गो. तु. पाटील
तथाकथित प्रतिष्ठेचं ओझं वाहत जगणाऱ्या माणसाचं वर्तन नेहमीच व्यक्ति तसेच समाजासाठी हानिकारक वाटतं. माझ्या पाहण्यातले एक प्राचार्य-शिक्षक. ते सदैव प्राचार्यपदाची झूल पांघरून वावरत. शिक्षक म्हणून वर्गावर जातानाही. अध्यापन नोटस्, फाईल, पुस्तक, डस्टर आणि खडू घेऊन शिपाई पुढे. त्याच्या मागोमाग ते प्राचार्यांच्या आविर्भावात. शिपाई बोर्ड साफ करणार. त्यानंतर प्राचार्य शिकविणार. यातून विद्यार्थी-शिक्षकांत चुकीचा संदेश जातो, हे त्यांच्या गावी नसायचं. इतकी खोटी प्रतिष्ठा त्यांच्या अंगवळणी पडली होती.
तथाकथित प्रतिष्ठेचं विसर्जन करणारं एक ग्रामीण वर्तनचित्र माझ्या मनात रुतलेलं आहे. लहानपणी खेडेगावात सकाळच्या प्रहरात माणसं गावाबाहेर शौचास जात. रस्त्यानं जाणारी-येणारी माणसं आपलं वय, सामाजिक वा सांपत्तिक स्थान विसरून जो ज्याला प्रथम दिसेल त्याला म्हणायचा "राम राम भो!" याचा अर्थ जो ज्याला प्रथम दिसेल त्यानं प्रथम नमस्कार करायचा. प्रतिष्ठेचं किती सहज विसर्जन असायचं यात. वाचनातील एक प्रसंग. पंजाबच्या राज्यपालपदी असलेले कै. न. वि. उर्फ काकासाहेब गाडगीळ पदाच्या लवाजाम्यासह हाय-वेनं प्रवासात होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फाटक्या-तुटक्या हॉटेलातून खमंग भजी तळण्याचा वास आला. त्यांना भजी खाण्याची अनावर इच्छा झाली. राज्यपालपदाची झूल काकासाहेबांनी फेकून दिली. अंतस्थ उर्मी प्रमाण मानून त्या हॉटेलात भजी खाल्ली. जीवनानंद भोगला. तथाकथित प्रतिष्ठेचं ओझं बाळगलं नाही. असा आनंद घेता-देता येतो.
सुप्रतिष्ठित असलेली व्यक्ती समाजहितैषी असेल तर आपल्या प्रतिष्ठेनं केवढं समाजहित साधते याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजर्षि शाहू. महाराजांच्या घोड्यांच्या पागेत गंगाराम कांबळे नावाचा दलित मोत्तद्दार होता. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी प्याल्यानं सवर्णांनी त्याला मारहाण केली. हकीकत महाराजांच्या कानावर आली. त्यांनी कोल्हापुरात कांबळेंना राजमार्गावर हॉटेल काढून दिलं. त्या हॉटेलात महाराज चहा प्यायला जात. सोबत जमीनदार, वतनदार, जहागीरदार.. अशा सवर्णांना घेऊन जात. खऱ्याखुऱ्या राजप्रतिष्ठेचा केवढा हा विनम्र आविष्कार. समानतेचा संदेश देणारा. गंगारामचं हे हॉटेल समानतेचं प्रतीक बनलं. कोल्हापुरात अलीकडेच या हॉटेलची शताब्दी साजरी झाली.
अलीकडचं एक उदाहरण. कोल्हापूर जिल्ह्यातलं गडहिंग्लज गाव. तिथं शांताबाई यादव ही एक ७० वर्षीय नाभिक समाजातील महिला पूर्णवेळ नाभिक व्यवसायासाठी प्रसिद्धीस आलेली आहे. पण तिची पूर्व कहाणी हृदयद्रावक आहे. बाराव्या वर्षी लग्न झालेल्या शांताबाई ऐन तिशीत विधवा झाल्या. पदरी चार मुली. वडिलोपार्जित तीन एकर जमीन दिरानं बळकावली. उदरनिर्वाहासाठी कुणाच्या दयेवर अवलंबून न राहता त्यांनी नवऱ्याचा पारंपरिक केशकर्तनाचा व्यवसाय पत्करला. परंतु, पुरुषांच्या कठोर जगात ग्रामीण भागातील विधवेसाठी हे सोपं नव्हतं. कुचेष्टा, कुचाळक्या आणि बदनामीला तोंड द्यावं लागलं. पण बाईंनी हार खाल्ली नाही. आणि एकेदिवशी नाट्यमय घटना घडली. गावातील सुप्रतिष्ठित (बहुदा सरपंच) हरिभाऊ कडूकर या गृहस्थानं शांताबाईंना भर चौकात बोलावलं. त्यांना स्वत:ची दाढी-कटिंग करण्याची विनंती केली. विस्फारलेल्या नजरेनं गाव पाहत होतं. दाढी-कटिंग झाली. हरिभाऊंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून आवाहन केलं- "या बाईंनी स्वाभिमानानं जगण्यासाठी हा व्यवसाय पत्करला. त्यांची कुचेष्टा नि अवहेलना मी खपवून घेणार नाही." एका सुप्रतिष्ठेनं शांताबाईंना जगण्यात प्रतिष्ठा दिली. या हकीकतीवर दिग्दर्शक अजय कुरणेंनी 'बलुतं' नावाचा लघुपट केला. जिज्ञासूंनी आवर्जून पहावा असा. तेव्हा तथाकथित प्रतिष्ठेची झूल फेकून देणाऱ्या स्वाभाविक वर्तनातच व्यक्ती व समाजाचं कल्याण असतं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.