दुर्गा भागवतांचं सर्वात उत्कट नातं होतं ते त्यांच्या वडिलांशी - नारायणरावांशी. १९६४ साली ते वारले त्या दिवशी पौष पौर्णिमा होती. चंद्रबिंब मावळत असताना आपल्या जीवनाचा ऊर्जास्रोतही लोप पावला, ही गोष्ट दुर्गाबाईंच्या मनात खूप खोलवर रुतली. पौष पौर्णिमेचा मावळता चंद्र त्यांना व्याकूळ करी. मनात सुनेपणा दाटून येई. या शाकंबरी पौर्णिमेच्या तरल उदास स्मृतींचा मंद पायरव त्यांच्या लेखनातून ऐकू येतो. वडिलांना जाऊन सोळा वर्षं झाली होती. दुर्गाबाई शिरूरला होत्या. सभा आटोपून घरी येत होत्या. आकाशात पौष पौर्णिमेचा चंद्र तरंगत होता. दुर्गाबाई खिन्नपणे म्हणतात, 'हीच ती सोळा वर्षांपूर्वीची रात्र. याच वेळेला माझे वडील गेले. मावळणारे चंद्रबिंब सकाळीसुद्धा सुंदर पण उदास दिसत होते. त्यानंतर इतक्या वर्षांत पौष पौर्णिमा मला कधी आनंददायक वाटलीच नाही.' कालान्तरानं भावावस्था पालटली. त्या बिंबानंच त्यांना शांतवलं. १९९७ साली तर नवल घडलं. त्या रात्री अंतरंग उजळलं. 'देहोपनिषद' ही कविता स्फुरली.
\I\Bआयुष्याची झाली रात। मनी पेटे अंतर्ज्योत।।
भय गेले मरणाचे। कोंभ सुखाचे फुटले।।
अवयवांचे बळ गेले। काय कुणाचे अडले।।
फुटले जीवनाला डोळे। सुख वेडे त्यात लोळे।।
मरणा तुझ्या स्वागतास। आत्मा माझा आहे सज्ज।।
पायघडी देहाची ती। घालुनी मी वाट पाही।।
सुखवेडी मी जाहले। देहोपनिषद सिद्ध झाले।।
\I\Bदुर्गाबाईंना जाणवलं, की आपल्याही आयुष्याची रात्र होते आहे. पण हा अंधार दु:खदायक नव्हता. त्यात समाधान होतं. पौर्णिमेच्या त्या गूढरम्य वातावरणात अंतरंगात जाणिवेची ज्योत पेटली. मृत्यूचा अर्थ उमगला. मरणाचं भय निमालं. कविता स्फुरली. तेव्हा सुखाचे कोंब हे फुटणारच! अवयव थकले, पण मनोबल वृद्धिंगत झालं. याच चंद्रप्रकाशात दादांनी शांतपणे मरणाचा स्वीकार केला होता. आता आपली जायची वेळ आली आहे. मरणानं आपण पित्याशी बांधले जाऊ; तर मग मरणाचं कसलं दु:ख! जो देह मात्यापित्यांनी दिला, त्याचीच पायघडी करून दुर्गाबाई मरणसिद्ध झाल्या. आपल्याला माणसाचा जन्म लाभला. देहाचं कार्य सुफळ संपूर्ण झालं. गौतम बुद्धाच्या चिंतनाला बुद्धपौर्णिमेच्या रात्री पूर्णत्व आलं. तो क्षण साक्षात्काराचा होता. पौष पौर्णिमा ही दुर्गाबाईंची ज्ञानपौर्णिमा होती.
'देहोपनिषद' या शब्दावर वेदोपनिषद या शब्दाची छाया आहे. वेद हे हिंदू धर्माचे आद्यग्रंथ. त्यांच्या मागून उपनिषदं आली. वेदोपनिषदात वेदान्त सामावला आहे. देह हा माणसाच्या अस्तित्वाचा प्रारंभ. देह दिसामासानं वाढतो. बाल्य, तारुण्य, प्रौढत्व या अवस्थेतून जात जात देह-वेद तयार होतो. देहाच्या शेवटी येणारं उपनिषद म्हणजे वृद्धत्व. देहाचं जगणं पूर्णत्वाला गेल्याची खूण म्हणजे परिपक्व वृद्धत्व. त्यासाठी पिकलं पान हा सुंदर शब्द मराठीत आहे. देह सुकला. जीर्ण झाला. पण जीवनार्थ आकळू शकणारं मन, पक्व फळासारखं रसदार झालं. देहोपनिषद सिद्ध झालं, म्हणजे उपनिषदाचीही सांगता झाली. देहकथा पूर्ण झाली. देहविसर्जनाचा जवळ येऊन ठेपलेला क्षण त्यांनी कल्पनेच्या पातळीवर अनुभवला. उपनिषदाचा आणखी एक अर्थ शब्दकोशात सापडतो. गुरूजवळ बसून मिळवलेलं ज्ञान. वडिलांच्या मृत्युतिथीच्या रात्री मावळत जाणारं चंद्रबिंब म्हणजे दुर्गाबाईंचा गुरू. या गुरूच्या सहवासात जीवनार्थाचं चांदणं दुर्गाबाईंच्या मनात फुलून आलं. त्या क्षणी ज्ञानेश्वरांच्या पसायदानातलं नीरव समाधान दुर्गाबाईंना लाभलं. ..येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, तशाच मुक्तीच्या आनंदात दुर्गाबाई सुखी झाल्या.
अंजली कीर्तने