डॉ. सदानंद मोरे
बुवाबाजी हे धर्माच्या वृक्षावर वाढलेले एक बांडगुळ आहे. त्याने धार्मिकांबरोबर धर्माचेही शोषण चालवले आहे. खरा प्रश्न वृक्षास धक्का न लावता हे बांडगुळ कापून टाकण्याचा आहे. बुवाबाजी या शब्दाची व्याख्या करणे फारसे अवघड नाही. लोकांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक, नैतिक किंवा अन्य प्रकारचे शोषण करणे म्हणजे बुवाबाजी. अर्थात अशा प्रकारची बुवाबाजी फक्त धर्माच्या प्रांतात चालते असे नाही. सामाजिक, तसेच राजकीय विचारप्रणालीच्या क्षेत्रातसुद्धा बुवाबाजी चालते; पण ती सूक्ष्म स्तरावरील असल्यामुळे लक्षात येणे तितके सोपे नसते. अगदी अलीकडे प्रकाशित झालेल्या राजीव साने यांच्या ‘सुलटतपासणी’त एक गांधीवादी कार्यकर्त्याने केलेल्या बुवाबाजीचे वर्णन वाचायला मिळाले. स्वत: राजीव साने यांच्यासारखा विचक्षण माणूससुद्धा या कार्यकर्त्याच्या प्रभावक्षेत्रात गेला होता.
अर्थात, हा प्रकार गैर व निषेधार्ह असला, तरी त्याला अनपेक्षित म्हणावा इतका तो अस्वाभाविक नाही. याचे कारण म्हणजे मानवी जीवनाची अनिश्चितता व अनाकलनीयता. बुद्धीच्या म्हणून एक प्रांत आहे आणि त्याच्या आधारे मनुष्य जीवनातील निश्चिततेचे क्षेत्र वाढविण्यासाठी धडपडत असलेली काही मंडळी हे क्षेत्र विस्तारतही आहेत. तथापि, ते संपूर्णपणे आक्रमिता येईल, असे नाही. तोपर्यंत बुवाबाजी चालणारच. पण, मुद्दा एवढा वरवरचा म्हणजे फक्त व्यावहारिक पातळीवरील नाही. सर्व प्रकारची भौतिक सुखे प्राप्त होऊनसुद्धा मानवाला त्याच्या पलीकडचे काहीतरी हवे असते. मग त्याला श्रेय म्हणा किंवा आणखी काही म्हणा. ते प्राप्त होण्यासाठी कोणी मार्गदर्शन करीत असेल, तर ते त्याला हवेच असतात. एरवी जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे प्राज्ञ पुरुष विनोबा भावे किंवा कृष्णमूर्ती यांच्याकडे का गेले याची याची संगती लागत नाही. येशूने मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही, असे म्हटले होते. हे जे काही भाकरीच्या पलीकडील आहे आणि त्याचे आकर्षण माणसाला पहिल्यापासूनच आहे. (जयप्रकाश नारायण, अच्युतराव ज्याला स्वातंत्र्य, समाजवाद मानत होते, ज्या गोष्टी भाकरीच्या कक्षेत येणाऱ्या होत्या.) पण, या झाल्या फार मोठ्या लोकांच्या गोष्टी. सामान्य लोकांच्या बाबतीत घडते असे की, हव्या असलेल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी पुरेशी साधने लोकांजवळ नसतात. ही त्रुटी भरून काढण्यासाठी एखाद्या अलौकीक सामर्थ्याच्या व्यक्तीकडील तशा सामर्थ्याचा उपयोग होईल, असे त्यांना वाटते, ही मानसिकताही समजून घेता येईल. पण, अशा साधनसामग्रीसाठी यत्किंचितही प्रयत्न न करता कोणाच्या तरी कृपेचा शॉर्टकट शोधणारे काही कमी नसतात आणि नेमके हेच लोक बुवाबाजीच्या जाल्यात अलगद सापडतात.
एकोणिसाव्या शतकापासून महात्मा फुले, गोपाल गणेश आगरकर अशा बुद्धिवादी लोकांनी अशा प्रकारच्या बुवाबाजीवर प्रहार करायचे काम केले. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात‘किर्लोस्कर’ मासिकाने तर बुवाबाजीच्या विरोधात मोहीमच उघडली होती. त्यातून कोर्टकचेऱ्यांची प्रकरणेही झाली. साठीच्या दशकात आचार्य अत्रे यांचे ‘बुवा तेथे बाया’ हे नाटकही गाजले. या झाल्या अगदी अलीकडच्या गोष्टी. संत एकनाथ आणि संत तुकाराम यांनी बुवाबाजीवर जेवढे हल्ले चढवले तेवढे क्वचितच कोणी केले असतील. एकनाथांची शैली उपहास, उपरोध या शस्त्रांचा वापर करून अशा मंडळींची खिल्ली उडवून त्यांना हास्यास्पद करायची होती. तर तुकोबा ‘शब्दांची शस्त्रे’ करून त्यांच्यावर सरळ सरळ चालूनच जात. हे सर्व प्रकार धर्माच्या क्षेत्रात घडत असल्यामुळे त्यांनी धर्माचे शुद्धीकरण करण्याची जणू प्रतिज्ञाच केली होती, असे म्हटले तरी चालेल. त्यांच्या या माऱ्यातून कोणत्याही धर्मातील किंवा पंथातील बुवाबाज सुटले नाहीत. डॉ. ल. का. मोहरीर यांनी तर तुकोबांच्या या मोहिमेला ‘धर्मयुद्ध’ म्हटले आहे. निष्फळ कर्मकांड, पर्णकाळ, सोवळेओवळे, तीर्थाटन, अंगात येणे, नवससायास, स्वत:ला ईश्वर म्हणून घोषित करणे, गुरुबाजीचे अवडंबर अशा बुवाबाजीशी संबंधित सर्वच गोष्टींवर त्यांनी प्रखर हल्ले चढवले. एकनाथ-तुकाराम आणि फुले-आगरकर यांच्या या देशात, खरे तर बुवाबाजी करून लोकांना लुबाडणाऱ्यांना उभे राहायला सुद्धा जागा मिळू नये; पण आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे आकांक्षा,अगतिकता आणि स्वार्थ या बाबी माणसाला बुवाबाजीचे व्यसन लावतात.
महाराष्ट्रात अशा प्रकारच्या बुद्धिवादाच्या सशक्त परंपरा असताना तेथेही बुवाबाजी कशी पिकते असा प्रश्न कोणालाही पडेल. त्याची उत्तरे फार अवघड नाहीत. एकनाथ तुकोबांच्या वारकरी परंपरेतील उपदेशकांनी भ्रष्ट धार्मिक व्यवहारांवर टीका करण्याची आपली जबाबदारी सोडली असून, मुख्य धार्मिक प्रवाहाशी जुळवून घेतले आहे. या प्रवाहाची प्रवृत्ती बुवाबाजी खपवून घेण्याची आहे. मठ, आश्रम अशा गोष्टी करायच्या असतील, तर या मुख्य प्रवाहापासून बाजूला राहता कामा नये याची खूणगाठ या नवप्रचारकांनी बरोबर बांधली आहे. इकडे फुले आगरकर यांची परंपरा सांगणाऱ्यांपैकी काहींची शक्ती उच्चवर्णीयांना शिव्या देण्यात आणि ऐतिहासिक उखाळ्या पाखाळ्या काढण्यातच खर्च होते. आगरकरांचा वारसा सांगणाऱ्यांनी बुद्धिवादाचे कंकण घालून बुवाबाजीवर प्रहार करणे अपेक्षितच आहे; पण त्यातील काहींचा कल बुवांपेक्षा ईश्वरालाच ठोकण्याकडे राहिला. परिणामत: ते समाजापासून दुरावले. त्यांच्या भडक विधानांमुळे वर्तमानपत्रांना चटपटीत मथळे मिळाले. त्यांची स्वत:ची पुरोगामी प्रतिमा निर्माण झाली; पण त्याच्या पलीकडे काय? डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या भूमिकेमधील फोलपणा त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात ओळखला होता. समाजातील विधायक श्रद्धांबद्दल त्यांना किती आदर होता, हे त्यांनी पंढरीच्या वारीविषयी लिहिलेल्या लेखातून समजून येते. काही लोक या संदर्भात राजकीय नेत्यांना दोषी धरतात; पण ते सयुक्तिक नाही. लोकशाहीत नेत्यांना लोक हवे असतात. त्यामुळे लोकांना जे आवडते ते करण्याकडे त्यांचीही प्रवृत्ती होते. खरे तर लोकांनीच राजकीय नेत्यांना राज्यकारभारा पुरते मर्यादित ठेवले पाहिजे. जीवनाच्या इष्ट क्षेत्रात त्यांचे अनुकरण करायला जावेच का? पण येथेही स्वार्थ अडवा येतो. अमुक एक नेता अमुक एका बुवाच्या नादी लागला आहे हे कळल्यावर त्या नेत्याला खूश करण्यासाठी अनुयायांनी हमखास बुवांच्या पायावर लोळण घातलीच समजा! थोडक्यात काय, तर बुवाबाजी हे धर्माच्या वृक्षावर वाढलेले एक बांडगुळ आहे. त्याने धार्मिकांबरोबर धर्माचेही शोषण चालवले आहे. खरा प्रश्न वृक्षास धक्का न लावता हे बांडगुळ कापून टाकण्याचा आहे. त्यासाठी खऱ्या धार्मिकांनीच पुढे यायला हवे.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)
बुवाबाजी हे धर्माच्या वृक्षावर वाढलेले एक बांडगुळ आहे. त्याने धार्मिकांबरोबर धर्माचेही शोषण चालवले आहे. खरा प्रश्न वृक्षास धक्का न लावता हे बांडगुळ कापून टाकण्याचा आहे. बुवाबाजी या शब्दाची व्याख्या करणे फारसे अवघड नाही. लोकांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक, नैतिक किंवा अन्य प्रकारचे शोषण करणे म्हणजे बुवाबाजी. अर्थात अशा प्रकारची बुवाबाजी फक्त धर्माच्या प्रांतात चालते असे नाही. सामाजिक, तसेच राजकीय विचारप्रणालीच्या क्षेत्रातसुद्धा बुवाबाजी चालते; पण ती सूक्ष्म स्तरावरील असल्यामुळे लक्षात येणे तितके सोपे नसते. अगदी अलीकडे प्रकाशित झालेल्या राजीव साने यांच्या ‘सुलटतपासणी’त एक गांधीवादी कार्यकर्त्याने केलेल्या बुवाबाजीचे वर्णन वाचायला मिळाले. स्वत: राजीव साने यांच्यासारखा विचक्षण माणूससुद्धा या कार्यकर्त्याच्या प्रभावक्षेत्रात गेला होता.
अर्थात, हा प्रकार गैर व निषेधार्ह असला, तरी त्याला अनपेक्षित म्हणावा इतका तो अस्वाभाविक नाही. याचे कारण म्हणजे मानवी जीवनाची अनिश्चितता व अनाकलनीयता. बुद्धीच्या म्हणून एक प्रांत आहे आणि त्याच्या आधारे मनुष्य जीवनातील निश्चिततेचे क्षेत्र वाढविण्यासाठी धडपडत असलेली काही मंडळी हे क्षेत्र विस्तारतही आहेत. तथापि, ते संपूर्णपणे आक्रमिता येईल, असे नाही. तोपर्यंत बुवाबाजी चालणारच. पण, मुद्दा एवढा वरवरचा म्हणजे फक्त व्यावहारिक पातळीवरील नाही. सर्व प्रकारची भौतिक सुखे प्राप्त होऊनसुद्धा मानवाला त्याच्या पलीकडचे काहीतरी हवे असते. मग त्याला श्रेय म्हणा किंवा आणखी काही म्हणा. ते प्राप्त होण्यासाठी कोणी मार्गदर्शन करीत असेल, तर ते त्याला हवेच असतात. एरवी जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे प्राज्ञ पुरुष विनोबा भावे किंवा कृष्णमूर्ती यांच्याकडे का गेले याची याची संगती लागत नाही. येशूने मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही, असे म्हटले होते. हे जे काही भाकरीच्या पलीकडील आहे आणि त्याचे आकर्षण माणसाला पहिल्यापासूनच आहे. (जयप्रकाश नारायण, अच्युतराव ज्याला स्वातंत्र्य, समाजवाद मानत होते, ज्या गोष्टी भाकरीच्या कक्षेत येणाऱ्या होत्या.) पण, या झाल्या फार मोठ्या लोकांच्या गोष्टी. सामान्य लोकांच्या बाबतीत घडते असे की, हव्या असलेल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी पुरेशी साधने लोकांजवळ नसतात. ही त्रुटी भरून काढण्यासाठी एखाद्या अलौकीक सामर्थ्याच्या व्यक्तीकडील तशा सामर्थ्याचा उपयोग होईल, असे त्यांना वाटते, ही मानसिकताही समजून घेता येईल. पण, अशा साधनसामग्रीसाठी यत्किंचितही प्रयत्न न करता कोणाच्या तरी कृपेचा शॉर्टकट शोधणारे काही कमी नसतात आणि नेमके हेच लोक बुवाबाजीच्या जाल्यात अलगद सापडतात.
एकोणिसाव्या शतकापासून महात्मा फुले, गोपाल गणेश आगरकर अशा बुद्धिवादी लोकांनी अशा प्रकारच्या बुवाबाजीवर प्रहार करायचे काम केले. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात‘किर्लोस्कर’ मासिकाने तर बुवाबाजीच्या विरोधात मोहीमच उघडली होती. त्यातून कोर्टकचेऱ्यांची प्रकरणेही झाली. साठीच्या दशकात आचार्य अत्रे यांचे ‘बुवा तेथे बाया’ हे नाटकही गाजले. या झाल्या अगदी अलीकडच्या गोष्टी. संत एकनाथ आणि संत तुकाराम यांनी बुवाबाजीवर जेवढे हल्ले चढवले तेवढे क्वचितच कोणी केले असतील. एकनाथांची शैली उपहास, उपरोध या शस्त्रांचा वापर करून अशा मंडळींची खिल्ली उडवून त्यांना हास्यास्पद करायची होती. तर तुकोबा ‘शब्दांची शस्त्रे’ करून त्यांच्यावर सरळ सरळ चालूनच जात. हे सर्व प्रकार धर्माच्या क्षेत्रात घडत असल्यामुळे त्यांनी धर्माचे शुद्धीकरण करण्याची जणू प्रतिज्ञाच केली होती, असे म्हटले तरी चालेल. त्यांच्या या माऱ्यातून कोणत्याही धर्मातील किंवा पंथातील बुवाबाज सुटले नाहीत. डॉ. ल. का. मोहरीर यांनी तर तुकोबांच्या या मोहिमेला ‘धर्मयुद्ध’ म्हटले आहे. निष्फळ कर्मकांड, पर्णकाळ, सोवळेओवळे, तीर्थाटन, अंगात येणे, नवससायास, स्वत:ला ईश्वर म्हणून घोषित करणे, गुरुबाजीचे अवडंबर अशा बुवाबाजीशी संबंधित सर्वच गोष्टींवर त्यांनी प्रखर हल्ले चढवले. एकनाथ-तुकाराम आणि फुले-आगरकर यांच्या या देशात, खरे तर बुवाबाजी करून लोकांना लुबाडणाऱ्यांना उभे राहायला सुद्धा जागा मिळू नये; पण आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे आकांक्षा,अगतिकता आणि स्वार्थ या बाबी माणसाला बुवाबाजीचे व्यसन लावतात.
महाराष्ट्रात अशा प्रकारच्या बुद्धिवादाच्या सशक्त परंपरा असताना तेथेही बुवाबाजी कशी पिकते असा प्रश्न कोणालाही पडेल. त्याची उत्तरे फार अवघड नाहीत. एकनाथ तुकोबांच्या वारकरी परंपरेतील उपदेशकांनी भ्रष्ट धार्मिक व्यवहारांवर टीका करण्याची आपली जबाबदारी सोडली असून, मुख्य धार्मिक प्रवाहाशी जुळवून घेतले आहे. या प्रवाहाची प्रवृत्ती बुवाबाजी खपवून घेण्याची आहे. मठ, आश्रम अशा गोष्टी करायच्या असतील, तर या मुख्य प्रवाहापासून बाजूला राहता कामा नये याची खूणगाठ या नवप्रचारकांनी बरोबर बांधली आहे. इकडे फुले आगरकर यांची परंपरा सांगणाऱ्यांपैकी काहींची शक्ती उच्चवर्णीयांना शिव्या देण्यात आणि ऐतिहासिक उखाळ्या पाखाळ्या काढण्यातच खर्च होते. आगरकरांचा वारसा सांगणाऱ्यांनी बुद्धिवादाचे कंकण घालून बुवाबाजीवर प्रहार करणे अपेक्षितच आहे; पण त्यातील काहींचा कल बुवांपेक्षा ईश्वरालाच ठोकण्याकडे राहिला. परिणामत: ते समाजापासून दुरावले. त्यांच्या भडक विधानांमुळे वर्तमानपत्रांना चटपटीत मथळे मिळाले. त्यांची स्वत:ची पुरोगामी प्रतिमा निर्माण झाली; पण त्याच्या पलीकडे काय? डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या भूमिकेमधील फोलपणा त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात ओळखला होता. समाजातील विधायक श्रद्धांबद्दल त्यांना किती आदर होता, हे त्यांनी पंढरीच्या वारीविषयी लिहिलेल्या लेखातून समजून येते. काही लोक या संदर्भात राजकीय नेत्यांना दोषी धरतात; पण ते सयुक्तिक नाही. लोकशाहीत नेत्यांना लोक हवे असतात. त्यामुळे लोकांना जे आवडते ते करण्याकडे त्यांचीही प्रवृत्ती होते. खरे तर लोकांनीच राजकीय नेत्यांना राज्यकारभारा पुरते मर्यादित ठेवले पाहिजे. जीवनाच्या इष्ट क्षेत्रात त्यांचे अनुकरण करायला जावेच का? पण येथेही स्वार्थ अडवा येतो. अमुक एक नेता अमुक एका बुवाच्या नादी लागला आहे हे कळल्यावर त्या नेत्याला खूश करण्यासाठी अनुयायांनी हमखास बुवांच्या पायावर लोळण घातलीच समजा! थोडक्यात काय, तर बुवाबाजी हे धर्माच्या वृक्षावर वाढलेले एक बांडगुळ आहे. त्याने धार्मिकांबरोबर धर्माचेही शोषण चालवले आहे. खरा प्रश्न वृक्षास धक्का न लावता हे बांडगुळ कापून टाकण्याचा आहे. त्यासाठी खऱ्या धार्मिकांनीच पुढे यायला हवे.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)