अ‍ॅपशहर

अटळ काडीमोड

खरेतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची तुटलेली युती ही निकालांनंतर सत्तेच्या निमित्ताने पुन्हा जुळली. तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची एकमेकांविषयी कलुषित झालेली मने पुन्हा जुळली नव्हती.

Maharashtra Times 28 Jan 2017, 1:48 am
खरेतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची तुटलेली युती ही निकालांनंतर सत्तेच्या निमित्ताने पुन्हा जुळली. तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची एकमेकांविषयी कलुषित झालेली मने पुन्हा जुळली नव्हती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होणार नसल्याची जी घोषणा केली, ती त्यामुळेच अनपेक्षित नव्हती. २०१४नंतर भाजपची राज्यात वाढलेली ताकद ही शिवसेनेला सहन होत नाही, हे वारंवार दिसून येते आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp shivsena alliance
अटळ काडीमोड


मात्र, राजकारणात सहन होत नसलेल्या गोष्टी जो शांत राहून सहन करतो, अंतिमतः यश त्याच्या पारड्यात पडते. हे इतिहासात वारंवार सिद्ध झाले आहे. मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, यात वाद नाही. शिवसेनेचा हक्काचा मराठी मतदाराचा टक्का मुंबईत घटला असला तरी अमराठी विभागातही शिवसेनेच्या शाखांचे काम थांबलेले नाही. मात्र, मोदी लाटेनंतर भाजप म्हणजे पूर्वीसारखा शिवसेनेच्या बोटाला धरून चालणारे लहान मूल राहिलेला नाही. शहरी भागांतील मध्यमवर्गीय मतांमध्ये भाजपची हवा आहे, हे नाकारून चालणार नाही. यापूर्वी, जो अमराठी मतदार काँग्रेसच्या ‘पंजा’समोरचे बटण निश्चिंतपणे दाबत असे. तो लोकसभेपासून ‘कमळ’ शोधत असतो, हे वारंवार दिसले आहे. त्यामुळे, शिवसेना पक्षप्रमुखांनी कितीही राणाभीमदेवी घोषणा केल्या असल्या, तरी ही लढाई सोपी नाही, हे त्यांनाही चांगलेच ठाऊक असणार. मात्र, या सोप्या न वाटणाऱ्या लढाईतही शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा फायदाच आहे, हे यापूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवलीसारख्या महापालिकेत सिद्ध झाले आहे.

हे दोन्ही पक्ष एकमेकांवर अत्यंत जहाल टीका करून निवडणुकीत एकमेकांसमोर उभे राहिल्याने सध्याच्या दृक्‌श्राव्य माध्यमांच्या भडिमारात ती एक राजकीय करमणूक म्हणूनही पुढे येताना दिसते. त्यामुळे, नागरिकांमध्ये चर्चा केवळ या दोन पक्षांचीच राहते व काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि इतर लहानसहान पक्ष हवेत उडून जातात किंवा सत्तास्पर्धेच्या परिघाबाहेर आपसूक फेकले जातात. त्यातही, शिवसेनेने युती तोडल्याची घोषणा केली असली तरी ती केवळ येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतीच आहे, हे अनेकदा विसरले जाते. त्यामुळेच, आता युती तुटल्याने राज्य सरकारचे काय होणार, या चर्चांचे फड केवळ राजकीय वर्तुळात नव्हे, तर पानटपरीपासून ते उपनगरी गाड्यांपर्यंत सर्वत्र रंगू लागतात. आता कधीही भिकेचा कटोरा घेऊन युतीसाठी कुणाच्या दारात जाणार नाही, हे सांगताना आपल्या पक्षाचे काही खासदार, काही आमदार हे केंद्रीय व राज्याच्या मंत्रिमंडळातही आहेत आणि केंद्र तसेच राज्यातील सरकारला आपला पाठिंबा आहे, याचा विसर शिवसेनेच्या नेत्यांना पडतो की काय? मतदारही प्रचाराच्या गदारोळात हे विसरून जात असावेत. त्यामुळे, आज तुटलेली ही युती निकाल लागल्यानंतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा दिसली तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात, पुढील महिनाभर रंगणाऱ्या निवडणुकीच्या फडात या तुटलेल्या युतीमुळे अधिक रंगत भरेल, यात शंका नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज