>> पुरुषोत्तम बेर्डे
अभिनेता वैभव मांगले चालू प्रयोगात चक्कर येऊन पडला, तेव्हा त्याच्या काळजीपोटी अनेक बातम्या वेगाने पसरल्या. अनेकांच्या काळजात चर्र तर झाले. एवढी दगदग करायची कलावंतांना खरंच गरज आहे का?
मराठी माणूस म्हणजे नाट्यप्रेमी. नाटक, नट-नट्यांना डोक्यावर घेऊन नाचणारा. असं म्हणतात की परग्रहावर दोन मराठी माणसं भेटली तर जुजबी ओळखीवरसुद्धा नाटकाच्याच गप्पा आधी मारतील, नंतर त्यांच्या लक्षात येईल की प्राणवायू संपायच्या आत पृथ्वीवर परतायला पाहिजे. पण आता तो इतिहास झाला. आता नाटकाबरोबर इतरही गोष्टी लागतात. म्हणजे थेटर एसी हवं ,कार पार्किंग हवे, प्रयोग शनिवार-रविवारी हवेत. मध्यंतरात बटाटेवडे हवेत (हे मात्र पूर्वापार) आणि नाटक संपल्यानंतर जवळपास चांगलं हॉटेल हवं. सुदैवाने महाराष्ट्रात सिनेमासाठी मल्टिप्लेक्स आली. सिनेमा बघणं हा सहकुटुंब ट्रीटचा भाग झाला. सिनेमा कसाही असला तरी बाकी सर्व मात्र जबरदस्त हवं. त्यातलाच मराठी प्रेक्षक त्याच्या आवडत्या नाटकाबद्दल मात्र चोखंदळ असतो आणि नेमक्या यालाच नाटकांची थिएटर्स फाटा देतात. मुंबई-पुण्यात तरी ठीक आहे पण इतर शहरात प्रेक्षकांवर सूड उगवणारी परिस्थिती आहे. एअर कंडिशन सोडाच, खुर्च्यांची अवस्थाही गंभीर आहे. कित्येक थिएटर्स नाटकांसाठी बांधलीत, पण नंतर मात्र ती मंगलकार्य आणि राजकीय सभांसाठी वापरात येतील याची खास काळजी घेतली जाते. त्यातली बरीच महापालिका किंवा जिल्हा परिषदांची असल्याने त्यांची तुलना एनसीपीए, टाटा किंवा भाभा यांच्याशी केल्यास तोंडाला फेस येईल. तशात ती जेवढी जुनी होतात तितकी ती अधिक 'जुनी कशी वाटतील' याचीही काळजी घेतली जाते. यावर उपाय काय?
सुट्ट्या सुरु झाल्या की नाटकं आणि बालनाट्यांचा सीझन सुरू होतो. मग त्या उकाड्यात नाटकं बघणं आणि ती करणं जिकिरीचं होतं. तशात एसी नसलेली नाट्यगृहे वात आणतात. अनेक कलावंतांनी त्या नाट्यगृहांच्या 'स्वच्छतेचे' फोटो सोशल मिडियावर टाकून समस्यांना वाचा फोडली. पण त्याचा परिणाम मात्र नाही. परवा सांगलीमध्ये 'अलबत्या गलबत्या' नाटकाच्या प्रयोगाला नाटक संपता संपता अष्टपैलू अभिनेता वैभव मांगले चालू प्रयोगात चक्कर येऊन पडला. तेव्हा त्याच्या काळजीपोटी अनेकविध बातम्या वेगाने पसरल्या. सुदैवानं, या अफवांचे पीक उगवेपर्यंत खऱ्या बातम्याही आल्या आणि तासाभरात प्रत्यक्ष वैभव मांगलेने स्वत:चा व्हिडिओ टाकून आपण सुखरूप असल्याचा दिलासा दिला.
मात्र, या बातम्यांच्या दरम्यान अनेक लोकांच्या काळजात चर्र तर झालेच, शिवाय आणखीही काही गोष्टींचा विचार अनेकांच्या मनात आला. ही एवढी दगदग करायची कलावंतांना खरंच गरज आहे का? याचे उत्तर.. 'आहे' असेच असेल! एखाद्या अभिनेत्रीला वा अभिनेत्याला घवघवीत यश मिळते तेव्हा हा दगदगीचा काळ सुरू होतो. नाट्य-चित्रपट सृष्टीतील नट-नट्या आणि तंत्रज्ञ जेव्हा अशा यशाला सामोरे जातात तेव्हा त्यांची शारीरिक आणि मानसिक दगदग सुरू होते. ज्या गोष्टींसाठी इतकी धडपड, इतका स्ट्रगल केला, ती समोर येताच कशाचीही तमा न बाळगता या दगदगीला तो सामोरा जातो. तशात अलिकडे नाटकात यश मिळताच सिनेमा, किंवा सिनेमा-मालिकेत यश मिळताच नाटकात, मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण होते. मग शारीरिक आणि मानसिक ओढाताण! या यशाबरोबर समृद्धी येते म्हणून सारे सुसह्य होते. पण मग अशावेळी कार्यस्थळीच्या सुविधा इतक्या अंगवळणी पडतात की असुविधा असलेल्या जागा अडचणीच्या ठरतात.
आज मोठ्या शहरात नाट्यगृहे एसी, मालिकांचे स्टुडिओज एसी, चित्रपटाच्या शूटिंगचे स्टुडिओज एसी, आऊटडोअर असेल तर वातानुकूलित 'व्हॅनिटी व्हॅन्स' उपलब्ध. जाण्या-येण्याच्या गाड्या एसी. राहण्याची हॉटेल्स एसी. थकून घरी आल्यावर बेडरूम एसी. अर्थात, इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे सर्व मिळालेले असते. पण ज्या क्षणी याच्या विपरीत अव्यवस्था सामोरी येते तेव्हा ती सहन होत नाही. यात चैनीचा प्रकार नसून, दर्जेदार आविष्कार सादर करण्याची आसही तेवढीच वाढली आहे. कारण तीव्र स्पर्धा आहे. मी नाही म्हटले तर दुसरा हजर होईल, ही भीतीही आहे. या असुरक्षिततेपोटी, समोर आलेली भारी मानधनाची ऑफर कोणीही सोडत नाही. आजचे यश कॅश केले नाही तर उद्याचा भविष्यकाळ, भूतकाळातील पैशाअभावी रसातळाला गेलेल्या पूर्वजांसारखा होईल, ही भीती स्वस्थ बसू देत नाही.
अशावेळी मग सुविधा नसलेली नाट्यगृहे जेव्हा दौऱ्यात सामोरी येतात तेव्हा विना कटकट कर्तव्यापोटी ही सर्व कलावंत मंडळी तंत्रज्ञांसह त्याला सामोरी जातात. त्याला इलाज नसतो. रसिकांचा प्रतिसाद मिळतो तेव्हा हुरूप येतो, पण शरीराला सवयीच्या सुखसोयी न मिळाल्याने ते विरोध करू लागते आणि परिणामी त्याचे रुपांतर चक्कर, भोवळ, उलट्या यात होते. या सर्व व्यस्त प्रकारावर डॉ. श्रीराम लागू, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी यांनी शिस्तबद्ध वर्तुळ स्वत:भोवती आखून मार्ग काढला. पथ्यपाणी सांभाळून अनेकांनी व्यस्त शेड्यूल सांभाळले. ही किंवा अशी कित्येक कलावंत मंडळी केवळ निर्मात्यांवर अवलंबून नाहीत, तर आरोग्याबाबत स्वावलंबी व जागरूक आहेत.
बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, ते कोल्हटकर, पेंढारकर आणि त्यानंतर शिलेदार, गोखले कुटुंबियांनी संगीत नाटके भरजरी वस्त्रे आणि शस्त्रास्त्रांसहित पहाटेपर्यंत सादर केली. चार चार महिन्यांचे दौरे केले. बैलगाड्यांचा प्रवस पुढे बसपर्यंत पोहोचला. त्या काळात एसी रंगमंदिरे सोडाच, पंखे तरी धड होते की नाही कुणास ठाऊक. अशावेळी पौराणिक व ऐतिहासिक नाटके सादर करून गाण्यांना वन्समोअरही घेतले. कुठून आली ही एवढी एनर्जी? कदाचित नाटक एके नाटक हा एकच माध्यम प्रकार हे त्यामागचे कारण असावे. शिवाय, एसीचे प्रस्थ त्यावेळी नव्हते आणि ग्लोबल वॉर्मिंग नसल्याने वातावरण एप्रिल मेमध्येही हिरव्या गर्द झाडांच्या कोंडाळ्यातली थिएटर्स थंडावा देत असावीत.
काळाप्रमाणे परिस्थिती बदलते. जीवनशैली बदलते. त्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावर होतोच. पण आज तो अती होतोय. पूर्वी अफवा कानोकानी पसरत. मग त्या पानोपानी पसरू लागल्या. आता अफवांच्या पिकाची शेतं हातात आलीत ती मोबाईलच्या रूपात. कधी एखादी ब्रेकिंग न्यूज हातात येते आणि कधी तिचा आगापिछा न जोखता ती 'कधी फॉरवर्ड करतो' असे होते. ह्या गोष्टीला चॅनल्सनी बेजबाबदारपणे, कसलीही खातरजमा न करता अवास्तव प्रसिद्धी द्यावी याचा कित्येक 'सुखरूप' कलावंतांना प्रचंड त्रास व मनस्ताप आजवर झाला आहे. अशा बातम्यांच्या फेऱ्यात सचिन खेडेकर ते कादरखानपर्यंत अनेक कलाकार मनस्तापलेत. या विचित्र प्रकारात लाडक्या कलावंताची काळजी, आपुलकी आणि प्रेमच दिसते. तरी त्याचा त्रास होतोच.
यात सोशल मिडियाची जबाबदारी जेवढी तेवढीच कलाकारांचीही आहे आणि गावोगावच्या रंगमंदिरांचीही. अशी अनेक थिएटर अद्ययावत होण्याच्या अपेक्षेत उभी आहेत. अशा रंगमंदिरांकडे मालकवर्ग, संस्था, नगरपरिषदा, महापालिका आणि शासन लक्ष घालून कलाकारांचे, निर्मात्यांचे व पर्यायाने रसिकांचे हित पाहतील काय?
(लेखक नाट्यकर्मी आहेत.)
अभिनेता वैभव मांगले चालू प्रयोगात चक्कर येऊन पडला, तेव्हा त्याच्या काळजीपोटी अनेक बातम्या वेगाने पसरल्या. अनेकांच्या काळजात चर्र तर झाले. एवढी दगदग करायची कलावंतांना खरंच गरज आहे का?
मराठी माणूस म्हणजे नाट्यप्रेमी. नाटक, नट-नट्यांना डोक्यावर घेऊन नाचणारा. असं म्हणतात की परग्रहावर दोन मराठी माणसं भेटली तर जुजबी ओळखीवरसुद्धा नाटकाच्याच गप्पा आधी मारतील, नंतर त्यांच्या लक्षात येईल की प्राणवायू संपायच्या आत पृथ्वीवर परतायला पाहिजे. पण आता तो इतिहास झाला. आता नाटकाबरोबर इतरही गोष्टी लागतात. म्हणजे थेटर एसी हवं ,कार पार्किंग हवे, प्रयोग शनिवार-रविवारी हवेत. मध्यंतरात बटाटेवडे हवेत (हे मात्र पूर्वापार) आणि नाटक संपल्यानंतर जवळपास चांगलं हॉटेल हवं. सुदैवाने महाराष्ट्रात सिनेमासाठी मल्टिप्लेक्स आली. सिनेमा बघणं हा सहकुटुंब ट्रीटचा भाग झाला. सिनेमा कसाही असला तरी बाकी सर्व मात्र जबरदस्त हवं. त्यातलाच मराठी प्रेक्षक त्याच्या आवडत्या नाटकाबद्दल मात्र चोखंदळ असतो आणि नेमक्या यालाच नाटकांची थिएटर्स फाटा देतात. मुंबई-पुण्यात तरी ठीक आहे पण इतर शहरात प्रेक्षकांवर सूड उगवणारी परिस्थिती आहे. एअर कंडिशन सोडाच, खुर्च्यांची अवस्थाही गंभीर आहे. कित्येक थिएटर्स नाटकांसाठी बांधलीत, पण नंतर मात्र ती मंगलकार्य आणि राजकीय सभांसाठी वापरात येतील याची खास काळजी घेतली जाते. त्यातली बरीच महापालिका किंवा जिल्हा परिषदांची असल्याने त्यांची तुलना एनसीपीए, टाटा किंवा भाभा यांच्याशी केल्यास तोंडाला फेस येईल. तशात ती जेवढी जुनी होतात तितकी ती अधिक 'जुनी कशी वाटतील' याचीही काळजी घेतली जाते. यावर उपाय काय?
सुट्ट्या सुरु झाल्या की नाटकं आणि बालनाट्यांचा सीझन सुरू होतो. मग त्या उकाड्यात नाटकं बघणं आणि ती करणं जिकिरीचं होतं. तशात एसी नसलेली नाट्यगृहे वात आणतात. अनेक कलावंतांनी त्या नाट्यगृहांच्या 'स्वच्छतेचे' फोटो सोशल मिडियावर टाकून समस्यांना वाचा फोडली. पण त्याचा परिणाम मात्र नाही. परवा सांगलीमध्ये 'अलबत्या गलबत्या' नाटकाच्या प्रयोगाला नाटक संपता संपता अष्टपैलू अभिनेता वैभव मांगले चालू प्रयोगात चक्कर येऊन पडला. तेव्हा त्याच्या काळजीपोटी अनेकविध बातम्या वेगाने पसरल्या. सुदैवानं, या अफवांचे पीक उगवेपर्यंत खऱ्या बातम्याही आल्या आणि तासाभरात प्रत्यक्ष वैभव मांगलेने स्वत:चा व्हिडिओ टाकून आपण सुखरूप असल्याचा दिलासा दिला.
मात्र, या बातम्यांच्या दरम्यान अनेक लोकांच्या काळजात चर्र तर झालेच, शिवाय आणखीही काही गोष्टींचा विचार अनेकांच्या मनात आला. ही एवढी दगदग करायची कलावंतांना खरंच गरज आहे का? याचे उत्तर.. 'आहे' असेच असेल! एखाद्या अभिनेत्रीला वा अभिनेत्याला घवघवीत यश मिळते तेव्हा हा दगदगीचा काळ सुरू होतो. नाट्य-चित्रपट सृष्टीतील नट-नट्या आणि तंत्रज्ञ जेव्हा अशा यशाला सामोरे जातात तेव्हा त्यांची शारीरिक आणि मानसिक दगदग सुरू होते. ज्या गोष्टींसाठी इतकी धडपड, इतका स्ट्रगल केला, ती समोर येताच कशाचीही तमा न बाळगता या दगदगीला तो सामोरा जातो. तशात अलिकडे नाटकात यश मिळताच सिनेमा, किंवा सिनेमा-मालिकेत यश मिळताच नाटकात, मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण होते. मग शारीरिक आणि मानसिक ओढाताण! या यशाबरोबर समृद्धी येते म्हणून सारे सुसह्य होते. पण मग अशावेळी कार्यस्थळीच्या सुविधा इतक्या अंगवळणी पडतात की असुविधा असलेल्या जागा अडचणीच्या ठरतात.
आज मोठ्या शहरात नाट्यगृहे एसी, मालिकांचे स्टुडिओज एसी, चित्रपटाच्या शूटिंगचे स्टुडिओज एसी, आऊटडोअर असेल तर वातानुकूलित 'व्हॅनिटी व्हॅन्स' उपलब्ध. जाण्या-येण्याच्या गाड्या एसी. राहण्याची हॉटेल्स एसी. थकून घरी आल्यावर बेडरूम एसी. अर्थात, इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे सर्व मिळालेले असते. पण ज्या क्षणी याच्या विपरीत अव्यवस्था सामोरी येते तेव्हा ती सहन होत नाही. यात चैनीचा प्रकार नसून, दर्जेदार आविष्कार सादर करण्याची आसही तेवढीच वाढली आहे. कारण तीव्र स्पर्धा आहे. मी नाही म्हटले तर दुसरा हजर होईल, ही भीतीही आहे. या असुरक्षिततेपोटी, समोर आलेली भारी मानधनाची ऑफर कोणीही सोडत नाही. आजचे यश कॅश केले नाही तर उद्याचा भविष्यकाळ, भूतकाळातील पैशाअभावी रसातळाला गेलेल्या पूर्वजांसारखा होईल, ही भीती स्वस्थ बसू देत नाही.
अशावेळी मग सुविधा नसलेली नाट्यगृहे जेव्हा दौऱ्यात सामोरी येतात तेव्हा विना कटकट कर्तव्यापोटी ही सर्व कलावंत मंडळी तंत्रज्ञांसह त्याला सामोरी जातात. त्याला इलाज नसतो. रसिकांचा प्रतिसाद मिळतो तेव्हा हुरूप येतो, पण शरीराला सवयीच्या सुखसोयी न मिळाल्याने ते विरोध करू लागते आणि परिणामी त्याचे रुपांतर चक्कर, भोवळ, उलट्या यात होते. या सर्व व्यस्त प्रकारावर डॉ. श्रीराम लागू, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी यांनी शिस्तबद्ध वर्तुळ स्वत:भोवती आखून मार्ग काढला. पथ्यपाणी सांभाळून अनेकांनी व्यस्त शेड्यूल सांभाळले. ही किंवा अशी कित्येक कलावंत मंडळी केवळ निर्मात्यांवर अवलंबून नाहीत, तर आरोग्याबाबत स्वावलंबी व जागरूक आहेत.
बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, ते कोल्हटकर, पेंढारकर आणि त्यानंतर शिलेदार, गोखले कुटुंबियांनी संगीत नाटके भरजरी वस्त्रे आणि शस्त्रास्त्रांसहित पहाटेपर्यंत सादर केली. चार चार महिन्यांचे दौरे केले. बैलगाड्यांचा प्रवस पुढे बसपर्यंत पोहोचला. त्या काळात एसी रंगमंदिरे सोडाच, पंखे तरी धड होते की नाही कुणास ठाऊक. अशावेळी पौराणिक व ऐतिहासिक नाटके सादर करून गाण्यांना वन्समोअरही घेतले. कुठून आली ही एवढी एनर्जी? कदाचित नाटक एके नाटक हा एकच माध्यम प्रकार हे त्यामागचे कारण असावे. शिवाय, एसीचे प्रस्थ त्यावेळी नव्हते आणि ग्लोबल वॉर्मिंग नसल्याने वातावरण एप्रिल मेमध्येही हिरव्या गर्द झाडांच्या कोंडाळ्यातली थिएटर्स थंडावा देत असावीत.
काळाप्रमाणे परिस्थिती बदलते. जीवनशैली बदलते. त्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावर होतोच. पण आज तो अती होतोय. पूर्वी अफवा कानोकानी पसरत. मग त्या पानोपानी पसरू लागल्या. आता अफवांच्या पिकाची शेतं हातात आलीत ती मोबाईलच्या रूपात. कधी एखादी ब्रेकिंग न्यूज हातात येते आणि कधी तिचा आगापिछा न जोखता ती 'कधी फॉरवर्ड करतो' असे होते. ह्या गोष्टीला चॅनल्सनी बेजबाबदारपणे, कसलीही खातरजमा न करता अवास्तव प्रसिद्धी द्यावी याचा कित्येक 'सुखरूप' कलावंतांना प्रचंड त्रास व मनस्ताप आजवर झाला आहे. अशा बातम्यांच्या फेऱ्यात सचिन खेडेकर ते कादरखानपर्यंत अनेक कलाकार मनस्तापलेत. या विचित्र प्रकारात लाडक्या कलावंताची काळजी, आपुलकी आणि प्रेमच दिसते. तरी त्याचा त्रास होतोच.
यात सोशल मिडियाची जबाबदारी जेवढी तेवढीच कलाकारांचीही आहे आणि गावोगावच्या रंगमंदिरांचीही. अशी अनेक थिएटर अद्ययावत होण्याच्या अपेक्षेत उभी आहेत. अशा रंगमंदिरांकडे मालकवर्ग, संस्था, नगरपरिषदा, महापालिका आणि शासन लक्ष घालून कलाकारांचे, निर्मात्यांचे व पर्यायाने रसिकांचे हित पाहतील काय?
(लेखक नाट्यकर्मी आहेत.)