>> प्रा. श्रीकांत मी. ब. भोवते
मागील वर्षी १४ एप्रिल रोजी छल्लेवाडा येथे डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षलवाद्यांनी एकाला अगदी विहारासमोर मारले. २०१५मध्ये दामारांचा या गावातील दलित समाजाच्या पत्रू दुर्गे या सुजाण सामाजिक कार्यकर्त्याला गावातच ठार केले. आजवर किमान २४ बौद्धबांधवांना नक्षलवाद्यांनी ठार केले आहे. आता रमेश रामटेकेला ठार केले. तरीही समाजमन गप्प का?
....
सध्या सुरू असलेल्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रमेश पोच्या रामटेके या दलित व्यक्तीची खबरी म्हणून नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आली; पण खोलात शिरले तर ही हत्या या भागातील दलित समाजाच्या मुस्कटदाबीवर प्रकाश टाकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने पुढे जायला सरसावलेला समाज कसा जागीच बंदिस्त केला जातो ते सांगते.
रामटेके हा एक चाळीस वर्षांचा साधा भोळा माणूस. तिसऱ्या वर्गापर्यंत शिकलेला. राज्याच्या टोकावरील अहेरी जिल्ह्यातील येरमनार नावाच्या दलितबहुल गावात राहत होता. या भागात काही गावात आदिवासीनंतर दलित समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. काही गावात अनुसूची जाती अर्थात बौद्धांचे प्रमाण अधिक आहे. हा सीमावर्ती भाग असून आंध्र आणि छातीसगडच्या सीमा लागलेल्या आहेत. दुर्गमता आहे. शेतीशिवाय आजही कोणतेच उत्पन्नाचे नाहीत. ज्याला खबरी म्हणून मारण्यात आले त्या रामटेकेकडे जमीन एक सव्वा एकर त्यामुळे काय ते उत्पन्न घ्यायचे आणि जीवन जगायचे. हा माणूस खेडूत असला तरी दोन मुलींवर थांबला. मुलाचा हट्ट केला नाही. स्वतः शिकू शकला नाही पण दोन्ही मुली नियमित शाळेत पाठवायचा. रमेश हा बौद्ध विहार समितीचा सचिव होता. नेहमीच विहारातल्या कार्यक्रमात सर्वात समोर असायचा. लोक लवकर आले नाही तर सर्वांच्या घरी जाऊन, सर्वांना विनंती करून लवकर कार्यक्रमाला चला म्हणून घाई करायचा. वेळ पडली तर नाराज झाल्यासारखे दाखवून बोलावून आणायचा. बोलायला अत्यंत प्रेमळ, मृदू भाषिक, मानपान न बघणारा हा गावातला साधा माणूस. त्याच्या बोलक्या स्वभावामुळे त्यालाच गावातला कोतवाल म्हणायचे. तो पगारी कोतवाल नव्हता. कोणत्याच चुकीच्या गोष्टींना समर्थन करीत नव्हता.
९०च्या काळात या भागात नक्षलवाद जोमात होता तेव्हा रमेश तारुण्यात होता. हे सगळी गावे नक्षलवादाचा बालेकिल्ला समजली जायची. गावागावात नक्षलवाद्यांनी आपले विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटन उभे केले होते. या गावात अनेकदा नक्षलवाद्यांच्या सभा व्हायच्या. सभेला सगळ्यांनी येणे बंधनकारक असे. सभेत गाणे गाऊन आणि शासनाविरुद्ध भाषण देऊन लोकांना मानसिक कवेत घ्यायचे हे सातत्याने सुरू होते. एखादा व्यक्ती मीटिंगला आला नाही तर तो सरकारचा शत्रू म्हणून धमकी मिळायची. आज भीती काही प्रमाणात कमी झाली आहे, पण संपूर्ण भाग अतिसंवेदनशील आहेच. आंबेडकरी प्रेरणा असलेला रमेश या सगळ्या परिस्थितीत कधीच नक्षलवाद्यांच्या विचारला बळी पडला नाही. गावात शेवटी असलेले त्याचे घर नेहमीच नक्षलवाद्यांच्या डोळ्यात खुपत होते. यावर्षी एप्रिल महिन्यात गावातील विहारासमोर सार्वाजनिक परित्राण पाठ ठेवला होता. आम्ही त्याचे साक्षी आहोत. गावात पहिल्यांदा कुणी भिक्खू आले म्हणून बौद्ध समाजाला आनंद होता. रामटेकेने भिक्खूंना घरी येण्याचा आग्रह केला. त्यांचा सेवेत तो स्वतःला धन्य मानत होता. त्याचा स्वभाव नक्षलवाद्यांना
खटकत होता.
येरमनार गावात बौद्ध समाजाचे प्रमाण अधिक आहे आणि इथले बव्हंशी नागरिक जागृत आहेत. विशेष म्हणजे गावात बुद्ध-फुले-आंबेडकर जयंती आणि सामाजिक कार्यक्रमे नियमित होतात. आंबेडकरी समाज लोकशाही समर्थक असल्याने मतदानात सहभागी होतात. एकूणच या लोकांना गावात अनेक विकासकामांची अपेक्षा आहे आणि ते स्पष्टपणे बोलून दाखवतात. या समाजाच्या अशा स्वभाववैशिष्ट्यामुळे नक्षलवाद्यांना एवढ्या वर्षांत गावावर नियंत्रण ठेवणे जमले नाही. याचा राग नक्षलवाद्यांना आहे. शिवाय बौद्ध समाजाविषयी जास्त आकस आहे, कारण शिक्षण नावाच्या वाघिणीचे दूध प्यायलेला हा समाज सहसा कोणाला घाबरत नाही.
या भागातील साधारण १५ ते २० गावांत मोठ्या नाल्यांमुळे आणि सुयोग्य रस्त्याअभावी बससुविधा नाही. विकास नाहीच. येरमनार थोडे बरे आहे. लोकांच्या मागणीमुळे गावात २०१२मध्ये शासकीय आदिवासी आश्रम शाळा मंजूर झाली. लोक खूश होते. आता आपल्या पुढच्या पिढ्या किमान विकसित होतील, असे स्वप्न बघत होते. शाळा होऊ नये म्हणून नक्षलवाद्यांनी बांधकामाला विरोध दाखविला. लोकांनी समोर येत नक्षलवादी कमांडरला विरोध न करण्याची विनंती केली. ही दहावीपर्यंतची सेमी इंग्लिश शाळा होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक शिक्षक-कर्मचारी गावात राहायला येतील. अधिकारी गावात वारंवार भेटीला येतील आणि हा संपूर्ण भाग नक्षलवाद्यांना त्याच्या नियंत्रणात ठेवणे अवघड होईल. एकुणात हे नक्षलवाद विरोधी वाटते म्हणून ही शाळा नाही तर पोलिस स्टेशनची इमारत आहे, असे आरोप करून नक्षलवाद्यांनी एक दिवस चालू झालेले बांधकाम उद्ध्वस्त केले. त्या दिवशी संपूर्ण गाव नक्षलवाद्यांच्या विरोधात गेला. रामटेकेने नक्षलवाद्यांना सांगून टाकले, आम्हाला मारून टाकले तरी आम्ही शाळेचे बांधकाम थांबू देणार नाही. नक्षलवाद्यांनी रमेशला बेशुद्ध होईस्तव मारले. जळत्या पोकलेनमध्ये फेकून गावाला धमक्या देऊन निघून गेले. गावकऱ्यांनी लगेच रमेशला आगीतून काढून त्याचा उपचार केले. रमेशचा जीव वाचला. पण तो किमान चार महिने बिछान्यावर होता. गावकऱ्यांनी हिंमत सोडली नाही. शाळा गावातच झाली पाहिजे म्हणून स्वाक्षरी मोहीम राबवली. मी स्वतः येरमनार शाळेसाठी सचिवालयापर्यंत चर्चा केली. पण शासनाने ही शाळा दुसऱ्या सुरक्षित गावात स्थानांतरित केली.
या भागातली साधारण पंधरा गावे पावसाळ्याच्या तीन-चार महिने तरी शहरापासून तुटतात. गावाच्या रस्त्यातील नाल्यावर पूल नाहीत. रस्ते कच्चे आहेत. नव्वदीच्या काळात या भागात सशस्त्र बीआरओ दलाने रस्ते आणि पूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला, पण नक्षलवादाच्या दबावात ते काम अर्धवटच राहिले ते आजतयागत. तेव्हापासून या भागात कुणीही रस्ता, नाल्यावरील पुलाचे काम करायची हिंमत दाखवीत नाही. त्यामुळे शाळा, आरोग्य, जीवनावश्यक सामान, हाटबाजार सगळ्याच मूलभूत समस्या आजही कायम आहेत. अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, नर्स या भागात जायला जरा बिचकतातच. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री अमरीश आत्राम यांना गावकऱ्यांनी गावाला लागून असलेल्या येरमनार नाल्यावर पूल बांधून देण्याची विनंती केली आणि त्यासाठी गठ्ठा मतेही दिली. मंत्रीसाहेब विसरले असतील. पुलाचे काहीच झाले नाही. पावसाळ्यात या नाल्यावरून १०-१५ फूट पाणी जाते. संपर्क तुटतो. पण कुणाला याची काळजी नाही. शासन कामाचे टेंडर काढून मोकळे होते. सर्वांना माहीत आहे, नक्षलवादी पूल होऊ देणार नाहीत. भूमकाल संघटनेने लोकसहभागातून या पुलाचे बांधकाम करण्याचा निर्धार घेतला आणि गावात लोकांशी चर्चा केली. गावकरी खूश होते. रमेशही आनंदी होता. नक्षलवाद्यांनी पुलाचा विरोध केला. गावकऱ्यांना धमकी दिली. गावकऱ्यांनी, रमेशने या धमकीकडे लक्ष दिले नाही. संपूर्ण गावकऱ्यांनी पुलाला लागणारे किमान शंभर ट्रॅक्टर इतके दगड जमा करून ठेवले आहेत.
या नक्षलविरोधी वातावरणामुळे चिडून असलेल्या नक्षलवाद्यांनी खोटा आरोप लावून गावाला पुन्हा दहशतीत लोटण्यासाठी रमेश रामटेकेचा खून केला. म्हणजे गाव पुन्हा काही वर्षे तसेच पडून राहावे, कुणी विकासाच्या अथवा धर्माच्या नावाने समोर येऊ नये. विकासाच्या नावाने उठणारा विचार, समाजहिताचा विचार करणारा किंवा प्रसंगी अधिकारी वर्गाशी संपर्कात कुणी आले तर ते दुश्मन! खरे तर कुणालाही असे मारायचा आदेश नक्षलवाद्यांचे स्थानिक दलम देत नाही. ते वरच्या कमिटीत चर्चा करतात. रमेशला मारण्याचा हेतू येथील लोकांनी विशेषतः प्रगतिशील बौद्धांनी नक्षलवाद्यांसमोर नतमस्तक होणे आणि नक्षलवादी धाक पुन्हा कायम होणे हा आहे. कुणीही विकास, धम्म किंवा सामाजिक कामात पुढाकार घेऊ नये. विकासाच्या कामासाठी नेतृत्व करू नये, अशी काही स्पष्ट कारणे या हत्येमागे दिसून येतात.
मागील वर्षी १४ एप्रिल रोजी छल्लेवाडा येथे डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षलवाद्यांनी एकाला अगदी विहारासमोर मारले. साऱ्यांना दुःखात लोटले. त्या आधी २०१५मध्ये दामारांचा या गावातील दलित समाजाच्या पत्रू दुर्गे या सुजाण सामाजिक कार्यकर्त्याला गावातच ठार केले. काय होता पत्रू दुर्गेचा गुन्हा? तो गावाजवळ उपसा सिंचन योजनेसाठी सतत प्रयत्न करत होता आणि आदल्याच दिवशी त्यासाठी थेट मुंबईला मंत्रालयात जाऊन आला होता. आजवर किमान २४ बौद्धबांधवांना नक्षलवाद्यांनी ठार केले आहे. आता रमेश रामटेकेला मारल्यामुळे या भागात नक्षलवाद्यांद्वारे बौद्ध समाजाचे बांधव का टार्गेट केले जातात, हे समीकरण कुणालाही सहज
समजण्यासारखे आहे. भोतमांगे ते खर्डा आणि रोहित वेमुला ते कन्हैया कुमार सर्वच प्रकरणात जातीय अन्यायाचे विरोध करणे आपले कर्तव्य होते. मग आज, नक्षलवाद्यांच्या जातीय हिंसेविरुद्ध समाजसेवक, परिवर्तनवादी, मनुवाद विरोधी, एकूणच राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते प्रामाणिकपणे विरोध नोंदवणार काय? यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते नसलेल्या लोकांसाठी रान पेटवले गेले. मग आता या नक्षल हिंसेविरुद्ध बुद्धप्रिय लोक शोकसभा तरी घेणार काय? की ही जातीय हिंसा करत नाही अशा भ्रमात राहून मूग गिळून अजून पुन्हा दलित कार्यकर्त्याचा हत्येची वाट बघणार?
मागील वर्षी १४ एप्रिल रोजी छल्लेवाडा येथे डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षलवाद्यांनी एकाला अगदी विहारासमोर मारले. २०१५मध्ये दामारांचा या गावातील दलित समाजाच्या पत्रू दुर्गे या सुजाण सामाजिक कार्यकर्त्याला गावातच ठार केले. आजवर किमान २४ बौद्धबांधवांना नक्षलवाद्यांनी ठार केले आहे. आता रमेश रामटेकेला ठार केले. तरीही समाजमन गप्प का?
....
सध्या सुरू असलेल्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रमेश पोच्या रामटेके या दलित व्यक्तीची खबरी म्हणून नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आली; पण खोलात शिरले तर ही हत्या या भागातील दलित समाजाच्या मुस्कटदाबीवर प्रकाश टाकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने पुढे जायला सरसावलेला समाज कसा जागीच बंदिस्त केला जातो ते सांगते.
रामटेके हा एक चाळीस वर्षांचा साधा भोळा माणूस. तिसऱ्या वर्गापर्यंत शिकलेला. राज्याच्या टोकावरील अहेरी जिल्ह्यातील येरमनार नावाच्या दलितबहुल गावात राहत होता. या भागात काही गावात आदिवासीनंतर दलित समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. काही गावात अनुसूची जाती अर्थात बौद्धांचे प्रमाण अधिक आहे. हा सीमावर्ती भाग असून आंध्र आणि छातीसगडच्या सीमा लागलेल्या आहेत. दुर्गमता आहे. शेतीशिवाय आजही कोणतेच उत्पन्नाचे नाहीत. ज्याला खबरी म्हणून मारण्यात आले त्या रामटेकेकडे जमीन एक सव्वा एकर त्यामुळे काय ते उत्पन्न घ्यायचे आणि जीवन जगायचे. हा माणूस खेडूत असला तरी दोन मुलींवर थांबला. मुलाचा हट्ट केला नाही. स्वतः शिकू शकला नाही पण दोन्ही मुली नियमित शाळेत पाठवायचा. रमेश हा बौद्ध विहार समितीचा सचिव होता. नेहमीच विहारातल्या कार्यक्रमात सर्वात समोर असायचा. लोक लवकर आले नाही तर सर्वांच्या घरी जाऊन, सर्वांना विनंती करून लवकर कार्यक्रमाला चला म्हणून घाई करायचा. वेळ पडली तर नाराज झाल्यासारखे दाखवून बोलावून आणायचा. बोलायला अत्यंत प्रेमळ, मृदू भाषिक, मानपान न बघणारा हा गावातला साधा माणूस. त्याच्या बोलक्या स्वभावामुळे त्यालाच गावातला कोतवाल म्हणायचे. तो पगारी कोतवाल नव्हता. कोणत्याच चुकीच्या गोष्टींना समर्थन करीत नव्हता.
९०च्या काळात या भागात नक्षलवाद जोमात होता तेव्हा रमेश तारुण्यात होता. हे सगळी गावे नक्षलवादाचा बालेकिल्ला समजली जायची. गावागावात नक्षलवाद्यांनी आपले विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटन उभे केले होते. या गावात अनेकदा नक्षलवाद्यांच्या सभा व्हायच्या. सभेला सगळ्यांनी येणे बंधनकारक असे. सभेत गाणे गाऊन आणि शासनाविरुद्ध भाषण देऊन लोकांना मानसिक कवेत घ्यायचे हे सातत्याने सुरू होते. एखादा व्यक्ती मीटिंगला आला नाही तर तो सरकारचा शत्रू म्हणून धमकी मिळायची. आज भीती काही प्रमाणात कमी झाली आहे, पण संपूर्ण भाग अतिसंवेदनशील आहेच. आंबेडकरी प्रेरणा असलेला रमेश या सगळ्या परिस्थितीत कधीच नक्षलवाद्यांच्या विचारला बळी पडला नाही. गावात शेवटी असलेले त्याचे घर नेहमीच नक्षलवाद्यांच्या डोळ्यात खुपत होते. यावर्षी एप्रिल महिन्यात गावातील विहारासमोर सार्वाजनिक परित्राण पाठ ठेवला होता. आम्ही त्याचे साक्षी आहोत. गावात पहिल्यांदा कुणी भिक्खू आले म्हणून बौद्ध समाजाला आनंद होता. रामटेकेने भिक्खूंना घरी येण्याचा आग्रह केला. त्यांचा सेवेत तो स्वतःला धन्य मानत होता. त्याचा स्वभाव नक्षलवाद्यांना
खटकत होता.
येरमनार गावात बौद्ध समाजाचे प्रमाण अधिक आहे आणि इथले बव्हंशी नागरिक जागृत आहेत. विशेष म्हणजे गावात बुद्ध-फुले-आंबेडकर जयंती आणि सामाजिक कार्यक्रमे नियमित होतात. आंबेडकरी समाज लोकशाही समर्थक असल्याने मतदानात सहभागी होतात. एकूणच या लोकांना गावात अनेक विकासकामांची अपेक्षा आहे आणि ते स्पष्टपणे बोलून दाखवतात. या समाजाच्या अशा स्वभाववैशिष्ट्यामुळे नक्षलवाद्यांना एवढ्या वर्षांत गावावर नियंत्रण ठेवणे जमले नाही. याचा राग नक्षलवाद्यांना आहे. शिवाय बौद्ध समाजाविषयी जास्त आकस आहे, कारण शिक्षण नावाच्या वाघिणीचे दूध प्यायलेला हा समाज सहसा कोणाला घाबरत नाही.
या भागातील साधारण १५ ते २० गावांत मोठ्या नाल्यांमुळे आणि सुयोग्य रस्त्याअभावी बससुविधा नाही. विकास नाहीच. येरमनार थोडे बरे आहे. लोकांच्या मागणीमुळे गावात २०१२मध्ये शासकीय आदिवासी आश्रम शाळा मंजूर झाली. लोक खूश होते. आता आपल्या पुढच्या पिढ्या किमान विकसित होतील, असे स्वप्न बघत होते. शाळा होऊ नये म्हणून नक्षलवाद्यांनी बांधकामाला विरोध दाखविला. लोकांनी समोर येत नक्षलवादी कमांडरला विरोध न करण्याची विनंती केली. ही दहावीपर्यंतची सेमी इंग्लिश शाळा होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक शिक्षक-कर्मचारी गावात राहायला येतील. अधिकारी गावात वारंवार भेटीला येतील आणि हा संपूर्ण भाग नक्षलवाद्यांना त्याच्या नियंत्रणात ठेवणे अवघड होईल. एकुणात हे नक्षलवाद विरोधी वाटते म्हणून ही शाळा नाही तर पोलिस स्टेशनची इमारत आहे, असे आरोप करून नक्षलवाद्यांनी एक दिवस चालू झालेले बांधकाम उद्ध्वस्त केले. त्या दिवशी संपूर्ण गाव नक्षलवाद्यांच्या विरोधात गेला. रामटेकेने नक्षलवाद्यांना सांगून टाकले, आम्हाला मारून टाकले तरी आम्ही शाळेचे बांधकाम थांबू देणार नाही. नक्षलवाद्यांनी रमेशला बेशुद्ध होईस्तव मारले. जळत्या पोकलेनमध्ये फेकून गावाला धमक्या देऊन निघून गेले. गावकऱ्यांनी लगेच रमेशला आगीतून काढून त्याचा उपचार केले. रमेशचा जीव वाचला. पण तो किमान चार महिने बिछान्यावर होता. गावकऱ्यांनी हिंमत सोडली नाही. शाळा गावातच झाली पाहिजे म्हणून स्वाक्षरी मोहीम राबवली. मी स्वतः येरमनार शाळेसाठी सचिवालयापर्यंत चर्चा केली. पण शासनाने ही शाळा दुसऱ्या सुरक्षित गावात स्थानांतरित केली.
या भागातली साधारण पंधरा गावे पावसाळ्याच्या तीन-चार महिने तरी शहरापासून तुटतात. गावाच्या रस्त्यातील नाल्यावर पूल नाहीत. रस्ते कच्चे आहेत. नव्वदीच्या काळात या भागात सशस्त्र बीआरओ दलाने रस्ते आणि पूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला, पण नक्षलवादाच्या दबावात ते काम अर्धवटच राहिले ते आजतयागत. तेव्हापासून या भागात कुणीही रस्ता, नाल्यावरील पुलाचे काम करायची हिंमत दाखवीत नाही. त्यामुळे शाळा, आरोग्य, जीवनावश्यक सामान, हाटबाजार सगळ्याच मूलभूत समस्या आजही कायम आहेत. अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, नर्स या भागात जायला जरा बिचकतातच. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री अमरीश आत्राम यांना गावकऱ्यांनी गावाला लागून असलेल्या येरमनार नाल्यावर पूल बांधून देण्याची विनंती केली आणि त्यासाठी गठ्ठा मतेही दिली. मंत्रीसाहेब विसरले असतील. पुलाचे काहीच झाले नाही. पावसाळ्यात या नाल्यावरून १०-१५ फूट पाणी जाते. संपर्क तुटतो. पण कुणाला याची काळजी नाही. शासन कामाचे टेंडर काढून मोकळे होते. सर्वांना माहीत आहे, नक्षलवादी पूल होऊ देणार नाहीत. भूमकाल संघटनेने लोकसहभागातून या पुलाचे बांधकाम करण्याचा निर्धार घेतला आणि गावात लोकांशी चर्चा केली. गावकरी खूश होते. रमेशही आनंदी होता. नक्षलवाद्यांनी पुलाचा विरोध केला. गावकऱ्यांना धमकी दिली. गावकऱ्यांनी, रमेशने या धमकीकडे लक्ष दिले नाही. संपूर्ण गावकऱ्यांनी पुलाला लागणारे किमान शंभर ट्रॅक्टर इतके दगड जमा करून ठेवले आहेत.
या नक्षलविरोधी वातावरणामुळे चिडून असलेल्या नक्षलवाद्यांनी खोटा आरोप लावून गावाला पुन्हा दहशतीत लोटण्यासाठी रमेश रामटेकेचा खून केला. म्हणजे गाव पुन्हा काही वर्षे तसेच पडून राहावे, कुणी विकासाच्या अथवा धर्माच्या नावाने समोर येऊ नये. विकासाच्या नावाने उठणारा विचार, समाजहिताचा विचार करणारा किंवा प्रसंगी अधिकारी वर्गाशी संपर्कात कुणी आले तर ते दुश्मन! खरे तर कुणालाही असे मारायचा आदेश नक्षलवाद्यांचे स्थानिक दलम देत नाही. ते वरच्या कमिटीत चर्चा करतात. रमेशला मारण्याचा हेतू येथील लोकांनी विशेषतः प्रगतिशील बौद्धांनी नक्षलवाद्यांसमोर नतमस्तक होणे आणि नक्षलवादी धाक पुन्हा कायम होणे हा आहे. कुणीही विकास, धम्म किंवा सामाजिक कामात पुढाकार घेऊ नये. विकासाच्या कामासाठी नेतृत्व करू नये, अशी काही स्पष्ट कारणे या हत्येमागे दिसून येतात.
मागील वर्षी १४ एप्रिल रोजी छल्लेवाडा येथे डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षलवाद्यांनी एकाला अगदी विहारासमोर मारले. साऱ्यांना दुःखात लोटले. त्या आधी २०१५मध्ये दामारांचा या गावातील दलित समाजाच्या पत्रू दुर्गे या सुजाण सामाजिक कार्यकर्त्याला गावातच ठार केले. काय होता पत्रू दुर्गेचा गुन्हा? तो गावाजवळ उपसा सिंचन योजनेसाठी सतत प्रयत्न करत होता आणि आदल्याच दिवशी त्यासाठी थेट मुंबईला मंत्रालयात जाऊन आला होता. आजवर किमान २४ बौद्धबांधवांना नक्षलवाद्यांनी ठार केले आहे. आता रमेश रामटेकेला मारल्यामुळे या भागात नक्षलवाद्यांद्वारे बौद्ध समाजाचे बांधव का टार्गेट केले जातात, हे समीकरण कुणालाही सहज
समजण्यासारखे आहे. भोतमांगे ते खर्डा आणि रोहित वेमुला ते कन्हैया कुमार सर्वच प्रकरणात जातीय अन्यायाचे विरोध करणे आपले कर्तव्य होते. मग आज, नक्षलवाद्यांच्या जातीय हिंसेविरुद्ध समाजसेवक, परिवर्तनवादी, मनुवाद विरोधी, एकूणच राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते प्रामाणिकपणे विरोध नोंदवणार काय? यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते नसलेल्या लोकांसाठी रान पेटवले गेले. मग आता या नक्षल हिंसेविरुद्ध बुद्धप्रिय लोक शोकसभा तरी घेणार काय? की ही जातीय हिंसा करत नाही अशा भ्रमात राहून मूग गिळून अजून पुन्हा दलित कार्यकर्त्याचा हत्येची वाट बघणार?