अ‍ॅपशहर

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे चटके बसतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. या दिवसांमध्ये प्रामुख्यानं तहान देखील अधिक लागते. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाणी घामाद्वारे बाहेर पडतं. शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते. परिणामी पाणी प्यावं, असा सल्ला अनेकदा द्यावा लागतो. उन्हाळ्यात द्रव पदार्थ अथवा पेय घेणं हे शरीरासाठी, आरोग्यासाठी फायद्याचं असतं.

Maharashtra Times 10 Mar 2017, 12:51 am
डॉ. किरणजीत सिंग, सीनिअर कन्सल्टंट फिजिशियन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम have plenty of water this summer
भरपूर पाणी प्या


उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे चटके बसतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. या दिवसांमध्ये प्रामुख्यानं तहान देखील अधिक लागते. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाणी घामाद्वारे बाहेर पडतं. शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते. परिणामी पाणी प्यावं, असा सल्ला अनेकदा द्यावा लागतो. उन्हाळ्यात द्रव पदार्थ अथवा पेय घेणं हे शरीरासाठी, आरोग्यासाठी फायद्याचं असतं.

या दिवसांमध्ये अधिक ताप येणं आणि त्यासोबत मूत्ररोगाचा संसर्ग होणं, हे आजार सर्वसामान्य आहेत. उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशन झाल्यास जीवाणू मूत्राशयामध्ये प्रवेश करतात. हा आजार स्त्रियांमध्ये अधिक दिसतो. यामध्ये तीव्र ताप, थंडी, ब्लॅडरच्या आजुबाजूला वेदना, वारंवार लघवी होणं आणि त्या भागात जळजळ होणं, अशी लक्षणं दिसतात. जास्त संक्रमण झाल्यास झोप लागत नाही. यासाठी पाणी, पातळ पदार्थ घेण्याबरोबरच हा त्रास होऊ नये म्हणून स्वच्छता आणि साफसफाईकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

नोकरीच्या निमित्तानं एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जावं लागतं. भर उन्हात दुचाकीवर अथवा बसनं प्रवास करावा लागतो. त्यावेळी शरीरातील पाणी आपोआप कमी होतं. तहान लागतं. घसा कोरडा होतो. पाणी पिण्याची तीव्र इच्छा होते. अनेकदा शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं उन्हाळ्यामध्ये उष्माघात हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. हा आजार रानात, उन्हात काम करणाऱ्यांना होत असतो. त्यांनी त्यांच्या आहारामध्ये कांद्याचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. अधिक काळ उन्हात काम केल्यास थोडा वेळ तरी सावलीत बसणं आवश्यक आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू एकामागोमाग येतच राहतात. बदलत्या ऋतूनुसार आपण आहारात बदल करणं गरजेचं आहे. म्हणूनच उन्हाची चाहूल लागताच उन्हाळ्यातील दिनचर्या सुरू करून आपलं आरोग्य सांभाळणं महत्त्वाचं आहे.

उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्यामुळे पाण्याची कमतरता होऊन उष्माघाताचा धोका वाढू शकतो. यासाठीच पाण्याची मात्रा वाढवावी. गरज असेल तरच उन्हात बाहेर जावं, अन्यथा सावलीतच राहावं. बाहेर जायचं असल्यास काहीतरी खाऊन बाहेर पडावं. पोट रिकामं नसावं, तसंच सोबत पाणी असावं. उन्हापासून बचाव करणारी सर्व साधनं बरोबर असावीत. लहान मुलं आणि वृद्धांसाठी हा ऋतू विशेष देखभालीचा आहे. दोघांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत असल्यामुळे कुठल्याही रोगाचा हल्ला यांच्यावर चटकन परिणाम करतो. खाण्यापिण्यापासून फिरण्यापर्यंत सावधगिरी बाळगावी. पाणी जास्त प्यावं आणि साधं जेवण करावं. शीतपेय पिण्याकडे या दिवसात अधिक ओढा असतो. त्यापेक्षा लिंबू सरबत अथवा कोकमसारखं पेय घेतल्यास त्याचा गारवा मिळाल्यानं उन्हाची काहीली कमी होण्यास मदत होते. पाणी पिण्याकडे अधिक भर दिल्यास उन्हात त्रास होत नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज