अ‍ॅपशहर

मैदानात खेळा…, तंदुरुस्त व्हा!

'आई, माझा होमवर्क झालाय. आता जाऊ का खेळायला?' पूर्वी असे संवाद घरोघरी ऐकू यायचे आणि आता…? 'ते टॅब ठेव आता बाजूला आणि ट्युशनला जा', असे संवाद ऐकू येतात. आता अशी मुले सुदृढ कशी बनतील. प्रत्येकच गोष्टीसाठी 'मॅजिक' औषध नसते. मूल अभ्यासात चांगले असेल, तर पालकांनी त्याच्या आवडीनिवडी शोधून काढल्या पाहिजेत. मूल खेळामध्ये चांगले असेल, तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. तुमच्या या प्रोत्साहनाने त्याचा आत्मविश्वास वाढेल. मुलांना हेच तर हवे असते. तीच त्यांची 'बेसिक' गरज असते.

Maharashtra Times 26 Nov 2018, 4:50 am
डॉ. स्मिता देसाई, बालरोगतज्ज्ञ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम play in the field get fit
मैदानात खेळा…, तंदुरुस्त व्हा!


'आई, माझा होमवर्क झालाय. आता जाऊ का खेळायला?' पूर्वी असे संवाद घरोघरी ऐकू यायचे आणि आता…? 'ते टॅब ठेव आता बाजूला आणि ट्युशनला जा', असे संवाद ऐकू येतात. आता अशी मुले सुदृढ कशी बनतील. प्रत्येकच गोष्टीसाठी 'मॅजिक' औषध नसते. मूल अभ्यासात चांगले असेल, तर पालकांनी त्याच्या आवडीनिवडी शोधून काढल्या पाहिजेत. मूल खेळामध्ये चांगले असेल, तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. तुमच्या या प्रोत्साहनाने त्याचा आत्मविश्वास वाढेल. मुलांना हेच तर हवे असते. तीच त्यांची 'बेसिक' गरज असते.

छोट्या असो वा मोठ्या, खेळणे आणि शिकणे यात काहीच फरक नसतो. त्यादृष्टीने पालकांनी आणि शाळांनीही काळजी घ्यायला हवी. खरे तर नर्सरीमध्ये मुलांना फक्त खेळच शिकवायला हवेत. अभ्यास नकोच. मोठ्या मुलांसाठी खेळणे म्हणजे अधिकची ऊर्जा मिळविण्याचे चांगले माध्यम आहे. खेळांमधून मुले नानाविध प्रकारची कौशल्ये शिकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हरणे आणि जिंकणे शिकतात! या दोहोंतला फरक त्यांना कळू लागतो. हार-जितचा अर्थ कळणे हे आयुष्याच्या अनेक टप्प्यात उपयोगी पडते.

खेळण्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मुले सक्षम होतात. सांघिक खेळ मुलांना समूहाने काम करण्याचा धडाच देतात. एकमेकांशी संवाद साधायला आणि एकमेकांमधील मतभेद दूर करण्याला खेळ शिकवतात.

मुले थोडी मोठी झाल्यावर, काही पालक त्यांचे खेळणे बंद करतात. एरवी खेळ म्हणजे मुलांना गुंतवून ठेवण्याचे केवळ माध्यम त्यांना वाटते. त्यामुळे जसजसा अभ्यास वाढत जातो, तसतसे पालकांना मुलांचे खेळणे म्हणजे वेळ वाया घालवणे वाटते. हा पूर्णत: चुकीचा विचार आहे. मुलांना खेळू द्यायला हवे. खेळण्यासाठी मुलांना वेळ काढता यावा, असे नियोजन पालकांनी पुढाकार घेऊन करायला हवे. आरोग्य हे सर्वांत आधी, याची पालकांनी खूणगाठच बांधायला हवी. खेळण्यामुळे होणारे फायदे लक्षात घेतले तर माझा हा मुद्दा पटेल तुम्हाला.

खेळामुळे होणारे फायदे -

० मुलांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढत नाही.

० स्नायू व हाडे मजबूत होतात.

० रोगप्रतिकारशक्ती वाढते.

० मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

० रक्तदाबावर नियंत्रण राहते.

० चांगल्या कोलेस्टेरॉलमध्ये वृद्धी होते.

० अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या धोक्यापासून मुक्ती मिळते.

० खेळण्यामुळे व्यक्ती प्रसन्न राहते.

० आत्मविश्वासात वाढ होते.

० स्वस्थ झोप येते.

० शारीरिक व भावनिक आव्हानांना आणि मानसिक ताणतणावांना चांगल्याप्रकारे यामुळे सामोरे जाता येते.

० जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तयार होतो.

आज ज्या पद्धतीने 'लाइफस्टाइल' विकसित झालीय, ती बघता वरील बाबींची किती तीव्र गरज आहे, हे लक्षात येईल. मुलांनी दररोज निदान एक तास मैदानात खेळले पाहिजे. एका जागेवर खूप वेळ बसू नये. पालकांनी मुलांपुढे नियमित व्यायामाचा आदर्श ठेवल्यास मुलेही आपोआप अनुकरण करतील.

व्यायामात् लाभते स्वास्थ्य, दीर्घायुष्यं बलं सुखम्।

आरोग्य परमं, भाग्यं, स्वास्थं सर्वार्थसाधनम्।।

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज