अ‍ॅपशहर

ज्येष्ठ महिलांच्या आरोग्यासंबंधित तक्रारी

आजमितीला भारताच्या लोकसंख्येतील ८ ते १० टक्के लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकात मोडते. म्हणजे जवळजवळ १० ते १२ कोटी. महाराष्ट्रात ही संख्या ८० ते ९० लाखापर्यंत जाईल. ज्येष्ठांच्या वेगवेगळ्या आरोग्य समस्या पाहिल्या की ‘संध्याछाया भिवविती हृदया’ अशी गत होते. म्हणूनच वृध्दापकाळ कोणालाच नको असतो.

Maharashtra Times 15 Feb 2017, 1:20 am
>> डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर, स्रीरोग तज्ज्ञ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम health issues in old age womens
ज्येष्ठ महिलांच्या आरोग्यासंबंधित तक्रारी


आजमितीला भारताच्या लोकसंख्येतील ८ ते १० टक्के लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकात मोडते. म्हणजे जवळजवळ १० ते १२ कोटी. महाराष्ट्रात ही संख्या ८० ते ९० लाखापर्यंत जाईल. ज्येष्ठांच्या वेगवेगळ्या आरोग्य समस्या पाहिल्या की ‘संध्याछाया भिवविती हृदया’ अशी गत होते. म्हणूनच वृध्दापकाळ कोणालाच नको असतो. वृध्दापकाळात शरीरात अनेक बदल घडतात. मानवी शरीराच्या सर्व क्रियांचा हळुहळू होणारा ऱ्हास वयोमानानुसार येणाऱ्या आजारांची सुरुवात आणि शारीरिक, मानसिक ताणाशी जुळवून घेणाऱ्या प्रक्रियेतील शिथिलता म्हणजे उतारवयाची सुरुवात. वयाच्या साठीनंतर उतारवय लागलं असं साधारणत: समजलं जातं. उतारवयाला आजार न समजता आपल्या वयाच्या शरीराच्या मार्गक्रमणातील एक नैसर्गिक टप्पा समजला गेला पाहिजे. पण या नैसर्गिक टप्प्याबाबत समाज जागरुक नसल्याचं दिसतं.

उतारवयात एखादा आजार जडला तर त्याचे परिणाम शरीराच्या इतर क्रियांवर घडून फार लवकर गुंतागुंतीचा आजार निर्माण होऊ शकतो. जसं की भारतातील एका सर्वेक्षणानुसार ज्येष्ठांमध्ये डोळ्यांबद्दल तक्रारी – ८८ टक्के, अस्थिरोगाशी संबंधित – ४० टक्के, मज्जासंस्थेशी संबंधित – १९ टक्के, हृदयविकाराशी संबंधित – १७ टक्के, श्वसनविकार – १६ टक्के, त्वचेचे विकार – १३ टक्के, पचनसंस्थेचे विकार – ९ टक्के, मानसिक आजार – ९ टक्के, बहिरेपणा – ८ टक्के, मूत्रसंस्थेशी संबंधित विकार – ४ टक्के दिसून आली आहेत. यात पुरुष आणि स्त्र‌यिांचं प्रमाण सारखंच धरलं तर स्त्र‌यिांच्या बाबतीत ही आकडेवारी प्रमाण धरता येईल.

शरीर शास्त्राच्या वेगळेपणामुळे स्त्र‌यिांमध्ये जननेंद्रिये आणि मूत्रमार्गातील आजार होण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आढळतं. हाडांचा ठिसूळपणाही जास्त आढळतो. रजोनिवृत्तीनंतर हृदयविकार बळावू शकतो.

उतारवयात स्रियांमध्ये खालील तक्रारी प्रामुख्याने दिसतात.

> योनीमार्गातून आतील अंग बाहेर येणं : यामध्ये गर्भाशयाची पिशवी योनी मार्गातून बाहेर येऊ लागते. जास्त बाळंतपणे झाली असल्यास असं होण्याची शक्यता जास्त असते.
> वारंवार होणारे लघवीचे जंतुसंसर्ग
> लघवी करण्याच्या क्रियेवर ताबा नसणं
> मूत्रनलिकेचे आधारभूत स्नायू कमकुवत झाल्याने खोकताना थेंब थेंब लघवी होणं.
> योनी मार्गातून रक्तस्त्राव होणं. यामध्ये कॅन्सरची शक्यता पडताळून पहावी लागते. कधी-कधी कॅन्सर नसून आतील भागास जखम असू शकते.
> स्तनांचा कॅन्सर : बऱ्याचदा एखादी छोटी गाठ लक्षात येत नाही किंवा कुटुंबातील लोकांना त्रास नको म्हणून दुर्लक्ष केलं जातं.
> एकाकीपणा, नैराश्य, स्मृतिभ्रंश याचंही प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असलेलं आढळतं.

काळानुरुप होणारे शरीरातील बदल आणि आजारपणामुळे होणारे बदल यातील भेद ओळखता यायला हवा. लहानसहान तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती नसावी. कुटुंबातील इतर व्यक्तींनीही ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येची दखल घ्यायला हवी. वेळीच उपचार झाले तर यातील ९० टक्के तक्रारींवर मात करता येते. आजकाल वैद्यक शास्त्रातल्या प्रगतीमुळे दुर्धर आजारावर पण उपचार शक्य आहेत. आपलं उर्वरित जीवन गुणवत्तापूर्ण करण्याकडे कटाक्ष हवा.

जीवनशैलीतील बदल

व्यायामाचं महत्त्व असंख्यवेळा असंख्य तज्ज्ञांनी अधोरेखीत केलंय. त्यामुळे होणारे फायदे अगणित आहेत. कायाकल्प घडायचाच असेल तर हा त्याचा राजमार्ग आहे. योगाभ्यास आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. त्याची कास धरावी. योगासनांमुळे शरीराचा लवचिकपणा वाढतो. प्राणायामामुळे श्वसनाचे विकार कमी होतात. संतुलन साधणाऱ्या आसनांनी तोल जाऊन पडण्याची शक्यता कमी होते आणि प्रसंगी फ्रॅक्चर होत नाही. ध्यानधारणा करण्याने एकांतवास सुसह्य होतो आणि त्याचा उच्च रक्तदाब आणि हृदयविकारावर सकारात्मक परिणाम होतो. आपण नोकरीतून निवृत्त झालो असलो तरी जीवनातून निवृत्त झालो नाही याचं भान असावं. स्वत:ला वेगवेगळ्या कामामध्ये गुंतवून ठेवावं. नवीन कला शिकावी, कोडी सोडवावीत, नवीन भाषा अवगत करावी. लहान मुलांमध्ये आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणांच्या कामामध्ये खारीच्या वाटा उचलावा. त्यातून एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि एकाकीपणा कमी होतो. समाजकार्यात योगदान द्यावं. प्रबोधन करावं. ‘जे जे आपणासी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करुन सोडावे सकळ जन’ या उक्तीप्रमाणे आणि निरपेक्ष वृत्तीने रहावं. मित आहार आणि मितभाषण हे नेहमीच फायदेशीर ठरतं. आहार विहार आणि विचार यात संतुलन साधावं. वाचन करावं. सकारात्मक दृष्टिकोनाच्या चष्म्यातून जगाकडे पहावं. लहानसहान शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास उतारवयातील आजारांवर वेळीच नियंत्रण मिळवता येऊ शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज