिकची किंमत या कृत्रिम स्वस्ताईमुळे भरून निघते. त्यामुळे भारतात अनेक कार कंपन्या पेट्रोलसोबत त्या कारची डिझेल आवृत्तीही काढतात, कारण त्याला चांगली मागणी असते. मारुतीही त्यात मागे नव्हती. मारुती पेट्रोल इंजिनं अर्थातच सुझुकीची वापरते, पण सुझुकीची प्रवासी वाहनांसाठीची डिझेल इंजिनं नाहीत. त्यामुळे मारुती आजवर फियाटची इंजिने वापरत होती. यामुळे मारुतीला संशोधनावर पैसा गुंतवावा लागत नव्हता, पण इंजिनासाठी मोठा महसूल फियाटला जात होता. यामुळे समांतरपणे पूर्वउद्योग-एकीकरणांर्गत (बॅकवर्ड इंटिग्रेशन) म्हणून मारुतीने पाच वर्षांपूर्वीच स्वत:ची डिझेल इंजिने विकसित करण्याचा निर्णय घेतला. दीड-दोन हजार कोटी रुपये गुंतवून गुरगावमध्ये डिझेल इंजिन बनविण्याचा प्रकल्प उभारला. असे असताना भारत सरकारने डिझेलच्या कार कमी करत त्या २०३० पासून पूर्णतः बंद करण्याचा आणि सीएनजी, वीजेवर चालणाऱ्या कार्सची विक्री करण्याचा एकाएकी निर्णय घेतला. याचा पहिला फटका मारुतीच्या भविष्यातील वाढीवर बसला. मारुतीने या काळात १.५ लीटरचे इंजिन विकसितही केले. हे इंजिन एस क्रॉस, सियाझ या कारमध्ये देण्यात आले आहे. मात्र, एवढा मोठा खर्च करून हे इंजिन काही काळानंतर कालबाह्य होणार याची धास्ती कंपनीला आहे. यातच बीएस ६ उत्सर्जन नियमावलीचे डिझेल इंजिन बनवायचे झाल्यास सध्याच्या बीएस ४ इंजिनापेक्षा त्याची किंमत दोन ते अडीच लाख रुपयांनी जास्त असणार आहे. मग ग्राहकवर्ग डिझेलकडे कसा वळणार? कारण किमतीतील हा फरक परिचालन खर्चातून (ऑपेरेशनल कॉस्ट) भरुन निघणे कठीण आहे. शिवाय काही वर्षांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलमधील किमतीमध्ये २० ते २५रुपयांचे अंतर होते, आज हेच अंतर ६-७ रुपयांवर आले आहे. त्यामुळे जादाचे २.५लाख रुपये देण्याचे धारिष्ट्य कोण दाखवेल? त्यापेक्षा सीएनजीची कार घेतल्यास त्याचा पर्यावरणाला फायदा आणि पर्यायाने खर्चावर नियंत्रण होणार आहे. सध्या सीएनजी फक्त मेट्रो शहरांमध्येच उपलब्ध असला, तरीही येत्या दोन वर्षांत तो अन्य ठिकाणीही मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. विजेवर चालणाऱ्या वाहनांनी अद्यापही पुरेसे बाळसे धरलेले नाही. यामुळे सध्यातरी पुढील १०-१२ वर्षांसाठी सीएनजीचाच पर्याय कंपनीसमोर आहे.
या सर्व कारणांमुळे मारुतीने १ एप्रिल २०२० पासून डिझेल कार्सची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर या कंपन्यांच्या डिझेलवरील मॉडेल्सना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मारुती सुझुकीच्या या निर्णयानंतर अन्य कंपन्याही डिझेल इंजिनांबाबत फेरविचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.