अ‍ॅपशहर

आनंदाने जगण्याची कला

आनंद आपल्याला ईश्वराने भरभरून बहाल केला आहे, फक्त आपल्या हाताची ओंजळ आपण त्याच्याकडून भरून घ्यायची आणि ती सांडण्याअगोदर इतरांमध्ये वाटायची.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 26 Apr 2024, 11:22 am
आनंद हा आपल्या मनावर अवलंबून असतो, कोणी कुंडीतलं एक फूल पाहूनही आनंदी होतो तर कोणी फुलांची बाग असली तरी आनंदी नसतो. आनंद ही अनुभूती आहे, जी प्रत्यक्ष जगण्यामध्ये अनुभवता येऊ शकते, काही लोक कायम आनंदी असतात. कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा त्या अडचणींना आनंदाने सामोरे जाण्यासाठी त्यांचं अंतर्मन हे आनंदाने भरलेलं असतं. एकदा का आपल्या मनाला खळखळता आनंदी झरा बनवलं की त्या झऱ्याचं पाणी पिण्यासाठी अनेक वाटसरू येतात आणि तेही आनंदी होऊन जातात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम happy life
आनंदाने जगण्याची कला


मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायला खूप आवडतो आणि तू दुसऱ्याला वाटायलाही. अगदी एखाद्या अनोळखी छोट्या बाळासोबत गप्पा मारायला वेगळाच आनंद येतो, रोपट्यावर आलेलं एखादं फूलसुद्धा मनाला खूप आनंद देऊन जातं, पहाटेच्या निवांत वेळी उगवणाऱ्या सूर्याकडे आणि पूर्व दिशेला बदलणाऱ्या आकाशाकडे पाहत राहणं, पहिल्या पावसात चिंब होऊन भिजणं, त्या पावसाचा शिडकावा पडताच मातीचा स्वर्गीय सुगंध शरीरभर भरून घेणं, कुडकुडत्या थंडीच्या दिवसांत तोंडातून वाफ बाहेर पडत असताना दूरवर हिंडायला जाणं यात एक वेगळीच गंमत आहे. दिवाळीचा किल्ला करताना मुलांसोबत पुन्हा लहान व्हावं, दारात सुंदर रांगोळीमध्ये निगुतीने रंग भरावेत. यात सणाचा आनंद तर वाढतोच, पण घरात येणाऱ्याचं मनही आनंदी होऊन जातं. फिश टँकमधल्या माशांची हालचाल निरखण्यासारखं डोळ्यांना मिळणारं सुख नाही. घरात पाळलेल्या प्राणीमित्रांसोबत लहान होऊन संवाद साधून बघा, मनावरचा ताण कुठल्या कुठे निघून जाईल. कधी ज्येष्ठांजवळ वेळ काढून जा, त्यांची ख्यालीखुशाली विचारा. हात हातात घ्या. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यांमधून जी मायेची साय पाझरेल, त्याची सर कशालाच नाही.

आनंद कुठे नाही? चराचरात आनंद सामावलेला आहे. अगदी पहाटे गवतावर पडलेल्या दवबिंदूंचा पायाला झालेला स्पर्श, निसर्गाच्या सानिध्यात बसल्यावर झाडांची सळसळ, पक्ष्यांचा चिवचिवाट, आकाशातील ढगांची धावपळ, इंद्रधनुष्य हा सगळा आनंदाचा सोहळाच आहे, असं वाटतं. हा आनंद आपल्याला ईश्वराने भरभरून बहाल केला आहे, फक्त आपल्या हाताची ओंजळ आपण त्याच्याकडून भरून घ्यायची आणि ती सांडण्याअगोदर इतरांमध्ये वाटायची.

जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा हे महत्त्वाचं. समोरच्याच भरभरून कौतुक केलं तर त्यालाही वेगळा आनंद मिळतो. म्हणतात ना, दुसऱ्याच्या कपाळाला चंदनाचा टिळा लावताना स्वतःच्या बोटाला सुगंध येतो. त्याचप्रमाणे, ‘बस अपने पास की अच्छाईयां बांटते चलों, फिर खुशियोंकी कोई कमी नहीं रहेगी,’ हे ध्यानात ठेवायचं. मनाच्या गाभाऱ्यात चैतन्य, हास्य, सकारात्मकतेचा झरा वाहत ठेवला की आनंदाच्या समुद्राची नक्की भेट होते. कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायची सवय लावून घ्या स्वतःला, मग दुःखाला दहावेळा विचार करावा लागेल जवळ येताना.

आनंदाचे झाड मी माझ्या मनात लावलं तर त्याला आनंदाचीच फुले येतील अन् त्याचा वासही आनंदी असेल. ते फूल कोणी सुगंध घेण्यासाठी घेईल, कोणी डोक्यात माळेल, कोणी इतरांना भेट म्हणून देईल, कोणी त्याचा वास मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवेल, तर कोणी ते आनंदाचे फूल आजारी माणसाला देऊन त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढवेल. कोणी ते देवाच्या चरणावर ठेवून परमानंद घेईल. आता तुम्ही ठरवायचं की ते कुणाला आणि कसं वाटायचं.

श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटलं आहे,
आनंदाचे डोही, आनंद तरंग।
आनंदचि अंग आनंदाचे।।


-अमिता भिलारे लोणकर, पुणे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज