मिलिंद जहागीरदार
इसवीसन १९०० च्या आसपासचे नाशिक. अनेक विद्वान शास्त्री, पंडितांचे वास्तव्य त्यावेळेस नाशकात होते. नुसते भिक्षुक नव्हेत, तर वैदिक, याज्ञिक, वैय्याकरणी तसेच अनेक विद्वान वैद्यही होते. इंग्रजी विद्या शिकून आलेले नाशकातील पहिले एमबीबीएस डॉ. चिंतामण बळवंत खाडिलकर अद्याप नाशिकला यायचे होते. त्या काळात वामनशास्त्री दातारांनी आपली पिढीजात भिक्षुकी सोडून आयुर्वेद शिकून नाशकात वैद्यकी सुरू केली. त्यात इतके प्रावीण्य मिळवले, की दूरदूरपर्यंत त्यांची कीर्ती पसरली होती. त्यांच्याकडे पंचक्रोशीतून रुग्ण तपासणीसाठी येत असत. अशाच काही रुग्णांच्या आग्रहाखातर वामनशास्त्री काही वर्षे येवल्यालासुद्धा जाऊन राहिले होते. वामनशास्त्री सावरकरभक्तच होते असे म्हणावयास हरकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराच्या कामात तनमनधनाने आणि समर्पित भावनेने ते सहभागी होत असत. जेव्हा बाबाराव सावरकर व त्यांच्या पाठोपाठ स्वातंत्र्यवीरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेव्हा सर्व सावरकर कुटुंब निराधार झाले. बाहेर वातावरण अतिशय दहशतीचे होते. सरकारी दडपशाहीचा वरवंटा जोरात फिरत होता. अशा अतिशय कठीण काळात वामनशास्त्री दातार यांनी सावरकर कुटुंबीयांना आपल्याकडेच मोठ्या हिमतीने व आस्थेने ठेवून घेतले होते.
अत्यंत विद्वान आणि सामाजिक कार्यामध्येही अग्रगण्य असणाऱ्या वामनशास्त्रींचे थोरले चिरंजीव म्हणजे सखारामशास्त्री ऊर्फ अण्णा दातार. वडिलांच्या सुसंस्कृत मार्गदर्शनाखाली अण्णांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्याबरोबरच नकळत समाजकार्याचेही धडे गिरवले. अण्णा हे खरे तर रसवैद्य होते. नाशकातील प्रख्यात रसवैद्य आणि आयुर्वेद सेवा संघाच्या संस्थापकांपैकी एक वैद्य वासुदेवशास्त्री मराठे यांच्याबरोबर अण्णांची त्यामुळेच मैत्री होती. या त्यांच्या प्रावीण्यामुळेच अण्णांना १९८७ मध्ये ‘वैद्य शेंड्ये रसौषधी पुरस्कार’ मिळाला होता. वैद्याने शक्यतोवर स्वत:ची औषधे स्वत: करावीत, असे त्यांचे मत होते. त्यांना लागणारी अनेकानेक औषधी द्रव्ये ते स्वत: बनवीत असत. त्यांच्या घरी आयुर्वेदिक औषधांचा एक कारखानाच कायम चालत असे. घराच्या पुढच्या अंगणात औषधे आणि काढे करण्यासाठी एक कायमस्वरूपी भट्टी त्यांनी बांधून घेतली होती.
वामनशास्त्री तसे फार लवकर गेले. तेव्हा अण्णा फक्त २८ वर्षांचे होते. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्याही अण्णांवर येऊन पडल्या; पण त्याकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. लहान बंधू प्रभाकर दातारांचे वैद्यकीय शिक्षण त्या वेळी अर्धवट झाले होते. शिक्षण थांबवून नोकरी करावी की काय, असा यक्षप्रश्न प्रभाकर दातार यांच्यापुढे उभा राहिला होता; पण अण्णांनी तसे होऊ दिले नाही. प्रभाकर यांचे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण अण्णांनी पूर्ण केले.
अतिशय कुशल चिकित्सक म्हणून अण्णा प्रसिद्ध होते. रुग्णांशी हसूनखेळून, मनमोकळ्या गप्पा मारत ते रुग्णांची चौकशी करीत असत. त्यांच्याशी बोलल्यावर रुग्णांना आश्वस्त वाटत असे. अर्थात, पथ्यपाण्यात रुग्ण चुकला तर ते त्याला कडक शब्दांत फटकारून काढत; पण रुग्णांना तेही मान्यच असे. आपल्या औषधांचे आयुर्वेदातील पाठ त्यांना मुखोद््गत असत. शिवाय वेगळी औषधयोजनासुद्धा ते गरजेप्रमाणे करत असत. एकदा साक्षात गुरुदेव रानडे यांना औषधोपचार करण्याची वेळ आली होती. औषध घेण्याअगोदर गुरुदेव रानडे यांनी अण्णांचीच कडक परीक्षा घेतली. गुरुदेवांचा अधिकार मान्य करून अण्णांनीही सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्यांच्यावर यशस्वी उपचार केले.
रुग्णांवर उपचार करणारा वैद्य अथवा डॉक्टर हा चिकित्सक आणि सहृदय असावा लागतो. अण्णांकडे हे दोन्ही गुण होते. रुग्णाची सर्वांगाने चिकित्सा करूनच ते उपचार करीत. एकदा मी त्यांच्याकडे बसलो असताना एक पाच महिन्यांचे बाळ उपचाराकरिता आणले होते. अण्णांनी त्या बाळाची तपासणी तर केलीच, पण त्याच्या आईचीही उलटतपासणी घेतली. बाळाची आई केव्हा उठते, केव्हा झोपते इथपासून ते तिच्या खाण्यापिण्यात काय काय असते इथपर्यंत संपूर्ण माहिती घेऊन त्यानंतरच त्या बाळाला औषध दिले आणि बाळाच्या आईलासुद्धा पथ्यपाणी सांगितले. अण्णांची तपासण्याची फी कधीच जास्त नसे. त्यातूनही एखादा रुग्ण जर गरीब असेल तर त्याची कधीच अडवणूक अण्णांकडे झाली नाही.
स्वत:च्या संसारापलीकडेसुद्धा एक जग असतं, ज्याला समाज म्हणतात आणि त्यापलीकडेही एक जग असतं, त्याला देश अथवा राष्ट्र म्हणतात ही भावना सावरकरांमुळे सर्व दातार कुटुंबीयांमध्ये खोलवर रुजलेली होती. त्याचाच परिपाक म्हणून स्वातंत्र्यानंतर झालेल्या भागानगर म्हणजेच हैदराबाद मुक्तिसंग्रामात अण्णांनी भाग घेतला आणि त्या लढ्यात त्यांना दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. सुटून आले तेव्हा त्यांचे वजन बारा किलोंनी कमी झाले होते. त्यावेळच्या काँग्रेस सरकारने त्या लढ्याला स्वातंत्र्यलढा म्हणून मान्यता देण्यास सतत नकार दिला. मात्र, त्याचे काहीही वैषम्य अण्णांना वाटले नाही. त्याबद्दल त्यांना विचारले असता ते एवढेच म्हणाले, ‘‘लढाई काही आम्ही ताम्रपटांसाठी केली नव्हती. त्यामुळे सरकार जरी भेदभाव करते आहे तरीही मला काहीही वाईट वाटत नाही.’’
नाशिकमधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध आला होता. त्यामध्ये साधू यशवंतराव महाराज मंदिर, सप्तशृंगी निवासिनीदेवी ट्रस्ट, महाबळ गुरुजींची यशवंत व्यायामशाळा इत्यादी अनेक संस्था आहेत. सप्तशृंगीदेवी ट्रस्टवर ते सोळा वर्षे विश्वस्त होते. या सोळा वर्षांमध्ये त्यांनी घेतलेले मानधन, जाण्यायेण्याचा खर्च ते लगेच देणगीची पावती फाडून ट्रस्टला परत करीत असत. इतकेच नव्हे, तर तेथील प्रसादाचे जेवण जेवल्यावर लगेच त्या जेवणाचे पैसेसुद्धा ट्रस्टला परत करीत असत. सामाजिक, सांस्कृतिक काम करताना संस्थेचा एकही रुपया आपण वापरायचा नाही हे पथ्य ते कटाक्षाने पाळीत.
या सर्व संस्थांमधील कामापेक्षासुद्धा एक फार मोठे कार्य त्यांनी उभे केले आणि ते म्हणजे नाशकातील अनाथ महिलाश्रमाची म्हणजे आजच्या आधाराश्रमाची स्थापना. या संस्थेसाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. नाशिक हे तीर्थक्षेत्र असल्याने असेल; पण येथे अनाथ महिलांचा प्रश्न होताच. मुंबईस माटुंग्याला श्रद्धानंद महिलाश्रामाचे काम तेव्हा वाखाणण्याजोगे होते. त्याचे विश्वस्त श्रीपाद शंकर तथा श्री. शं. नवरे यांच्याकडे अण्णांचे जाणेयेणे होते. त्या संस्थेपासून प्रेरणा घेऊन १३ मे १९५४ रोजी नाशकात अशी संस्था अनाथ बालके व महिला यांना जातीधर्मनिरपेक्ष बुद्धीने आश्रय देण्यासाठी स्थापण्याचे ठरले. प्रारंभीच्या काळात अण्णांच्या बरोबर (कै.) मुकुंदशास्त्री बापट, (कै.) इंदिराबाई बापट, (कै.) डॉ. चिं. ब. तथा चिंतूकाका खाडिलकर, (कै.) इंदूताई खाडिलकर, (कै.) पु. रा. वैद्य आणि (कै.) गोकुळशेट सराफ यांनी अफाट मेहनत घेतली. अगदी झोळ्या घेऊन घरोघरी फिरून संस्थेसाठी शिधा गोळा करण्याचे कामही या लोकांनी केले. यांना संस्थेचे आधारस्तंभ म्हणावयास हवे. संस्थेचे काम वाढू लागले. आधी इंदिराबाई बापट यांचे घर, त्यानंतर अण्णाशास्त्री दातारांचे घर, मग केळकर यांचा दिल्ली दरवाजावरील वाडा, अशा एकाहून एक मोठ्या जागेत संस्थेला स्थलांतर करावे लागत होते. आता संस्थेला स्वत:च्या जागेत जाणे आवश्यक होते. त्यासाठी नगरपालिकेकडे घारपुरे घाटावरील जागेची मागणी करण्यात आली; पण काहीना काही राजकारणामुळे संस्थेला जागा मिळेना. तेव्हा अण्णांनी स्वत: नगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली आणि ते प्रचंड मतांनी निवडून आले. नगरपालिकेकडून जागा मिळविल्यानंतर बांधकामासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता भासू लागली. तेव्हा अण्णांनी स्वत:चे आणि त्यांच्या बंधूंची घरे गहाण टाकून संस्थेच्या बांधकामासाठी पैसे उभे केले. या तऱ्हेच्या स्वार्थत्यागाची आज कल्पनासुद्धा करणे कठीण जाते.
त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात अण्णा आठवड्यातून दोन दिवस ठाण्याला वैद्यकीसाठी जात असत. तेव्हा अनेक धनिकांची जुनी दुखणी त्यांनी बरी केली. ते लोक अण्णांना भेटण्यास नाशिकला येत असत. अण्णांसाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा असे. अण्णा त्यांना आधाराश्रमात घेऊन जात असत आणि ते काम त्यांना दाखवून स्वत:साठी नव्हे, पण संस्थेसाठी देणग्या मिळवीत असत. संस्थेसाठी असे नि:स्वार्थबुद्धीने काम अण्णांनी शेवटपर्यंत केले. या कामासाठी त्यांना सरकारने दलितमित्र पुरस्कार दिला. त्या पुरस्काराच्या रकमेत स्वत:ची भर घालून ती वाढीव रक्कम त्यांनी पुन्हा आधाराश्रमासच दान दिली.
अशा विद्वान, कर्तबगार, दानशूर असणाऱ्या अण्णांना शेवटी वयाच्या ८३ व्या वर्षी घशाचा कर्करोग झाला. परंतु मी आता कृतार्थ आहे, असे म्हणून त्यांनी त्यावर उपचार घेण्याचे नाकारले आणि त्याच कृतार्थ भावनेने वर्षभराने त्यांनी जगाचा निरोप घेतला.
(लेखक साहित्य, संस्कृती क्षेत्रात कार्यरत आहेत.)
इसवीसन १९०० च्या आसपासचे नाशिक. अनेक विद्वान शास्त्री, पंडितांचे वास्तव्य त्यावेळेस नाशकात होते. नुसते भिक्षुक नव्हेत, तर वैदिक, याज्ञिक, वैय्याकरणी तसेच अनेक विद्वान वैद्यही होते. इंग्रजी विद्या शिकून आलेले नाशकातील पहिले एमबीबीएस डॉ. चिंतामण बळवंत खाडिलकर अद्याप नाशिकला यायचे होते. त्या काळात वामनशास्त्री दातारांनी आपली पिढीजात भिक्षुकी सोडून आयुर्वेद शिकून नाशकात वैद्यकी सुरू केली. त्यात इतके प्रावीण्य मिळवले, की दूरदूरपर्यंत त्यांची कीर्ती पसरली होती. त्यांच्याकडे पंचक्रोशीतून रुग्ण तपासणीसाठी येत असत. अशाच काही रुग्णांच्या आग्रहाखातर वामनशास्त्री काही वर्षे येवल्यालासुद्धा जाऊन राहिले होते. वामनशास्त्री सावरकरभक्तच होते असे म्हणावयास हरकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराच्या कामात तनमनधनाने आणि समर्पित भावनेने ते सहभागी होत असत. जेव्हा बाबाराव सावरकर व त्यांच्या पाठोपाठ स्वातंत्र्यवीरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेव्हा सर्व सावरकर कुटुंब निराधार झाले. बाहेर वातावरण अतिशय दहशतीचे होते. सरकारी दडपशाहीचा वरवंटा जोरात फिरत होता. अशा अतिशय कठीण काळात वामनशास्त्री दातार यांनी सावरकर कुटुंबीयांना आपल्याकडेच मोठ्या हिमतीने व आस्थेने ठेवून घेतले होते.
अत्यंत विद्वान आणि सामाजिक कार्यामध्येही अग्रगण्य असणाऱ्या वामनशास्त्रींचे थोरले चिरंजीव म्हणजे सखारामशास्त्री ऊर्फ अण्णा दातार. वडिलांच्या सुसंस्कृत मार्गदर्शनाखाली अण्णांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्याबरोबरच नकळत समाजकार्याचेही धडे गिरवले. अण्णा हे खरे तर रसवैद्य होते. नाशकातील प्रख्यात रसवैद्य आणि आयुर्वेद सेवा संघाच्या संस्थापकांपैकी एक वैद्य वासुदेवशास्त्री मराठे यांच्याबरोबर अण्णांची त्यामुळेच मैत्री होती. या त्यांच्या प्रावीण्यामुळेच अण्णांना १९८७ मध्ये ‘वैद्य शेंड्ये रसौषधी पुरस्कार’ मिळाला होता. वैद्याने शक्यतोवर स्वत:ची औषधे स्वत: करावीत, असे त्यांचे मत होते. त्यांना लागणारी अनेकानेक औषधी द्रव्ये ते स्वत: बनवीत असत. त्यांच्या घरी आयुर्वेदिक औषधांचा एक कारखानाच कायम चालत असे. घराच्या पुढच्या अंगणात औषधे आणि काढे करण्यासाठी एक कायमस्वरूपी भट्टी त्यांनी बांधून घेतली होती.
वामनशास्त्री तसे फार लवकर गेले. तेव्हा अण्णा फक्त २८ वर्षांचे होते. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्याही अण्णांवर येऊन पडल्या; पण त्याकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. लहान बंधू प्रभाकर दातारांचे वैद्यकीय शिक्षण त्या वेळी अर्धवट झाले होते. शिक्षण थांबवून नोकरी करावी की काय, असा यक्षप्रश्न प्रभाकर दातार यांच्यापुढे उभा राहिला होता; पण अण्णांनी तसे होऊ दिले नाही. प्रभाकर यांचे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण अण्णांनी पूर्ण केले.
अतिशय कुशल चिकित्सक म्हणून अण्णा प्रसिद्ध होते. रुग्णांशी हसूनखेळून, मनमोकळ्या गप्पा मारत ते रुग्णांची चौकशी करीत असत. त्यांच्याशी बोलल्यावर रुग्णांना आश्वस्त वाटत असे. अर्थात, पथ्यपाण्यात रुग्ण चुकला तर ते त्याला कडक शब्दांत फटकारून काढत; पण रुग्णांना तेही मान्यच असे. आपल्या औषधांचे आयुर्वेदातील पाठ त्यांना मुखोद््गत असत. शिवाय वेगळी औषधयोजनासुद्धा ते गरजेप्रमाणे करत असत. एकदा साक्षात गुरुदेव रानडे यांना औषधोपचार करण्याची वेळ आली होती. औषध घेण्याअगोदर गुरुदेव रानडे यांनी अण्णांचीच कडक परीक्षा घेतली. गुरुदेवांचा अधिकार मान्य करून अण्णांनीही सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्यांच्यावर यशस्वी उपचार केले.
रुग्णांवर उपचार करणारा वैद्य अथवा डॉक्टर हा चिकित्सक आणि सहृदय असावा लागतो. अण्णांकडे हे दोन्ही गुण होते. रुग्णाची सर्वांगाने चिकित्सा करूनच ते उपचार करीत. एकदा मी त्यांच्याकडे बसलो असताना एक पाच महिन्यांचे बाळ उपचाराकरिता आणले होते. अण्णांनी त्या बाळाची तपासणी तर केलीच, पण त्याच्या आईचीही उलटतपासणी घेतली. बाळाची आई केव्हा उठते, केव्हा झोपते इथपासून ते तिच्या खाण्यापिण्यात काय काय असते इथपर्यंत संपूर्ण माहिती घेऊन त्यानंतरच त्या बाळाला औषध दिले आणि बाळाच्या आईलासुद्धा पथ्यपाणी सांगितले. अण्णांची तपासण्याची फी कधीच जास्त नसे. त्यातूनही एखादा रुग्ण जर गरीब असेल तर त्याची कधीच अडवणूक अण्णांकडे झाली नाही.
स्वत:च्या संसारापलीकडेसुद्धा एक जग असतं, ज्याला समाज म्हणतात आणि त्यापलीकडेही एक जग असतं, त्याला देश अथवा राष्ट्र म्हणतात ही भावना सावरकरांमुळे सर्व दातार कुटुंबीयांमध्ये खोलवर रुजलेली होती. त्याचाच परिपाक म्हणून स्वातंत्र्यानंतर झालेल्या भागानगर म्हणजेच हैदराबाद मुक्तिसंग्रामात अण्णांनी भाग घेतला आणि त्या लढ्यात त्यांना दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. सुटून आले तेव्हा त्यांचे वजन बारा किलोंनी कमी झाले होते. त्यावेळच्या काँग्रेस सरकारने त्या लढ्याला स्वातंत्र्यलढा म्हणून मान्यता देण्यास सतत नकार दिला. मात्र, त्याचे काहीही वैषम्य अण्णांना वाटले नाही. त्याबद्दल त्यांना विचारले असता ते एवढेच म्हणाले, ‘‘लढाई काही आम्ही ताम्रपटांसाठी केली नव्हती. त्यामुळे सरकार जरी भेदभाव करते आहे तरीही मला काहीही वाईट वाटत नाही.’’
नाशिकमधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध आला होता. त्यामध्ये साधू यशवंतराव महाराज मंदिर, सप्तशृंगी निवासिनीदेवी ट्रस्ट, महाबळ गुरुजींची यशवंत व्यायामशाळा इत्यादी अनेक संस्था आहेत. सप्तशृंगीदेवी ट्रस्टवर ते सोळा वर्षे विश्वस्त होते. या सोळा वर्षांमध्ये त्यांनी घेतलेले मानधन, जाण्यायेण्याचा खर्च ते लगेच देणगीची पावती फाडून ट्रस्टला परत करीत असत. इतकेच नव्हे, तर तेथील प्रसादाचे जेवण जेवल्यावर लगेच त्या जेवणाचे पैसेसुद्धा ट्रस्टला परत करीत असत. सामाजिक, सांस्कृतिक काम करताना संस्थेचा एकही रुपया आपण वापरायचा नाही हे पथ्य ते कटाक्षाने पाळीत.
या सर्व संस्थांमधील कामापेक्षासुद्धा एक फार मोठे कार्य त्यांनी उभे केले आणि ते म्हणजे नाशकातील अनाथ महिलाश्रमाची म्हणजे आजच्या आधाराश्रमाची स्थापना. या संस्थेसाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. नाशिक हे तीर्थक्षेत्र असल्याने असेल; पण येथे अनाथ महिलांचा प्रश्न होताच. मुंबईस माटुंग्याला श्रद्धानंद महिलाश्रामाचे काम तेव्हा वाखाणण्याजोगे होते. त्याचे विश्वस्त श्रीपाद शंकर तथा श्री. शं. नवरे यांच्याकडे अण्णांचे जाणेयेणे होते. त्या संस्थेपासून प्रेरणा घेऊन १३ मे १९५४ रोजी नाशकात अशी संस्था अनाथ बालके व महिला यांना जातीधर्मनिरपेक्ष बुद्धीने आश्रय देण्यासाठी स्थापण्याचे ठरले. प्रारंभीच्या काळात अण्णांच्या बरोबर (कै.) मुकुंदशास्त्री बापट, (कै.) इंदिराबाई बापट, (कै.) डॉ. चिं. ब. तथा चिंतूकाका खाडिलकर, (कै.) इंदूताई खाडिलकर, (कै.) पु. रा. वैद्य आणि (कै.) गोकुळशेट सराफ यांनी अफाट मेहनत घेतली. अगदी झोळ्या घेऊन घरोघरी फिरून संस्थेसाठी शिधा गोळा करण्याचे कामही या लोकांनी केले. यांना संस्थेचे आधारस्तंभ म्हणावयास हवे. संस्थेचे काम वाढू लागले. आधी इंदिराबाई बापट यांचे घर, त्यानंतर अण्णाशास्त्री दातारांचे घर, मग केळकर यांचा दिल्ली दरवाजावरील वाडा, अशा एकाहून एक मोठ्या जागेत संस्थेला स्थलांतर करावे लागत होते. आता संस्थेला स्वत:च्या जागेत जाणे आवश्यक होते. त्यासाठी नगरपालिकेकडे घारपुरे घाटावरील जागेची मागणी करण्यात आली; पण काहीना काही राजकारणामुळे संस्थेला जागा मिळेना. तेव्हा अण्णांनी स्वत: नगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली आणि ते प्रचंड मतांनी निवडून आले. नगरपालिकेकडून जागा मिळविल्यानंतर बांधकामासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता भासू लागली. तेव्हा अण्णांनी स्वत:चे आणि त्यांच्या बंधूंची घरे गहाण टाकून संस्थेच्या बांधकामासाठी पैसे उभे केले. या तऱ्हेच्या स्वार्थत्यागाची आज कल्पनासुद्धा करणे कठीण जाते.
त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात अण्णा आठवड्यातून दोन दिवस ठाण्याला वैद्यकीसाठी जात असत. तेव्हा अनेक धनिकांची जुनी दुखणी त्यांनी बरी केली. ते लोक अण्णांना भेटण्यास नाशिकला येत असत. अण्णांसाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा असे. अण्णा त्यांना आधाराश्रमात घेऊन जात असत आणि ते काम त्यांना दाखवून स्वत:साठी नव्हे, पण संस्थेसाठी देणग्या मिळवीत असत. संस्थेसाठी असे नि:स्वार्थबुद्धीने काम अण्णांनी शेवटपर्यंत केले. या कामासाठी त्यांना सरकारने दलितमित्र पुरस्कार दिला. त्या पुरस्काराच्या रकमेत स्वत:ची भर घालून ती वाढीव रक्कम त्यांनी पुन्हा आधाराश्रमासच दान दिली.
अशा विद्वान, कर्तबगार, दानशूर असणाऱ्या अण्णांना शेवटी वयाच्या ८३ व्या वर्षी घशाचा कर्करोग झाला. परंतु मी आता कृतार्थ आहे, असे म्हणून त्यांनी त्यावर उपचार घेण्याचे नाकारले आणि त्याच कृतार्थ भावनेने वर्षभराने त्यांनी जगाचा निरोप घेतला.
(लेखक साहित्य, संस्कृती क्षेत्रात कार्यरत आहेत.)