डॉ. राजेश जोशी, नेत्रतज्ज्ञ
डोळ्यांच्या अनेक आजारांपैकी एक म्हणजे रातांधळेपणा. या आजाराच्या नावावरूनच त्याचे स्वरूप लक्षात येऊ शकते. रातांधळेपणा म्हणजे रात्री न दिसणे. बऱ्याच लोकांना अंधार पडायला लागला, की भीती वाटते; कारण अंधार पडला, की त्यांचे डोळे काम करणे बंद करतात. म्हणजे त्यांना दिसत नाही. दिवसा ज्या व्यक्तीला व्यवस्थित दिसते, त्या व्यक्तीला रात्रीच्या अंधारात मात्र काहीच दिसत नाही किंवा अतिशय कमी दिसते. 'अ' जीवनसत्त्वाचा अभाव हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. पपईच्या किंवा सरकी (कापसाच्या) बियांवर पाय दिला, तर रातांधळेपणा येतो, अशी एक अंधश्रद्धा आहे; पण त्याचा आणि या आजाराचा कुठलाच संबंध नाही.
प्रमुख कारण : डोळ्यांच्या जालपटलातील शंकु-शलाकांमधील रंगद्रव्यावर प्रकाशकिरण पडल्यामुळे त्याचे विघटन (घटकद्रव्ये वेगळी होण्याची क्रिया) होते. शंकु-शलाका हे प्रकाशग्राही असलेल्या तंत्रिका तंतूंचे (मज्जातंतूंचे) संवेदनाग्राहकच आहेत. या रंगद्रव्याला 'दृग्नीलारुण' (ऱ्होडॉप्सीन) म्हणतात. त्यासाठी 'अ' जीवनसत्त्व आवश्यक असते आणि त्याची कमतरता हे रातांधळेपणाचे प्रमुख कारण असते.
अशी घ्या खबरदारी : हा आजार होऊ नये; म्हणून रोजच्या आहारात 'अ' जीवनसत्त्वायुक्त पदार्थ पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळे आणि त्वचेवरही परिणाम होतो. प्राण्यांचे यकृत व माशांच्या यकृताचे तेल; तसेच हिरव्या पालेभाज्या या पदार्थांत 'अ' जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. पपई, आंबा, लाल भोपळा, गाजर, शेवग्याची पाने व शेंगा यातही हे भरपूर प्रमाणात असते. प्रौढ स्त्री-पुरुषांना दररोज ६०० मायक्रोग्रॅम इतके, तर शिशूंना ३५० मायक्रोग्रॅम इतके 'अ' जीवनसत्त्व गरजेचे असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नेत्रपटल कोरडे होणे, डोळ्यांत पांढुरके डाग दिसणे अशी लक्षणे दिसतात. उपचार न झाल्यास अंधत्वही येण्याची भीती असते. त्वचाही कोरडी पडते. केसगळती होते.
इकडेही लक्ष द्या : रेटिन्टिज पिग्मेन्टोसामुळेदेखील रातांधळेपणा येऊ शकतो. इंग्लंडसारख्या प्रगत देशात मानसशास्त्रीय रातांधळेपणाही आढळतो. डोळ्यांच्या तपासणीत काहीही दोष न आढळणाऱ्या या विकृतीत रुग्ण आपली तक्रार बहुधा नाट्यमय रीतीने सांगतो. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांत व जीवितास धोका असलेल्यांना अंधुक प्रकाशात सतत काम करावे लागणाऱ्या आघाडीवरील सैनिकांत ही सवय आढळते. रातांधळेपणा असलेल्या मोटार चालकाला पुढील दिव्यांच्या प्रखर उजेडात फक्त दोन-तीन मीटरपर्यंतचाच रस्ता दिसतो. याउलट दृष्टिदोष नसलेल्या चालकाला कित्येक मीटरपर्यंतचा रस्ता स्वच्छ दिसतो. रातांधळेपणाच्या नेमक्या उलट दृष्टिदोषाला म्हणजे अंधुक प्रकाशात प्रखर प्रकाशापेक्षा चांगले दिसण्याला 'दिवांधत्व' म्हणतात. उपचाराने रातांधळेपणा ठीक होऊ शकतो. त्यामुळे असा प्रकार आढळल्यास नेत्रतज्ज्ञाशी संपर्क साधावा व कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.
डोळ्यांच्या अनेक आजारांपैकी एक म्हणजे रातांधळेपणा. या आजाराच्या नावावरूनच त्याचे स्वरूप लक्षात येऊ शकते. रातांधळेपणा म्हणजे रात्री न दिसणे. बऱ्याच लोकांना अंधार पडायला लागला, की भीती वाटते; कारण अंधार पडला, की त्यांचे डोळे काम करणे बंद करतात. म्हणजे त्यांना दिसत नाही. दिवसा ज्या व्यक्तीला व्यवस्थित दिसते, त्या व्यक्तीला रात्रीच्या अंधारात मात्र काहीच दिसत नाही किंवा अतिशय कमी दिसते. 'अ' जीवनसत्त्वाचा अभाव हे या आजाराचे प्रमुख कारण आहे. पपईच्या किंवा सरकी (कापसाच्या) बियांवर पाय दिला, तर रातांधळेपणा येतो, अशी एक अंधश्रद्धा आहे; पण त्याचा आणि या आजाराचा कुठलाच संबंध नाही.
प्रमुख कारण : डोळ्यांच्या जालपटलातील शंकु-शलाकांमधील रंगद्रव्यावर प्रकाशकिरण पडल्यामुळे त्याचे विघटन (घटकद्रव्ये वेगळी होण्याची क्रिया) होते. शंकु-शलाका हे प्रकाशग्राही असलेल्या तंत्रिका तंतूंचे (मज्जातंतूंचे) संवेदनाग्राहकच आहेत. या रंगद्रव्याला 'दृग्नीलारुण' (ऱ्होडॉप्सीन) म्हणतात. त्यासाठी 'अ' जीवनसत्त्व आवश्यक असते आणि त्याची कमतरता हे रातांधळेपणाचे प्रमुख कारण असते.
अशी घ्या खबरदारी : हा आजार होऊ नये; म्हणून रोजच्या आहारात 'अ' जीवनसत्त्वायुक्त पदार्थ पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळे आणि त्वचेवरही परिणाम होतो. प्राण्यांचे यकृत व माशांच्या यकृताचे तेल; तसेच हिरव्या पालेभाज्या या पदार्थांत 'अ' जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. पपई, आंबा, लाल भोपळा, गाजर, शेवग्याची पाने व शेंगा यातही हे भरपूर प्रमाणात असते. प्रौढ स्त्री-पुरुषांना दररोज ६०० मायक्रोग्रॅम इतके, तर शिशूंना ३५० मायक्रोग्रॅम इतके 'अ' जीवनसत्त्व गरजेचे असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नेत्रपटल कोरडे होणे, डोळ्यांत पांढुरके डाग दिसणे अशी लक्षणे दिसतात. उपचार न झाल्यास अंधत्वही येण्याची भीती असते. त्वचाही कोरडी पडते. केसगळती होते.
इकडेही लक्ष द्या : रेटिन्टिज पिग्मेन्टोसामुळेदेखील रातांधळेपणा येऊ शकतो. इंग्लंडसारख्या प्रगत देशात मानसशास्त्रीय रातांधळेपणाही आढळतो. डोळ्यांच्या तपासणीत काहीही दोष न आढळणाऱ्या या विकृतीत रुग्ण आपली तक्रार बहुधा नाट्यमय रीतीने सांगतो. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांत व जीवितास धोका असलेल्यांना अंधुक प्रकाशात सतत काम करावे लागणाऱ्या आघाडीवरील सैनिकांत ही सवय आढळते. रातांधळेपणा असलेल्या मोटार चालकाला पुढील दिव्यांच्या प्रखर उजेडात फक्त दोन-तीन मीटरपर्यंतचाच रस्ता दिसतो. याउलट दृष्टिदोष नसलेल्या चालकाला कित्येक मीटरपर्यंतचा रस्ता स्वच्छ दिसतो. रातांधळेपणाच्या नेमक्या उलट दृष्टिदोषाला म्हणजे अंधुक प्रकाशात प्रखर प्रकाशापेक्षा चांगले दिसण्याला 'दिवांधत्व' म्हणतात. उपचाराने रातांधळेपणा ठीक होऊ शकतो. त्यामुळे असा प्रकार आढळल्यास नेत्रतज्ज्ञाशी संपर्क साधावा व कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.