अॅड. रोहित एरंडे
..................
डॉक्टरांवरील वाढते हल्ले ही गोष्ट पेशंट आणि डॉक्टरांच्या नात्याला बाधा आणणारी आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडल्यास चांगले डॉक्टर मिळणे दुरापास्त होईल आणि त्याचा तोटा पेशंटनाच होणार आहे.
...........
रुग्णाला मृत घोषित केल्यामुळे पुण्यातील एका रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली आहे. सतत होणाऱ्या या प्रकारांमुळे 'एमबीबीएस'मधील 'एमबी' म्हणजे 'मसल बाउंड' असे नवीन नामकरण करण्याची आणि त्याप्रमाणे दंड थोपटत बसण्याची वेळ आता डॉक्टरांवर आली आहे, असे म्हटले तर गैर ठरू नये.
एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते, की इतर कुठल्याही प्रोफेशनपेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते आणि इथे भक्तांची मोठी गल्लत होते. डॉक्टर जर देव असेल, तर त्याची विटंबना म्हणजेच त्यांच्यावर हल्ले करू नका, आणि डॉक्टर देव नसेल तर त्यांच्या मर्यादा ओळखा. डॉक्टर आणि रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्याच्या प्रमाणामध्ये देशभर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. आता डॉक्टरांचे अशा हल्ल्यांपासून संरक्षण केले गेले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ते आपल्यालाच भोगावे लागतील.
वैद्यकशास्त्रामध्ये रोज काही ना काही नवीन शोध लागतात. त्याची व्याप्ती प्रचंड आहे, त्यामुळेच वैद्यकशास्त्र सतत विकसित होत असलेले शास्त्र मानले गेले आहे. असे असले तरी 'दैव जाणिले कोणी' हे उपचारांबाबतीत नक्की लागू पडते. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यताप्राप्त व वर्षानुवर्षे वापरलेल्या पद्धती असतात. प्रत्येक उपचार पद्धतीला त्याचे फायदे-तोटे असतात. त्यामुळे संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करूनदेखील जर दुर्दैवाने उपचारास यश आले नाही तर त्याचा दोष डॉक्टरांना देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये स्पष्ट केले आहे. कोणत्याही डॉक्टरला आपल्या पेशंटचे नुकसान व्हावे असे वाटणार नाही.
सर्वोच्च न्यायालयानेदेखील निष्काळजीपणापोटी डॉक्टरांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांबद्दलही म्हटले आहे, की जर प्रत्येक वेळी असे गुन्हे दाखल व्हायला लागले तर डॉक्टरांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता करणे अवघड होऊन बसेल; व अशाने समाजाचेच प्रचंड नुकसान होईल. हे विधान डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतही तंतोतंत लागू पडेल.
एखाद्या रुग्णाने उपचारांना प्रतिसाद दिला नाही किंवा दुसरीकडे उपचार नीट होऊ शकतील असा सल्ला दिला तर यात डॉक्टरांची चूक कशी असू शकेल, याचा विचार न करता एकदम जाऊन डॉक्टरांना बेदम मारायचे, हॉस्पिटलची मोडतोड करायची यातून काहीच साध्य होत नाही. उलट डॉक्टरांना रुग्णाबद्दल वाटणारी आपुलकी कमी होते. हे रुग्णांसाठी जास्त धोकादायक आहे. डॉक्टर-पेशंट नाते आता घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. कित्येक डॉक्टर मंडळी त्यांच्या मुलांना या व्यवसायात येण्यापासूनच रोखत आहेत आणि हे खचितच चांगले लक्षण नाही.
बेफाम वेगात गाडी चालवायची आणि अपघात होऊन जबर जखमी झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, किंवा डॉक्टरांनी दारू पिऊ नका असे सांगितले तरी खूप प्यायची आणि मग किडन्या, लिव्हर निकामी झाल्यावर त्या परत उत्तम व्हाव्यात म्हणून डॉक्टरांकडे जायचे, रिपोर्टमध्ये शुगर कमी दिसावी म्हणून फक्त दोन दिवस अजिबातच गोड खायचे नाही आणि मग शुगर कमी होत नाही म्हणून ओरडायचे असे प्रकार होतात. या सर्व प्रकारांत गुण आला नाही म्हणून शेवटी डॉक्टरांनाच मारायचे, हे अयोग्य आहे.
याचा अर्थ डॉक्टरविरुद्ध काहीच कारवाई करता येत नाही असे नव्हे. ग्राहक न्यायालयातील दाखल खटल्यांवर नजर टाकली तरी दिसून येईल की डॉक्टरांविरुद्ध किती प्रमाणात केसेस दाखल होत असतात. इतर सर्व व्यवसायाप्रमाणे अप-प्रवृत्ती ह्याही व्यवसायात आहेत. न्यायालयीन खटल्यांच्या भीतीमुळे आता डॉक्टर कुठलाही धोका पत्करत नाहीत आणि शक्य त्या त्या सर्व टेस्ट करण्यास सांगतात. वैद्यकीय निष्काळजीपणाच्या खटल्यांत आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संयत निर्णय दिलेले आहेत. योग्य तेथे कोटी-कोटी रुपयांची नुकसानभरपाईही रुग्णाला दिलेली आहे; तर त्याचबरोबर फौजदारी कारवाईचे निकषदेखील घालून दिलेले आहेत. उजव्या हाताऐवजी डाव्याच हाताचे ऑपेरेशन केले, एखाद्या शाखेचे ज्ञान नसतानादेखील त्या शाखेसंदर्भात उपचार केले, ऑपरेशन नंतर पोटात कापसाचा बोळा विसरणे अशा प्रकरणांत डॉक्टरांना न्यायालयाने जबर दंड अथवा शिक्षा केल्या आहेत. इतर कुठल्याही व्यवसायाबाबत असे दिसत नाही. सरकारने स्टेंटच्या किमती कमी करून तसेच जेनेरिक औषधांची सक्ती करून लोकांना दिलासा द्यायचा प्रयत्नही केला आहे.
एखाद्या रुग्णास वाटले, की डॉक्टर निष्काळजीपणे वागले, तर संबंधित डॉक्टरांविरुद्ध कायद्याच्या चौकटीत राहून दिवाणी तसेच फौजदारी तक्रार दाखल करता येते. असे असूनसुद्धा दंडेलशाहीच्या जोरावर डॉक्टरांना लक्ष्य करण्यात येते. त्यामुळे डॉक्टरांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. याकरिता आता केंद्रीय स्तरावरच डॉक्टर संरक्षण कायदा आणणे गरजेचे आहे. याकरिता डॉक्टरांनी व त्यांच्या शिखर संघटनांनीच पावले उचलण्याची गरज आहे.
२००७ सालच्या आंध्र प्रदेश सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे खासगी अथवा सरकारी रुग्णालये, डॉक्टर, कर्मचारी, नर्स, वॉर्डबॉय, मेडिकलचे विद्यार्थी इत्यादींना या कायद्याच्या संरक्षण कक्षेत आणले आहे. जी व्यक्ती अशा डॉक्टरवर हल्ला करेल किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून हल्ला करून घेईल त्या व्यक्तीला या कायद्याखाली दोषी धरून तीन वर्षे कैद अथवा ५० हजार दंड अशी शिक्षा होऊ शकते. या कायद्याखालचा गुन्हा हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे. जर गुन्हेगारांमुळे हॉस्पिटलच्या यंत्रसामग्रीचे अथवा मालमत्तेचे नुकसान झाले असेल, तर यंत्रांच्या किमतीच्या दुप्पट रक्कम; तसेच प्रॉपर्टीच्या नुकसानाची न्यायालय ठरवेल ती किंमत संबंधित गुन्हेगाराकडून वसूल करण्याची महत्त्वाची वेगळी तरतूद हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. रक्कम जर तो गुन्हेगार देऊ शकला नाही, तर त्याचे घरदार जप्त करून अशा रकमेची वसुली करता येईल, असेही पुढे म्हटले आहे. जोपर्यंत असा कायदा येत नाही तोपर्यंत कमीत कमी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणे डॉक्टरांसाठी गरजेचे झाले आहे.
सध्या डॉक्टर-पेशंट नातेसंबंध हे दुष्टचक्रात अडकलेले आहे. परस्परांवरील विश्वास वाढणे हे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे. डॉक्टरांनीही पेशंटला जास्तीत जास्त वेळ देणे गरजेचे आहे. पेशंटचे कौन्सिलिंग नीट केल्यास आणि सौजन्याने वागल्यास पुढील अप्रिय गोष्टी टळू शकतील. डॉक्टरांना एकाच वेळी पेशंटचा रोष आणि कायदेशीर कारवाईची भीती असते. डॉक्टरांवर हल्ला झाल्यास डॉक्टरांची संघटना संपाचे हत्यार उपसते. पण संप करणे हा कायदेशीर अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संपाचा मार्ग बंद होतो. त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये बाउन्सर्स ठेवणे सुरू झाले आहे. काही महिन्यांपूर्वी डॉक्टरवर हल्ला करणाऱ्याला डॉक्टरांनीच चांगला चोप दिल्याची घटना अलिबाग येथे घडल्याची आपण वाचली असेल. 'मसल बाउंड' होणे हे त्या अर्थानेच वर उल्लेखले आहे. डॉक्टरांवरील हल्ले वाढल्यास चांगले डॉक्टर मिळणे दुरापास्त होईल आणि त्याचा तोटा समाजाला होईल.