अ‍ॅपशहर

मोबाइल अतिवापरामुळे येतो तिरळेपणा

फोन जवळ घेऊन पाहणारी मुलं, टीव्ही जवळून पाहणाऱ्या मुलांना डोळ्यांच्या तक्रारी वाढतात. लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात थेट कोणतेही ड्रॉप्स घालू नये. चांगला आहार न मिळाल्यास मुलांच्या डोळ्यांमध्ये संसर्ग वाढतो.

Maharashtra Times 31 Oct 2017, 9:37 am
फोन जवळ घेऊन पाहणारी मुलं, टीव्ही जवळून पाहणाऱ्या मुलांना डोळ्यांच्या तक्रारी वाढतात. लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात थेट कोणतेही ड्रॉप्स घालू नये. चांगला आहार न मिळाल्यास मुलांच्या डोळ्यांमध्ये संसर्ग वाढतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mobile addiction may affect eyes
मोबाइल अतिवापरामुळे येतो तिरळेपणा


एक ते पाच वर्षाच्या मुलांमध्ये तिरळेपणा वाढतो आहे. हा तिरळेपणा वय वाढल्यानंतर कमी होतो; पण अलीकडे लहान मुलांना मैदानावर खेळायला पाठवण्यापेक्षा मोबाइल हातात दिला जातो. हातात मोबाइल दिला की तो जेवतो, गाणी ऐकल्याशिवाय मुलं ऐकत नाही, असं कारण दिलं जातं. मुलांना बाहेरची हवा, अवयवांचा समन्वय होण्याची गरज असते, ते होत नाही. त्यामुळे मुलांना त्रास होतो. त्यांच्या डोळ्यावर त्याचा परिणाम होतो. या वयात मुलांचे अवयव विकसित होत असतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी जे घटक आहारामध्ये गरजेचे असतात, ते त्यांना मिळायला हवेत. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याविषयी फारशी सजगता दिसत नाही. प्रत्येक मुलाला डोळे तपासून शाळेत प्रवेश द्यायला हवा. काही मुलांना दिसत नाही किंवा कमी दिसतं. मुलाला मागच्या बाकावर बसवलं, की दिसत नाही. या कारणांमुळे ही मुलं अभ्यासामध्ये सक्षम नाहीत, असा आरोप केला जातो. अनेकदा या मुलांना फळ्यावर लिहिलेलं दिसत नाही. अशावेळी मुलांच्या शैक्षणिक क्षमतेवर अविश्वास दाखवण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. ती अनेकदा केली जात नाही.

चष्मा बनवणारा हा डॉक्टर नसतो; त्यामुळे नेत्ररोगतज्ज्ञांकडे जाऊन डोळे तपासायला हवेत. फोन जवळ घेऊन पाहणारी मुलं, टीव्ही जवळून पाहणाऱ्या मुलांना डोळ्यांच्या तक्रारी वाढतात. लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात थेट कोणतेही ड्रॉप्स घालू नये. चांगला आहार न मिळाल्यास मुलांच्या डोळ्यांमध्ये संसर्ग वाढतो. पोट साफ होत नसेल, तर त्यावरही योग्यवेळी उपचार घ्यायला हवे. आहारापासून मुलांच्या शारीरिक आरोग्याच्या प्रत्येक घटकांकडे पाहायला हवं. मुलं खेळून येतात तेव्हा त्यांच्या हाताला असलेल्या विषाणूंमुळे संसर्ग वाढतो. हा संसर्ग डोळ्यात गेला, तरीही डोळ्याच्या तक्रारी वाढतात. मुलांना पाळणाघराचा दुसरा पर्याय म्हणून मोबाइल, टीव्हीशी जोडून दिलं जातं. मूल भाजी खात नाही म्हणून त्यांना विकतचं फास्ट फूड दिलं जातं. या सगळ्याचा परिणाम मुलांच्या डोळ्यावर होतो, याचा मात्र सोयीस्कर विसर पडतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं लहान मूल ही आपली जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन मुलांना मोबाइल, टीव्हीपासून शक्य तितकं दूर ठेवायला हवं. मुलांच्या वाढीवर, नेत्रआरोग्यावर याचा विपरित परिणाम होतो आहे, हे वेळीच लक्षात
घ्यायला हवं.

- प्रा. डॉ. रागिणी पारेख, जे. जे. रुग्णसमूह
ग्रँड मेडिकल कॉलेज

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज